गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ह्या ५ गोष्टींचं कठोर पालन करतात...


श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ह्या ५ गोष्टींचं कठोर पालन करतात


जगातल्या बहुतांशी श्रीमंत लोकांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या श्रीमंत होण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला काही सामायिक गोष्टी सापडतात. जेव्हा लोक असं म्हणतात, की आजकालच्या जगामध्ये श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत, तेव्हा त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही, पण श्रीमंत अजून का श्रीमंत होत आहेत, ते जाणून घेणं आवश्यक आहे.

विशेषतः ज्यांना श्रीमंत होण्याची इच्छा आहे, अशांनी.

बिल गेट्स किंवा वॉरन बफेट किंवा आपल्या भारतातले मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी यांच्यासारखे लक्ष्मीपती आपल्या मेहनतीने धनाढ्य झाले, पण ही संपत्ती टिकावी आणि वाढावी म्हणून ते जे काही करतात, ते प्रत्येक महत्वाकांक्षी माणसाने समजून घ्यायलाच पाहिजे.

बीबीसी कॅपिटलच्या एका अहवालानुसार सामान्य लोक हातात पैसे खुळखुळायला लागल्यावर ते पैसे प्रॉपर्टी, कार्स किंवा इतर ऐषारामाच्या गोष्टींवर खर्च करतात पण श्रीमंत लोक तसं करत नाहीत. त्यांच्यासाठी पैसा हे साध्य नसून अजून पैसे कमावण्याचं साधन असतं.



सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रीमंत लोक पैसे खर्च करण्यासाठी नाही, तर गुंतवणुकीसाठी आहेत यावर पूर्ण विश्वास ठेवतात.

सामान्य लोक पैसे अशा वस्तूंवर खर्च करतात, ज्यापासून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. पण श्रीमंत लोक पैसे भावी परताव्याचा विचार करूनच गुंतवतात.

दुसरा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोकांकडे गुंतवणूक आणि तिच्यातून मिळणारा परतावा यांच्याबद्दल प्रचंड संयम असतो.

अशी अनेक उदाहरणं आहेत, जेव्हा श्रीमंत लोकांनी आपला संपूर्ण व्यवसाय विकला आणि त्यापासून मिळालेले पैसे न उधळता किंवा चुकीच्या ठिकाणी न गुंतवता योग्य संधीची वाट पाहिली आणि ती वेळ आल्यावरच गुंतवणूक करून आज यशस्वी झाले.

My favourite holding time is forever

- हे जगद्विख्यात गुंतवणूक गुरु वॉरन बफेट यांचे उद्गार प्रसिध्दच आहेत.

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक जोखीम स्वीकारायला नेहमीच तयार असतात.

जितकी जास्त जोखीम, तितकाच जास्त परतावा या तत्वावर त्यांचा दृढ विश्वास असतो. ते नेहमीच नवीन आणि भविष्यकाळात यशस्वी होईल अशा व्यवसायांच्या शोधात असतात, आणि त्यांच्यात पैसे गुंतवतात. जर असे व्यवसाय चालले, तर कधीकधी २०००% पर्यंत नफा मिळू शकतो. अर्थात, पैसे बुडायची जोखीमही असते, पण श्रीमंत लोक अशा प्रकारच्या जोखमीचा पूर्ण विचार आणि अभ्यास करून आपला निर्णय घेतात.

त्याचबरोबर असलेला – चवथा मुद्दा म्हणजे –

श्रीमंत लोक कधीही एका व्यवसायात पैसे गुंतवत नाहीत, तर आपले पैसे अनेक ठिकाणी गुंतवतात.

जर एखाद्या ठिकाणी तोटा झाला तर दुसऱ्या ठिकाणच्या नफ्याने त्याला भरून काढतात. त्याचबरोबर ते पैसे गुंतवलेल्या कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत अतिसंवेदनशील नसतात. जर त्या व्यवसायात तोटा होणार असेल, तर ते ताबडतोब आपले पैसे तिथून काढून घेतात, आणि कमीतकमी तोटा होईल असं बघतात.

शेवटचा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक आपले पैसे काही वेगळ्या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये गुंतवतात, उदाहरणार्थ प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती, वाईन किंवा मग व्यावसायिक प्रॉपर्टी.

या गोष्टी बऱ्याच काळापर्यंत चांगला परतावा देतात. अनेक श्रीमंत लोक जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दोन-तीन घरं किंवा व्यावसायिक प्रॉपर्टी घेऊन ठेवतात. हा गुंतवलेला पैसा त्यांना बराच काळ चांगलं उत्पन्न मिळवून देतो.

यावरून असा निष्कर्ष काढता येईल, की पैशाकडे पैसा जातो, किंवा श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत, हे जरी खरं असलं, तरी त्यामागे श्रीमंतांची पैशासाठी मेहनत न करता उलट पैशाला अजून पैसे कमावण्यासाठी मेहनत करायला लावण्याची मनोवृत्ती आहे. सामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.

ज्याला कुणाला श्रीमंत व्हायची इच्छा असेल, त्याने पैशाकडे खर्च करण्याची संधी म्हणून न बघता जर गुंतवणूक करून अजून पैसे कमावण्याची संधी म्हणून पाहिलं, तर नक्कीच त्याच्या परिस्थितीत बदल होऊ शकेल, आणि यासाठी त्या माणसाकडे गडगंज पैसे हवेत असंही अजिबात नाही. शिस्त, संयम आणि जोखीम घेण्याची तयारी यांच्या बळावर कोणताही सामान्य माणूस श्रीमंत होऊ शकतो.


















by - https://m.dailyhunt.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल