तुम्हाला हे शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण हैद्राबाद शहरात आपली मराठी भगिनी प्रज्ञा केसकर खाण्यायोग्य चमचे बनवत आहे आणि जगभरातून या चमच्याना प्रचंड मागणी आहे. हि मागणी इतकी जास्त आहे कि, प्रज्ञाताईनी वेबसाईटवर डिसेंबरपर्यंत आधीच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या जातील मगच पुढील ऑर्डर्स स्वीकारल्या जातील असा संदेश लिहिलंय. प्रज्ञाताईचे पती नारायण पिसापती यांची हि भन्नाट कल्पना. ज्वारी आणि तांदळापासून असे चमचे बनवायचे जे कि प्लास्टिक चमच्यानं पर्याय ठरतील  आणि खाताही येतील अशी हि भन्नाट आयडिया. हे चमचे खाण्यायोग्य तर आहेतच पण चविष्टही आहेत. शिवाय आपण चहा किंवा इतर पेये सुद्धा या चमच्याने ढवळू शकतो. 'बेकीज' या ब्रँडनेमने हे उत्पादन सध्या विकले जाते. तर अशा या बेकीजना प्रचंड मागणी आहेत ती परदेशी बाजारातुन. या ब्रॅण्डच्या उभारणीत मोठा वाटा आहे तो प्रज्ञाताईंचा. या मुलाखतीतून जाणून घेऊया प्रज्ञाताईंच्या या आगळ्या वेगळ्या प्रोडक्ट्ची वाटचाल. 
१.  प्रज्ञाताई तुम्ही मराठी आहात पण तुमचे वास्तव्य सध्या हैदराबादेत आहे. तेव्हा या प्रवासाविषयी थोडेसे सांगा.
 माझा जन्म हैदराबादमध्येच झाला आणि तिथेच मी वाढले आणि शिकले. माझे वडील वकील होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि आई शिक्षिका होती. मी स्वतः बीकॉम आहे. तसेच पब्लिक रिलेशन्स आणि ट्रेनिंग एंड डेव्हलपमेंटमध्ये पीजी डिप्लोमा केला आहे. शिवाय भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून मी बल्गेरिया येथे टुरिझम स्टडीजमध्ये एमफिलही केले आहे. मी लहान असताना आमच्या घरी टीव्ही नव्हता त्यामुळे माझी कल्पनाशक्ती खूप तीव्र होती. कदाचित त्यामुळेच मी पुढील आयुष्यात अशा ब-याच गोष्टी केल्या ज्या मी एरव्ही केल्या नसत्या.

२. जसे खाण्यायोग्य चमचे. पण ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?
ही खरं तर माझे पती, नारायण पीसापती यांची कल्पना आहे. ते स्वतः विज्ञान पदवीधर आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. ग्रामीण भारतात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर काम केले आहे. हैदराबादेत इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये काम करीत असताना ते कमी पाणी असलेल्या शेतींच्या व्यवस्थापनेवर काम करत होते. तिथे काम करत असताना त्यांना जाणवलं की ज्वारी जे आजवर इथलं मुख्य अन्न पिक होतं त्याचं उत्पन्नक्षेत्र हळूहळू कमी होत चाललंय. इथले शेतकरी ज्वारीऐवजी नगदी पिकांकडे वळले होते ज्याला प्रचंड प्रमाणात पाणी लागायचं. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा करायचे. परिणामी इथले भूजल स्त्रोत आटत चालले होते. त्यामुळे काही काळानंतर त्यांना शेती करणं सोडावं लागायचं. ते एकतर मजूरीसाठी शहरात जायचे किंवा आत्महत्या तरी करायचे. 
ही सर्व परिस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती. ज्वारीची लागवड वाढावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. कारण ज्वारी ही पौष्टीक असते, तिला पाणी कमी लागतं, रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही. जर ज्वारीला योग्य मार्केट मिळवून दिलं तर पाण्याची बचत होईल, शेतक-यांना चांगलं उत्पन्न मिळेल याचा त्यांनी विश्वास होता. आपल्या संशोधन कार्यासाठी ते मेहबूबनगर आणि अनंतपूर जिल्ह्यांत फिरत असताना त्यांना अनेकदा ज्वारीची भाकरी खावी लागायची. ही भाकरी खूप जाड असायची. तेव्हा ते तिचा उपयोग चमच्यासारखा करायचे आणि त्यातून भाजी किंवा वरण खायचे. त्यांतूनच त्यांना चमच्याच्या आकाराच्याच ज्वारीच्या भाक-या करण्याची कल्पना सूचली. आधी त्यांनी जे ज्वारी चमचे केले ते लाकडासारखे कडक होते आणि त्यांना फारशी चवही नव्हती. मग त्यात त्यांनी भात आणि गव्हाचं पिठ वापरलं आणि मग ते खाण्यासारखे झाले. ते मऊ बनले आणि त्यांना चांगला रंगही मिळाला. 
चमच्यांचा पहिला सेट त्यांनी २००६मध्ये तयार केला. घरीच त्यांनी विटांची एक भट्टी बनवली. त्यात त्यांनी लोखंडी जाळीवर हे चमचे भाजले. हा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि लवकरच त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ हेच काम करायचं ठरवलं. केवळ चमचेच नाही तर खाण्यायोग्य संपूर्ण कटलरीच तयार करण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यामागचा उद्देश एकच होता की शेतक-यांना व्यवसायाचं एक नवीन क्षेत्र मिळावं. शेतजमीन, भूजल स्त्रोत टिकून राहावेत. ते या कामानं अगदी आजही झपाटलेले आहेत. हे करताना या कामाला खरंच काही मार्केट आहे की नाही याचाही विचार त्यांनी केला नाही. याकामासाठी पुरक अशी यंत्रे बनवताना त्यांना स्वतःसकट आपल्या घरच्यांचाही विसर पडत असतो. त्यात अडथळे आलेले त्यांना चालत नाहीत त्यामुळे अन्य कोणत्याही कामाविषयी बोलताना फार हुशारीनं त्यांच्याशी बोलावं लागतं. पण मला आता त्याची सवय झाली आहे.
३.  तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही कल्पना तुमच्या पतींची आहे पण यात तुमचा वाटाही मोलाचा आहे. तेव्हा तुम्ही या नवीन कल्पनेला एका यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतरित करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली?
बेकीज् फुड प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आम्ही या कामासाठी सुरू केली  (http://www.bakeys.com). मी या व्यवसायाच्या वितरणाचा चेहरा आहे असं म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही. व्यवसाय कसा करायचा, व्यवस्थापन कसं सांभाळायचं याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण माझ्या पतींच्या कामात मलाही कमालीचा रस होता, मुख्य म्हणजे त्यांचं स्वप्न मीही जगत होते. त्यामागची त्यांची सामाजिक भूमिक मला कळत होती. आमच्याकडे पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, जाहिरातबाजी नव्हती. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये व वृत्तवाहिन्यांमध्ये आमच्या ज्या मुलाखती यायच्या त्यामुळे आम्हाला काही मागणी मिळायची. पण त्याची पुनरावृत्ती होत नसे. पण २००८ साली डीस्कव्हरी चॅनेलने याविषयी एक डॉक्युमेंटरी केली जी आजही कोणत्या ना कोणत्या देशात दाखवली जाते. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. चेंज मेकर्स ऑफ एशिया या शिर्षकाअंतर्गत ही कथा दाखवली जाते. त्याचा फायदा असा झाला की अनेक देशांतून इमेल्स, फोनकॉल्सच्या माध्यमातून आम्हाला मागण्या यायल्या लागल्यात. त्यांना आश्चर्य वाटायचं की कोणीतरी खाण्यायोग्य चमचे व कटलरीचा संपूर्ण सेट बनवला आहे जो शुद्ध शाकाहारी व सेंद्रीय आहे. आम्हाला अमेरिका, इंग्लंड, दुबाई, सिंगापोर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, पेरू, ब्राझिल, इजिप्त, इस्टोनिया अशा विविध देशांमधून मागण्या आल्यात. आम्ही अनेक ठिकाणी आमच्या खर्चानं नमुनेही पाठवले. काहींना आमच्यासोबत डिलरशीपही करायची होती पण आर्थिक मुद्द्यांवरून गोष्टी फिसकटत राहिल्या. त्याचवेळी भारतात त्याहूनही भयानक परिस्थिती होती. आम्हाला प्रसिद्धी मिळाली पण विक्री होत नव्हती. खर्चाचं गणित सांभाळणं कठीण जात होतं. आमच्याकडे तेव्हा आणि आत्ताही कामासाठी पूर्णवेळ माणसं नव्हती. कारण त्यांना द्यायला पैसा नव्हता. आजही आमच्याकडे रोजंदारीवर लोकं काम करतात. २०१२ पर्यंत आम्हाला बँकेचं लोनही मिळू शकलं नाही. मिळालं ते शेवटी माझ्या नावावर आणि त्यासाठीही आम्हाला आमचं घर गहाण ठेवावं लागलं होतं. पैशाच्या अभावी आमच्या संपूर्ण कुटुंबालाच फार काही सोसावं लागलं होतं. 
आमच्या मार्केटिंगच्या कोणत्याच कल्पना यशस्वी होत नसताना अचानक आम्हाला प्रसिद्धी मिळायला लागली ती सोशल मिडियामुळे. आमच्या या वेगळ्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळाली. लोकं आम्हाला भेटू लागले. माझ्या पतींसोबत मलाही प्रसिद्धी मिळू लागली. त्यांना यातून पैसा कधीच मिळवायचा नव्हता. त्यांना शेतकरी, त्याची शेती, ज्वारीचं पिक वाचवायचं होतं. त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले नसले तरी या गोष्टींकडे लक्ष वेधलं गेलं ही मोठीच गोष्ट होती. ते आजही त्याच तन्मयतेनं आपलं काम करीत आहेत. 
४. कुठलीही नवीन कल्पना लोक सहज स्वीकारत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचे  ठरवले तेव्हा कुठले अडथळे आले आणि त्यावर मात  कशी केली?
आमचं हे वेगळं उत्पादन लोकप्रिय करण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न अर्थातच केले. पहिला महत्त्वाचा प्रश्न होता स्टीलचे चमचे असताना एकदाच वापरता येणारे हे चमचे का वापरायचे? स्वस्तातले प्लास्टिकचे चमचे सोडून हे चमचे का वापरायचे? हाताने लोक जेवत असताना ते हे चमचे का वापरतील? आम्ही जेव्हा सांगायचो की प्लास्टिकचे चमचे आरोग्याला घातक असतात तेव्हा लोक हसायचे. काही लोक आम्हाला सहानुभूती दाखवण्यासाठी म्हणून आमच्याकडून काही चमचे विकत घ्यायचे. काही लोक बरेच प्रश्न विचारायचे पण साधे दोन चमचेही विकत घ्यायला तयार व्हायचे नाहीत. तर काही आम्हालाच आम्ही कसा मूर्खपणाचा उद्योग करतोय हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचे. पण आम्ही या सगळ्या गोष्टी व्यवसायातील अडचणी म्हणून स्वीकारल्यात. यातूनच आम्ही शिकत होतो. आम्ही हे चमचे मग ऑर्गनिक शॉप्स, ऑर्गनिक मार्केट, स्पेशल फार्म मार्केटमध्ये विकायला लागलो कारण तिथे येणा-या लोकांना अशा उत्पादनांची सवय व माहितीही असते. आम्ही दर रविवारी अशा एखाद्या ठिकाणी जायचो आणि स्टॉल लावून या वस्तू विकायचो. आमच्या या सुरूवातीच्या कठीण काळात काही चांगले लोकही आम्हाला मिळाले. बॉश कंपनी, कामिनेनी हॉस्पिटल, कॅफे कॉफी डे यांनी आम्हाला फार मदत केली. त्याशिवाय अनेक छोट्या कुटुंबे, लहान मुले, पर्यावरण प्रेमी गट आमच्याकडून नियमीतपणे खरेदी करायचे. पण आमचा खर्च भरून यायलाही यातून मदत होत नव्हती.
२०१५ मध्ये द बेटर इंडीया या संकेतस्थळाने आमच्यावर एक कथा केली जिने आम्ही एकदम प्रसिद्ध झालो.  http://www.thebetterindia.com/30465/edible-cutlery-in-india/ 
त्यातून आम्हाला मोठा व्यवसाय मिळाला. आमच्याही लक्षात आले की सोशल मिडियामध्येच या व्यवसायाचं मार्केटींग उत्तमपणे होऊ शकतं. आम्ही त्यादिशेनं प्रयत्न केले आणि मार्च २०१६पासून आमची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. आमच्या कामावरच एक डॉक्युमेंटरी फिल्म या संकेतस्थळानं बनवली जी भारतातील सहा महत्त्वाच्या संशोधनांचा भाग होती. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. 
आता आम्हाला वेगवेगळ्या देशांतून लोकांकडून थेट मागणी येते. जवळपास ६० देशांमधून आम्हाला आजवर अशी मागणी आली आहे. त्याचं प्रमाण इतकं आहे की आलेले इमेल्स, मेसेजेस् वाचण्यातच माझा बराच वेळ जायचा. म्हणून त्यासाठी आम्ही माणसं ठेवली आहेत जी ही मेल्स वाचतात आणि त्यानुसार मागणी नोंदवून घेतात. आम्ही आता मास प्रॉडक्शनवर आम्ही भर देत आहोत. त्यासाठीची तयारी सुरू आहे. आम्हाला हवी ती मशनरी मिळाली की दिवसाला आम्ही लाखो चमचे तयार करू शकू. सध्या आम्ही दिवसाला ४०००० चमचे तयार करू शकतो. हे चमचे तयार करण्याचे यंत्र भारतातच तयार करण्यात आले. त्याचाही आम्हा दोघांना अभिमान आहे. मुख्य म्हणजे आम्ही स्वयंपाकाची जास्तीतजास्त साधने खाण्यायोग्य बनवण्यासाठी प्रयत्न करतोय ज्यामुळे प्लास्टिकच्या विळख्यातून पर्यावरणाची सुटका होण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आम्ही टाकू शकू. आम्ही त्याला गमतीनं ‘गांधीगिरी विद चमचागिरी’ असं म्हणतो.

५.  भविष्यात तुमचे पुढचे प्रकल्प काय आहेत?
आमचा उत्साह आता वाढला आहे आणि या कामाची व्याप्तीही आम्हाला अर्थातच वाढवायचीही आहे. आम्ही आता आमचं लक्ष एका वेळी वापरल्या जाणा-या ठिकाणी जी खाद्यपदार्थांची नासाडी होऊ शकते ती टाळण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी खाण्यापिण्याचे कप, प्लेट्स, इतर साहित्य हे खाद्ययोग्य धान्यांपासून बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. यात आम्ही काटे, चमचे, पळ्या, वाट्या, ताटली, ताट इत्यादी गोष्टी बनवणार आहोत. त्यासाठी ज्वारीसोबतच जवस, ओट, मका इत्यादी धान्य पिठांचा वापर करणार आहोत. आम्ही यात कोणतीही रसायनं वापरत नाहीत. कोणतेही हानीकारक पदार्थ यात वापरत नाहीत. आम्ही ते फक्त भाजून घेतो. चहा-दुधात मिसळून खाताना ते चटकन विरघळत नाहीत. फक्त या चमच्यांचा वापर फक्त जेवताना करायचा असतो. नारायण आता वाया जाणा-या धान्य पिकांचे अवशेषापासून (waste crop residue)  सॅनिटरी नॅपकीन्स, डायपर्स बनवण्याच्या मागे लागले आहेत. या वस्तू पाढ-या शुभ्र करण्यासाठी जी अनावशक्य हानीकारक रसायने वापरली जातात त्यांना यामुळे आळा बसू शकेल. शिवाय त्यांचा उपयोग झाल्यानंतर त्यांना जाळताना पर्यावरणाची हानीही होणार नाही. आम्ही सारेच त्यांना अर्थातच यात पाठींबा व प्रोत्साहन देत आहोत. 
६. नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना काय सल्ला द्याल? 
मी माझ्या अनुभवांतून इतकंच सांगेन की जर तुमचं एखादं स्वप्न असेल तर त्याचा कधी त्याग करू नका. ते प्रत्यक्षात येण्यासाठी कायम प्रयत्न करीत रहा. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर वाट बघा पण आपलं स्वप्न आपल्या मनांत जीवंत ठेवा. त्याची कायम स्वतःला आठवण करून देत रहा. जर तुम्हालाच तुमच्या स्वप्नांची लाज वाटत असेल, त्याबाबत बोलायची हिम्मत होत नसेल, त्याचा पाठपुरावा करण्याची तुमचीच तयारी नसेल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही. पण तसं नसेल तर आज ना उद्या लोकं तुमच्यासोबत तुमचं स्वप्न साकारण्यासाठी निश्चित मदतीला येतील. तुमचं स्वप्न ते कितीही लहान असो त्याचा अभिमान बाळगा. ते कितीही मोठं असो त्याचं दडपन घेऊ नका. ते स्वप्न जगा. दिवस-रात्र. त्यासाठी स्वतःला मानसिक व शारिरीकदृष्ट्या कणखर बनवा. 





















- प्रज्ञा केसकर, हैद्राबाद 
(प्रज्ञा केसकर यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास त्यांचा मेल आय डी prakes@gmail.com आहे)