बुधवार, ९ एप्रिल, २०१४

सेंद्रिय शेतीतील पर्यावरणीय विचार

१९६० नंतर भारतात औद्योगिक (व्यापारी) शेतीला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी संकरित व जी. एम. (जनुक परिवर्तित) बियाणे, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व मशागतीसाठी ट्न्ॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याचबरोबर जमिनीच्या वर साठवलेल्या व जमिनीतील पाण्याचा वापर अनिर्बंधपणे करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणीय गंभीर समस्या निर्माण झाल्या.

१) झाडांची संख्या घटली.
२) जैविक विविधता संपत आली.
३) पाणी दूषित व दुर्मिळ झाले.
४) हवा दूषित झाली.
५) मातीचा पोत नष्ट झाला.
६) अन्न विषमय झाले.
७) पक्षी व सजीवांची संख्या घटली.
८) ग्रामीण जनतेचे स्थलांतर होऊन शहरे वाढली.


माणसांचे व एकूणच सजीवसृष्टीचे जीवन समतोल व आनंदी व्हायचे असेल तर निसर्गाचा समतोल म्हणजेच नैसर्गिक संसाधनांची (जल, जंगल, जमीन, हवा, सूर्यप्रकाश, जैवविविधता, पशु-पक्षी, खनिज तेल इ.) लूट न करता संवर्धनच व्हावे असा त्या संसाधनांचा वापर झाला पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल कायम राहतो. परंतु गेल्या अनेक वर्षांतील माणसांच्या अनिर्बंध व हव्यासी वर्तनाने नैसर्गिक संसाधनाची लूट झाल्यामुळे ही संसाधने संपत आली आहेत. त्यामुळे मानवासहित सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
पाश्चात्त्य भोगवादी संस्कृतीमुळे माणसांच्या ज्या चैनीच्या गरजा वाढल्या आहेत त्या भागविण्यासाठी माणूस नैसर्गिक संसाधनांची लूट करीत आहे. त्यासाठी माणसाने व्यापारी-रासायनिक शेतीचा स्वीकार केला. त्यातून पर्यावरणीय व इतर गंभीर समस्या निर्माण झाल्या.
मग आता त्यावर उपाय काय ?

१) झाडांची संख्या वाढवावी लागेल - वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्याच्या नावाखाली झाडे तोडून जंगलाखालची जमीन लागवडीखाली आणली गेली. झाडांची संख्या कमी झाल्याने हवेतील ऑक्सिजनचे व आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले. झाडे कमी झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी झाले. पडलेले पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याचे प्रमाणही कमी झाले.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली त्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणेही मुष्किल झाले.
हे थांबवायचे असेल तर जमिनीच्या एक तृतीयांश क्षेत्रावर झाडांची मिश्र लागवड करावी लागेल. सध्या फळबाग लागवडीखाली एकाच प्रकारच्या आंबा, द्राक्षे, केळी, चिकूंच्या झाडांची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जात आहे. तीही पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. ते टाळायचे असेल तर एकाच शेतात दीर्घ मुदतीची (चिंच, आंबा, जांभूळ, चिकू इ.) व अल्प मुदतीची (सीताफळ, शेवगा, हादगा, बोर, कवठ इ.) आणि कमी पाणी लागणारी किंबहुना पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या झाडांची मिश्र लागवड करावी लागेल.


२) जैवविविधता वाढवावी लागेल
रासायनिक शेतीतील संकरित व जी. एम. बियाण्यांमुळे व एक पीक पद्धतीमुळे निसर्गातील जैविक विविधता संपत चालली आहे. त्यामुळे झाडांच्या व पिकांच्या कित्येक जाती नष्ट झाल्या आहेत. हे थांबविण्यासाठी संकरित व जी. एम. बियाणे नाकारून ेशी (गावरान) बियाणांचा वापर वाढवून व त्याचे जतन करून जैविक विविधता वाढविली पाहिजे.

३) शुद्ध व मुबलक पाण्यासाठी
शेतीत व्यापारी वृत्ती आल्यामुळे रासायनिक शेतीचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे ऊस, केळी, द्राक्षं, फुलशेती व इतर जास्त पाणी लागणाऱ्या व्यापारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला त्यामुळे पाणी दुर्मिळ झाले तसेच रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशकांच्या प्रचंड वापरामुळे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे मानवासहित सर्व सजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.हे टाळायचे असेल तर मूलभूत गरजांवर आधारित कमी पाणी लागणाऱ्या व पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकांचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले तर रसायनांचाही वापर टाळला जाईल. त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल व शुद्ध आणि मुबलक पाणी मिळेल.

४) शुद्ध हवेसाठी
रासायनिक शेतीत झाडांची संख्या कमी झाली तसेच रसायनांची फवारणी वाढली व मशागतीसाठी ट्न्ॅक्टरचा वापर वाढला त्यामुळे हवा दूषित झाली आहे. हे थांबविण्यासाठी झाडं वाढविण्याबरोबरच फवारणीसाठी रसायनांचा वापर बंद करावा लागेल तसेच मशागतीसाठी ट्न्ॅक्टर वापरणे बंद करून बैलांच्या साह्याने शेतीची हलकी मशागत करावी लागेल.

५) मातीचा पोत वाढविण्यासाठी
रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशके यामुळे, ट्न्ॅक्टरच्या मशागतीमुळे आणि अति पाणी वापरामुळे जमिनीचा पेात कमी झाला आहे. हे शासनासहित सर्व लोक मान्य करीत आहेत. हे थांबविण्यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे नियोजन करून रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशके वापरणे बंद करून जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवून त्यावर जगणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढवावी लागेल तरच जमिनीचा पोत वाढेल. तसेच ट्न्ॅक्टरची मशागत बंद करून बैलांच्या साह्याने हलकी मशागत केली तर मातीचा पोत वाढेल.

६) विषमुक्त अन्नासाठी
जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासातून शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. रासायनिक खतातील व फवारलेल्या औषधातील विष, फळे, भाज्या व धान्याच्या पेशीत व चरबीमध्ये साठवले जात आहे. त्यामुळे बाजारातून आणलेले धान्य, फळे, भाज्या कितीही धुवून घेतल्या तरीही त्यातील विष नाहीसे होत नाही. आपण खात असलेल्या अन्नाचा, फळाचा व भाज्याचा प्रत्येक घास थोडे थोडे विष आपल्या शरीरातील चरबीत साठवत असतो व ते विष जसजसा काळ जाईल तसतसे शरीरात पटीने वाढत जाते. त्यामुळे माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती घटत घटत नष्ट होते.
हे सर्व टाळायचे असेल तर देशी (गावरान) बियाणे वापरून व सेंद्रिय पदार्थ व त्यावर जगणाऱ्या जिवाणूंची मातीत संख्या वाढवून टिकाऊ व सकस, चवदार धान्य, भाज्या व फळांचे उत्पादन मिळू शकते.

७) पक्षी व इतर सजीवांची संख्या वाढविण्यासाठी -
रासायनिक शेतीतील फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या जास्त शक्तिशाली विषारी औषधामुळे हे औषध फवारलेले धान्य, भाज्या व फळे खाऊन अनेक पक्षी व प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. पूर्वी गावात कुठेही दिसणारे गिधाड व घार आता दिसत नाहीत तसेच कावळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. मोरही दिसेनासे झाले आहेत. मधमाश्यांची संख्या घटली आहे. हे टाळायचे असेल तर शेतीतील रासायनिक खतांचा व कीटकनाशक-तणनाशकांचा वापर बंद करून सेंद्रिय पद्धतीने शेती करावी लागेल.

८) पर्यावरण रक्षणासाठी शरीरश्रम करावे लागतील -
१०० वर्षांपूर्वी भारत हा खेड्यांचा देश होता. त्यावेळी शहरात कमी व खेड्यात जास्त लोक राहत होते. खेड्यातील सर्व लोक शेतीशी निगडित शरीरश्रम करून जगत होते. म्हणून त्यावेळी भारतात चोर व भिकारी जवळपास नव्हता म्हणून इथे समृद्धी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिकीकरणाला अग्रक्रम दिल्यामुळे व शेतीवरील श्रमाला कवडीमोल किंमत दिल्यामुळे आणि मेकॉलेच्या, ``चोर, भिकारी आणि गुलामीची मानसिकता'' निर्माण करणाऱ्या शिक्षण पद्धतीमुळे माणूस शरीरश्रम न करता पैसा मिळविण्यासाठी पैसा व कामचोर, लाचार, भिकारी, गुलाम बनला व माणसाने शेतीपेशा सोडून शहराचा रस्ता धरला. खरे तर शेतीवर शरीरश्रम करणे म्हणजे अन्ननिर्मिती करणे म्हणजेच नवनिर्मिती करणे. शरीरश्रमाशिवाय माणसाच्या सृजनशीलतेचा विकास होत नाही. सध्याच्या शिक्षण पद्धतीत श्रमाला कसले स्थान नाही. मेकॉलेने शिक्षणाची श्रमापासून फारकत केली आहे. कारण ब्रिटिशांना भारतीय माणसांची सृजनशीलता नष्ट करून त्याला गुलाम करायचे होते. स्वातंत्र्यानंतरसुद्धा मेकॉलेचीच शिक्षणपद्धत राज्यकर्त्यांनी कायम ठेवली.
भारतातील राज्यकर्त्यांनी, प्रस्थापित वर्गाने व शरीर श्रम न करणाऱ्या सृजनशीलता घालवून बसलेल्या लोकांनीच आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचे वाटोळे व निसर्गाची लूट केली आहे व करीत आहेत. खरोखर पर्यावरणाचे रक्षण व निसर्गाची लूट थांबवायची असेल तर माणसाला सृजनशील व्हावे लागेल. सृजनशीलतेच्या विकासासाठी माणसाला मन-मेंदू-मनगटाने शरीरश्रम करावे लागतील. सध्या शेतात काम करणारा माणूस नाखुषीने काम करतोय. त्याने खुषीने, बुद्धीने व मनापासून शेतात मनगट चालवावे लागेल तरच त्याच्या सृजनशीलतेचा विकास होईल व त्याला काम करताना निर्भेळ आनंद मिळेल. आणि तेव्हाच त्याला पर्यावरणाचे महत्त्व पटेल.

www.miloonsaryajani.com  यांच्या सौजन्याने ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल