शनिवार, ५ एप्रिल, २०१४

सेंद्रिय शेती जनजागृति अभियान

आपला आहार आरोग्यदायी आहे का?

रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके इत्यादी रसायनांचा शेतीत अर्निबध वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून त्या नापीक होत आहेत. भूजलही दूषित होत आहे. युरिया खतातील नाइट्रेटचे अंश भूजलातून पेयजलात पोहोचतात. नाइट्रेटमुळे मानवी रक्ताची प्राणवायूची वहनक्षमता घटते. हृदयविकाराचे हेसुद्धा एक कारण आहे. प्रत्येक पिकाचा एक विशिष्ट हंगाम असतो. इतर हंगामात ती पिकविल्यास रोग आणि किडींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे कीटकनाशकांचा वापरही वाढतो. म्हणजे, बिगरहंगामी पिके घेणे व त्यांचे सेवन करणे आरोग्यदृष्टय़ा अपायकारकच. केळी, आंबा आणि इतर फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर सर्वत्र आणि सर्रास होत आहे. अर्धी-कच्ची, अपक्व फळे कृत्रिमरीत्या पिकवून बाजारात आणली जातात. यामुळे केळीसारख्या सर्वाना सहज उपलब्ध असणाऱ्या फळाबाबतही आरोग्याच्या दृष्टीने शंका वाटत आहे. आंब्याची कथाही काही वेगळी नाही.

 गूळ देखणा दिसावा म्हणून घातक रसायने वापरली जातात. ती न वापरता गूळ केल्यास तो काळपट, लालसर असेल, चमकदार नसेल. असा गूळ ग्राहक पसंत करणार नाहीत, ही उत्पादकाची समजूत असते. ग्राहकांना यातले काहीच माहीत नसते. अमेरिकेत बंदी असलेले (कर्करोगकारक) भेंडीपावडर नावाने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले रसायन आता वापरात आलेय. धान्य साठविताना गोदामांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. योग्य ती काळजी न घेतल्यास तेथेही प्रदूषण संभवते. कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात हे आजार ग्रामीण भागात श्रमजीवींमध्येसुद्धा वाढत आहेत. हे आजार जंतुसंसर्गाचे नव्हे, तर आपल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आहेत.

निरोगी जीवनासाठी पर्यावरणस्नेही शेती आणि जीवनशैलीच माणसाला तारेल. आरोग्यदायी सेंद्रिय शेती त्यासाठीचे एक पाऊल आहे. मात्र आज त्याही क्षेत्राचे बाजारीकरण व्हायला लागले आहे, ही चिंतेची बाब आहे. सेंद्रिय शेतीची लोकचळवळ करण्यास शहरी ग्राहकांनी हातभार लावावा. शेतकरी कुटुंबांच्या थेट संपर्कात ते यावेत. शेतकऱ्यांचे ते मित्र बनावेत. भरमसाट नफा आकारणारी मधली कडी बाद व्हावी. शहरी जागृत ग्राहकांनी याकामी पुढाकार घेतल्यास चित्र नक्कीच बदलेल.

दै. लोकसत्ता यांचे सौजन्याने ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल