बुधवार, ९ एप्रिल, २०१४

कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर : नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात आता टोमॅटोच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे . भाजीपाला पिकात महत्त्वाचा घटक बनलेल्या टोमॅटोच्या लागवडीला दिवसेंदिवस चालना मिळते आहे . पण , टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत आहे . म्हणून या पिकाला कृषी प्रक्रिया उद्योगाची जोड देण्यात आली आहे . खासगी सहकारी भागीदारी अर्थात पीपीपी या संकल्पनेवर आधारीत केवळ जिल्ह्यातीलच नाही तर देशातील पहिला कृषी प्रक्रिया उद्योग दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे उभारण्यात आला आहे . या प्रकल्पात अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना खात्रीशीर टोमॅटोची विक्री उपलब्ध झाली आहे . १३ मे २०१२ रोजी या प्रकल्पातून हापूस आंब्याचा पल्प काढण्यास सुरुवात करण्यात आली . त्यानंतर पेरुचा पल्प काढण्यात आला . आणि आता टोमॅटोची पेस्टचे उत्पादन करण्यात येत आहे . देशात प्रथमच ७५० शेतकऱ्यांबरोबर करार करुन त्यांचा शेतीमाल थेट शेतातून प्रकल्पात आणण्यात आला . प्रकल्पात पहिल्याच वर्षी सुमारे हजार मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले . म्हणूनच पुढील वर्षी सुमारे दहा हजार मेट्रिक टन उत्पादन घेण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे . त्यासाठी हिन्दुस्थान युनिलिव्हर कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे . त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा भारताच्या नकाशावर आला आहे . यापुढील काळात या प्रकल्पातून पपई , अननस , संत्री , लिंबू पल्पचे उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे .

अनोखा प्रयोग

शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजार समितीत विक्री करण्यासाठी नेतात तेव्हा त्यावर टक्के कमिशन घेतले जाते . हमाली , वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते . मात्र , आता शेताच्या बांधावरुनच शेतीमाल घेण्याचा ट्रेण्ड रुढ होत आहे . जिल्ह्याच्या विविध भागातील जोन हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाशी जोडण्याचे विचाराधीन आहे . त्यादृष्टीने कार्यवाही सुरु आहे . बियाणे , खते यांचा पुरवठा शेतकऱ्यांना करुन त्यांचा शेतीमाल शेतातच खरेदी करण्याचा हा प्रकार आता चांगलाच रुढ झाला आहे . त्यामुळे दिवसेंदिवस अदिकाधिक शेतकरी यात जोडले जात आहेत . स्थानिक भागातच रोजगार उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह आहे . त्यामुळे येत्या काळात शेतीचे उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत . प्रकल्पातून तयार होणारा पल्प भारतासह इटली , जर्मनी , स्पेन , नेदरलँड , इजिप्त , दुबई , आखाती देशांमध्ये विक्री केला जात आहे . या प्रकल्पाने सरकारला कर रुपाने आजवर जवळपास दीड कोटी रुपये दिले आहेत . अशा प्रकारच्या प्रकल्पांचे पायाभरणी नाशकात झाल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो .

लघु ते मोठ्या उद्योगांना संधी

किमान दहा शेतकऱ्यांचा गट एकत्र आला तरी लघु कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होऊ शकतो . सहकारी तत्त्वावरही असे उद्योग सुरु होऊ शकतात . जिल्ह्यातील कृषी वाणांवर त्यामुळे प्रक्रिया करता येवू शकते . खासकरुन द्राक्ष , डाळींब , करवंद , जांभूळ , आंबा यासारखया पिकांवर प्रक्रिया करुन उत्पादित होणाऱ्या पदार्थांची देशभरात विक्री करता येवू शकते . सरकारी पातळीवरुन अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर कृषी क्षेत्राचा कायापालट होऊ शकतो .

घोटीचा तांदूळ

इगतपुरी तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे . यावरच शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन उदरनिर्वाह चालतो . भाताच्या साळीवर प्रक्रिया करून त्यापासून तांदळाची निर्मिती करणाऱ्या भात गिरण्या उभ्या राहिल्या . या भात गिरण्यांची जागा हळूहळू तांदळाच्या मिलने घेतली . यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला . त्यामुळेच आजघडीला साधारण ३०च्या आसपास तांदूळ मिल घोटी परिसरात आहेत . येथील व्यापाऱ्याचा तांदूळ विक्री हाच मुख्य व्यवसाय आहे . घोटीतून महिन्याला शेकडो ट्रक , तर वर्षाला हजारो ट्रक तांदूळ विक्री होते . तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात पिकवतात . हाच भात राज्यासह परराज्यातही विकला जातो . अगदी साध्या बारीक तांदळापासून तुकडा , बासमती असे नानाविध प्रकार घोटी परिसरात पिकतात आणि त्यांची विक्री होते . पूर्वी हातसडीचा तांदूळ मुबलक असायचा , आता मात्र तो शोधावा लागतो . अगदी किरकोळपासून ठोक विक्रीपर्यंत घोटी परिसरात तांदळाची प्रचंड उलाढाल होते .

घोटीचे मुरमुरे

पाच दशकांपूर्वी इगतपुरी तालुक्यात भाताचे विक्रमी उत्पादन होत असल्याने या भातावर प्रक्रिया करणाऱ्या विविध प्रकारच्या उद्योगांना चालना मिळाली आहे . तांदळापासून मुरमुरे , लाह्यांची निर्मिती हा त्याचाच एक भाग आहे . तांदळापासून बनणारा घोटीतील मुरमुरादेखील अत्यंत प्रसिद्ध आहे . त्यामुळेच घोटी मुरमुरा हा जणू ब्रँड बनला आहे . म्हणूनच तांदळापासून मुरमुरा निर्मितीचा व्यवसाय घोटीत भरभराटीस आला आहे . भातापासून आठ पोते लाह्यांचे उत्पादन एका भट्टीतून केले जाते . मुरमुरा उत्पादनाबरोबर सणासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या प्रसादाच्या लाह्यांची निर्मितीही येथे केली जाते . अत्यल्प भांडवलात पुरेसा नफा देणाऱ्या या व्यवसायाकडे अनेक जण आकर्षित झाले आहेत . मुरमुरा निर्मितीचे असंख्य लघु उद्योग घोटी परिसरात कार्यरत झाल्याचे दिसून येते . यामुळे घोटी गाव हे मुरमुऱ्यांसाठी प्रसिद्ध झाले आहे . या मुरमुऱ्यांनी स्थानिकांची भूक भागविण्याबरोबरच महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रमुख देवस्थानात प्रसादाच्या रूपाने हा मुरमुरा पुजेचा मानकरी ठरला आहे . हळूहळू केवळ महाराष्ट्राच्या प्रमुख बाजार पेठेत जाणारा हा चवदार मुरमुरा त्याच्या चवदारपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतही जाऊ लागला आहे . घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही या मुरमुरा भट्ट्यांनी पा रोवले आहेत . बदलत्या काळात या व्यवसायाचेही यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे . तसेच मार्केटिंगची जोड त्यास लाभली तर नक्कीच हा उद्योग जिल्ह्यासह राज्याच्या विकासावरही परिणाम करणारा ठरु शकेल . या उद्योगांना प्रोत्साहन , कर्जाची उपलब्धता , थोड्या सोयी - सवलती मिळाल्यास हा उद्योग चांगल्या प्रमाणात बहरु शकतो .

नाशिक हे कृषी क्षेत्रात अत्यंत अग्रेसर आहे . याच कृषी क्षेत्राला वेगाने विकसीत करण्याची क्षमता असणा - या कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नाशिक अत्यंत पोषक आहे . आज अल्प प्रमाणात विकसीत असलेला हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे . तसे झाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करु शकेल , अशा कृषी प्रक्रिया उद्योगाचे अस्तित्व नाशकात निर्माण होऊ शकते .

म.टा. च्या सौजन्याने....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल