बुधवार, ९ एप्रिल, २०१४

जमिन व्यवस्थापन


स्फुरदयुक्त खतांना पिकांद्वारे प्रतिसाद देण्यावर परिणाम करणारे घटक-
पिकांस माती परिक्षणानुसार स्फुरदयुक्त खते देत असतांना त्याव्यतिरिक्त देखिल काही महत्वपुर्ण घटक स्फुरद उपलब्धतेवर परिणाम करित असतात. या मध्ये मातीचे स्वरुप, जमिनीतील हवेचे प्रमाण, जमिनीचे तापमान, जमिनीतील पाण्याचे प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेद्रिय पदार्थ, मातीचा सामु, इतर अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म तसेच पिकाचा प्रकार या घटकांचा समावेश होतो.याशिवाय खतांचे स्वरुप, खतांची पाण्यातील विद्राव्यता तसेच स्फुरदचे रासायनिक स्वरुप देखिल त्याच्या उपलबेधतेवर परिणाम करित असते.
मातीचे स्वरुप- ज्या जमिनीतील माती हि जाड कणांनी बनलेली असते त्या जमिनीत स्फुरदयुक्त खतांचे वहन होण्यात अडचणी येतात. ज्या जमिनीतील माती बारीक किंवा सुक्ष्म कणांनी बनलेली असते त्या जमिनीत स्फुरदचे वहन जरी व्यवस्थितरित्या होत असले तरी देखिल स्फुरदचे स्थिरीकरण होणे जलद रित्या पार पडते. अशा जमिनीत स्फुरदयुक्त खते जास्त प्रमाणात द्यावी लागतात.
जमिनीतील हवा-पाण्याचे गुणोत्तर - मुळांद्वारे स्फुरदचे शोषण होण्यासाठी कर्बोदकांची गरज भासते. कर्बोदकांपासुन आवश्यक ती उर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. जर जमिनीतील मातीचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असतिल तर त्यातुन हवा खेळती राहत नाही, व मुळांना योग्य तो ऑक्सिजन न मिळाल्याने कर्बोदकांपासुन उर्जा निर्मिती होत नाही. त्यामुळे स्फुरद शोषणावर विपरित परिणाम होतो.
मातीचे कण घट्ट असल्यामुळे स्फुरदच्या वहनात देखिल अडथळे निर्माण होतात.
जमिनीचे तापमान व आर्द्रता- कमी तापमानामुळे स्फुरदच्या उपलब्धेतेवर विपरित परिणाम होतो. कमी तापमानात मुळांची वाढ देखिल कमी होते. तसेच कमी आर्द्रतेमुळे देखिल स्फुरदची उपलब्धता कमी होते.
जमिनीचे रासायनिक गुणधर्म - जमिनीतील कॅल्शियम, लोह व अल्युमिनीयम मुलद्रव्यांमुळे स्फुरदचे स्थिरीकरण होते. जमिनीतील सेद्रिंय कर्बाच्या प्रमाणानुसार तसेच सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणानुसार स्फुरदची उपल्बधता वाढते. जास्त सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत स्फुरदची उपलब्धता वाढते. जमिनीचा सामु ६ ते ७ च्या दरम्यान असल्यास स्फुरदची उपलब्धता जास्त असते.
जमिनीत झिक (जस्त) यु्क्त खतांसोबत स्फुरदचा वापर केल्यास झिंकची कमतरता जाणवते. तसेच अमोनिकल-नत्र (NH4-N) च्या उपस्थितीत जमिनीचा सामु कमी होत असल्याने स्फुरदची उपलब्धता वाढते.
स्फुरदयुक्त खते जमिनीच्या वरच्या थरात राहत असल्या कारणाने तेथुनच पिकांस मिळतात, मात्र पाण्याचा ताण बसल्यास हि खते तेथुन पिकास मिळत नाहीत, अर्थात अशा वरील थरात कायम पाणी राहणे मुश्किलच असते, त्यामुळे स्फुरदयुक्त खते जमिनीत थोडी खोलवर टाकावीत.
रासायनिक खते आणि त्यांच्या वापराने जमिनीच्या सामुवर होणारा परिणाम

अमोनियम सल्फेट 20-00-00 220-450 ग्रॅम वेगवान अती आम्ल (जास्त असिडीक)
कॅल्शियम नायट्रेट 15-00-00 340-680 ग्रॅम वेगवान विम्ल (अल्कलाइन)
पोटॅशियम नायट्रेट 13-00-45 220-450 ग्रॅम वेगवान न्युट्रल
अमोनियम नायट्रेट 34-00-00 110-220 ग्रॅम वेगवान आम्ल (असिडीक)
युरिया 46-00-00 110-220 ग्रॅम वेगवान किंचित आम्ल
डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) 18-00-46 110-340 ग्रॅम वेगवान आम्ल
पोटॅशियम क्लोराईड (एमओपी) 00-00-60 110-340 ग्रॅम वेगवान न्युट्रल
पोटॅशियम सल्फेट (एसओपी) 00-00-50 220-450 ग्रॅम वेगवान न्युट्रल
जिप्सम - 1-2.25 किलो मध्यम विम्ल (अल्कलाईन)
गंधक - 450-900 ग्रॅम संथ आम्ल
बोनमिल - 2.25 किलो संथ विम्ल (अल्कलाईन)
संदर्भ - मिसिसिपी युनिव्हर्सिटी, अमेरिका
वरिल माहीतीनुसार जर १०० स्क्वेअर फुट क्षेत्रात 110-220 ग्रॅम युरिया टाकला तर तेवढ्या परिसरातील जमिनीच्या सामुवर टाकलेल्या प्रमाणातील युरिया आम्ल धर्मिय अभिक्रिया करेल, म्हणजेच जर जमिनीचा सामु जास्त असेल तर तो काही प्रमाणात कमी करेल. यावरुन हे लक्षात येते की, खतांच्या सामुवरिल परिणामानुसार जमिनीच्या सामु वर परिणाम करणारी खते निवडावीत.

माती परिक्षण करताय थोडा विचार करा

माती परिक्षण करुन पिकास त्या परिक्षणाच्या आधारे खते देणे हे शास्रिय दृष्ट्या योग्यच आहे. बहुतेक करुन माती परिक्षण करीत असतांना आपणास सांगण्यात येते की, ज्या ठीकाणी पिक नसेल किंवा खते पडत नसतिल त्या ठिकणाची माती आणावी. हे शेताच्या मातीचे परिक्षण करण्यासाठी योग्य आहे. कारण यातुन शेतात असणारी अन्नद्रव्ये आपणास कळणार आहेत. परंतु पिक तर सबंध शेतात वाढत नाही, त्याच्या मुळ्या ह्यातर काही ठराविक भागच व्याप्त करित असतात. आपण पिकांस खते देतांना देखिल ती मुळांच्या परिसरातच देत असतो. जमिनीच्या रासायनिक अभिक्रिया ह्या मुळांजवळील परिसरातच जास्त प्रमाणात घडत असतात. जमिनीत टाकली जाणारी विविध सेंद्रिय व रासायनिक खते काही प्रमाणात तेथिल जमिनीवर परिणाम करित असतातच. तेव्हा माती परिक्षणाचा जेथे पिक किंवा पिकाच्या मुळ्या नाहीत तेथिल रिपोर्ट हा जेथे मुळ्या आहेत त्यापेक्षा वेगळा हा असणारच. वर्षानुवर्षे पिकास खते देवुन देवुन त्या परिसरातील खतांचे प्रमाण वाढलेले असणारच हा प्रकार साधराणतः फळबागांबाबत जास्त घडेल, मग आपण माती परिक्षण अहवालानुसार कसे काय पिक संगोपन करु शकत असु कारण तो रिपोर्ट तर जेथे मुळ्या नाहीत तेथला आहे.
जेथे पिकाच्या मुळा वाढतात तो परिसर रायझोस्पिअर म्हणुन ओळखला जातो. हा रायझोस्पिअरच आपणासाठी महत्वाचा आहे. माती परिक्षण करित असतांना या परिसरातील रासायनिक खते टाकण्यापुर्वी माती काढुन तीचे परिक्षण केल्यास काही महत्वाच्या बाबींचा तपास लावणे सोपे जाईल, जसे त्या परिसरातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, तसेच त्या परिसरातील कॅटायन एक्सचेंज कॅपिसिटी, सामु वै, शिवाय नेहमीच्या पध्दतीने तपासलेल्या नुमन्याशी याची पडताळणी करुन बघता येईल. ज्यावरुन आपणास आपल्या विविध रासायनिक तसेच सेंद्रिय खतांच्या वापराने जमिनीवर काय परिणाम होतो आहे हे स्पष्ट होईल.

पिके अन्नद्रव्ये कशी शोषुन घेतात

पिकाच्या मुळ्या ह्या मुद्दाम ठरवुन काही अन्नद्रव्यांच्या साठ्यापर्यंत वाढीत नाहीत. जमिनीत असलेली अन्नद्रव्ये मुळांच्या जवळ असली हवीत. ह्या अन्नद्रव्यांचे मुळांमध्ये वहन किंवा प्रवेश खालिल पैकी एका किंवा अनेक मार्गांनी होत असतो.

मुळांमध्ये शिरणे (रुट इंटरसेप्शन) -
मुळा वाढीत असतांना त्या कधी कधी ज्या ठीकाणी अन्नद्रव्ये आहेत त्या साठ्याच्या ठिकाणी जाउन पोहचतात. अशा वेळेस तेथिल अन्नद्रव्ये मुळ्यांमध्ये शिरतात. हा प्रकार असा आहे जसा शि-याच्या कढईत चमचा टाकणे.

पाण्याच्या वहना द्वारे (मास फ्लो) -
जमिनीत असलेली अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात आणि पिक जेव्हा पाणी शोषुन घेते त्याद्वारे ती मुळांमध्ये शिरतात.

डिफ्युजन -
स्फुरद व पालाश सारखी अन्नद्रव्ये मातीच्या सुक्ष्म कणांवर पक्की आर्कषली जातात त्यामुळे ती काही प्रमाणातच जमिनीतील पाण्यात असतात. ज्यावेळेस मुळे त्यांच्या जवळील मातीच्या कणांतुन अन्नद्रव्ये शोषुन घेतात त्या वेळेस त्या मातीच्या कणांवरील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते व ते अन्नद्रव्य ते शेजारील कणीवरुन मिळवतात असे मिळवलेले अन्नद्रव्य पुन्हा मुळांद्वारे शोषले जाते. अशा प्रकारे डिफ्युजन क्रियेद्वारे पिकाच्या मुळ्या अन्नद्रव्य ग्रहण करतात.
खालिल टेबल मध्ये मका पिकाद्वारे वरिल तिन प्रकारे किती अन्नद्रव्य ग्रहण केले जाते ते दिलेले आहे.

नत्र <1% 80% 19%
स्फुरद 2% 5% 93%
पालाश 2% 18% 80%
कॅल्शियम 150% 375% 0
मॅगनेशियम 33% 600% 0
गंधक 5% 300% 0
संदर्भ - स्प्रक्टम अनालिसिस,अमेरीका

मातीचा सामु कमी करणे
मातीचा सामु कमी करणे ही एक खर्चिक बाब आहे. जास्त उत्पन्न देणा-या पिकांसाठीच ती परवडणारी आहे. विविध स्रोतांकडुन घेतलेल्या माहीतीवरुन खालिल टेबल मध्ये सध्याच्या सामु आणि हवा असलेल्या सामु साठी किती सल्फर टाकावे हे दिलेले आहे. यात कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी देखिल ठरवता येणार आहे. समजा सध्याचा सामु आहे 8.5 आणि आपणास तो ६.५ पर्यंत कमी करावयाचा आहे तर १ सी.ई.सी. साठी 200 किलो, ५ सी.ई.सी. साठी 500 किलो या प्रमाणे सल्फर टाकावे. या ठीकणी सी.ई.सी. म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी आहे. सी.ई.सी. आणि इ.सी. वेगवेगळ्या संज्ञा आहेत. इ.सी. म्हणजे केवळ मातीतुन किती करंट (विद्युत प्रवाह) वाहतो हे होय, या वरुन केवळ एकुण विरघळलेले क्षार कळतात, तर सी.इ.सी. वरुन जमिनीतील विविध धनभार (पॉझिटीव्ह) मुलद्रव्यांचे प्रमाण कळते ज्यावरुन पिकास जमिन किती अन्नद्रव्ये देणार आहे हे स्पष्टपणे सांगता येते, जे केवळ इ.सी. वरुन कळत नाही. तथापी इ.सी. प्रमाणे सी.इ.सी. बाबत असे सांगता येत नाही की तो किती असवा.

8.0 ५.५ 346 किलो 692 किलो
8.5 5.5 494 किलो 988 किलो
7.0 6.0 85 किलो 171 किलो
7.5 6.0 155 किलो 311 किलो
8.0 6.0 309 किलो 618 किलो
8.5 6.0 474 किलो 948 किलो
8.0 6.5 272 किलो 544 किलो
8.5 6.5 453 किलो 906 किलो
8.0 7.0 235 किलो 470 किलो
8.0 7.5 198 किलो 396 किलो
संदर्भ - वेर्स्टन फर्टिलायझर हॅन्डबुक ७ वी आवृत्ती-नर्सरी मॅनेजमेंट २ री आवृत्ती. एच. डेव्हीडसन १९८८ द हायबुश ब्लुबेरी प्रोडक्शन गाईड, नॉर्थईस्ट रिजनल अग्रिकल्चरल इजी. सर्विस, एम.पॅर्टीस आणि जे हॅनकॉक १९९२ आणि व्हेजीटेबल ग्रोईंग हॅन्डबुक डब्ल्यु ई स्पिटलस्टोसर
वरिल तक्त्यानुसार एक एकऱ क्षेत्राचा सामु बदलविण्यासाठी ९९ टक्के सल्फर किती किलो लागेल हे दिलेले आहे, मात्र जमिनीत जर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया नसतिल तर हि प्रक्रिया होत नाही. त्यामुळे सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया जमिनीत घालणे गरजेचे आहे. तसेच या प्रक्रियेस ८ ते १२ महिने कालावधी लागतो. उपाययोजना केल्यानंतर जमिनीचे परिक्षण करुन घेणे गरजेचे आहे.

बेड तयार करणे
विविध पिकांची लागवड करित असतांना बेड किंवा वाफे तयार करुन लागवड करणे फायदेशिर ठरते आहे. बेड तयार करित असतांना खालिल बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

आले, हळद कंद माशी फ्युजॅरियम, बॅक्टेरियल विल्ट लोह, जस्त (फेरस, झिंक), पालाश, स्फुरद
मिरची कट वर्म ,निमॅटोड फ्युजॅरियम, पिथियम, डॅंपिंग ऑफ स्फुरद, नत्र, बोरॉन, कॅल्शियम
टोमॅटो कट वर्म .निमॅटोड फ्युजॅरियम, पिथियम, डँपिग ऑफ कॅल्शियम, स्फुरद, पालाश, बोरॉन

वरिल प्रमाणे पिकाच्या पोषणाशी तसेच निरोगी वाढीसाठी अढथळा ठरणारे बरेच जीव नियंत्रणात आणण्यासाठी बेड ची रचना मह्तवपुर्ण ठरु शकते. बेड मधिल निंबोळी पेंड, करंज पेंड चा वापर निमॅटोड, तसेच इतर किडींच्या नियंत्रणास मदत करतो. शिवाय बेड मधिल शेणखत तसेच पेंडींमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढुन पिकाच्या वाढीसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये पिकास मिळण्यास मदत मिळते. आदर्श बेड मध्ये पाणी धरुन ठेवण्याची तसेच पाण्याचा उत्तम निचरा होण्याची क्षमता एकाच वेळेस असणे गरजेचे आहे.


घटक प्रमाण किलो
माती 4० किलो
गाळ 4० किलो
निंबोळीपेंड 5 किलो
गांडुळ खत 5 किलो
शेणखत 10 किलो
एकुण 100 किलो
एकुण सेंद्रिय कर्ब 2.5 ते 3.8%
एकुण नत्र 0.75-1.14%
कार्बन-नायट्रोजन रेशो  3.33

वरिल तक्त्यात प्रातिनीधिक स्वरुपातील बेड चे मिक्षण कसे असावे हे दिलेले आहे. त्यात शेणखत तसेच गांडुळ खताचे प्रमाण वाढुवुन घेता येवु शकते. मात्र फार जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यास पिकाच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम देखिल जाणवतो, कारण सेंद्रिय पदार्थांच्या वाढीसोबतच जमिनीचा किंवा बेड चा कार्ब-नायट्रोजन रेशो देखिल बदलत असतो. तो ३ किवा त्यापेक्षा कमी असल्यास जमिनीतील हानीकारक बुरशी जसे पिथियम, फ्युजॅरियम वै च्या वाढीसाठी अनुकुल ठरतो, तसेच त्यापेक्षा जास्त असल्यास हानीकारक बॅक्टेरियाच्या वाढीसाठी अनुकुल ठरतो. जमिनीत टाकण्यात आलेल्या सेद्रिय खतांतील तसेच मातीतील कार्बन च्या प्रमाणास नत्राच्या प्रमाणाने भागितले असता कार्बन-नायट्रोजन रेशो समजतो. हा रेशो माहीत असल्यावर पिकाच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची तसेच पिकावर येणा-या विविध रोगांची अटकळ बांधणे सोपे जाते. (संदर्भ- कार्बन-नायट्रोजन रेशो ऑफ फ्लडेड सॉईलस्)













http://www.haritpane.com यांच्या सौजन्याने  ...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल