मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

जाणून घ्या गैरसमज जे शेतकऱ्यास यशस्वी होण्यापासून रोखतात...

जाणून घ्या गैरसमज जे शेतकऱ्यास यशस्वी होण्यापासून रोखतात

गैरसमज म्हणजे तथ्य व  विचारातील अंतर. असे चुकीचे विचार जे आपल्याला योग्य व फायदेशीर कृती करण्यापासून रोखतात. शेतकरी बांधवांच्या मनात देखील असे काही गैरसमज घर करून बसतात ज्यामुळे ते जोखडात बांधले जातात. यातील काही महत्वाचे गैरसमज कोणते ते बघू.
शेतकरी म्हणजे काही उद्योजक नाही - हा सर्वात मोठा व महत्वाचा गैरसमज आहे. जो शेतकरी स्वत:च्या गरजेव्यतिरिक्त अन्नधान्य पिकवतो व बाजारात विकतो तो उद्योजक नाही तर काय?कुठलीही शाश्वती नसतांना जमिन तयार करतो, बी पेरतो, पिकास जपतो; माणसे राबवतो त्यांची पोटे भरतो, अडीनडी ला पुरतो. विक्रीतून येणाऱ्या पैशाचा शेवटचा हिस्सा ठेवतो. नफा-तोट्याचा विचार न करता एव्हडी धडाडी दाखवणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक. उद्योजक यापेक्षा वेगळा असतो का? मित्रहो. कुणीही जन्माने उद्योजक असतो का? ती एक मानसिकता आहे. जो जोपासेल तो उद्योजक!
फसवणूक केल्याशिवाय पर्यायच नाही - उद्योजकतेत कुठलाही शॉर्ट कट मारणे शक्य नाही. मोह कुणाला होत नाही..मला होतो..तुम्हालाही होईलच. नाशिक हून येतांना रस्त्यात कांद्याची गोणी घेतली. घरी येवून लक्षात आले कि कांदा पार खराब आहे. महिन्यातून एकदा तरी नाशिक ला चक्कर होतो पण आता तिथून कांदा घेतच नाही. शेतकऱ्याचा फायदा झाला कि तोटा?  अनेक लोक म्हणतात कि आम्ही प्रामाणिक आहोत म्हणून उद्योग-शेती करत नाही. असे लोक सारासार खोटारडे असतात त्यांच्यात दमखम नसतोच, अंगात काम नसते, स्वत:वर विश्वास नसतो. शेती करतील तरी कुठून?
नशीब सर्वात महत्वाचे आहे - नशीबात असावे लागते हे खरे आहे पण त्यासाठी नशीब आजमावून पहाणे गरजेचे आहे. नशीब अचानक उजळत नसते, त्यासाठी पहिले प्रयत्न आवश्यक आहे. केळीला अचानक चांगला भाव मिळाला तर एकाच्या जागी लाख मिळतील पण त्यासाठी पहिले बाग लावणे आलेच ना! बाग न लावता तुमच्या केळ्याला भाव मिळेल का? एखाद्या सुंदर मुली सोबत दिवस घालवायचा असेल तर तिच्याशी बोलावे लागेलच ना? एम एफ हुसेन हा चित्रकार चित्र काढण्यापूर्वी त्या चित्राचा लिलाव करायचा! विचार करा न काढलेल्या चित्रासाठी करोडो रुपयाची बोली लावून विकणारी व्यक्ती असे फक्त नशिबाच्या जोरावर करत होती का?. एम एफ हुसेन ने दीर्घकाळ संघर्ष केला होता, रोजची पायपीट, रस्त्यावर चित्र काढून - उन्हा तान्हात केलेली मेहनत, अनेक लोकांशी प्रस्थापित केलेले संबंध व सौदा करायची वृत्ती यातून हा उद्योगी चित्रकार अजरामर झाला!आपल्या गरीबीची व वणवण भटकंतीची आठवण रहावी म्हणून गर्भश्रीमंत झाल्यावर देखिल त्याने पायात कधीच चप्पल घातली नाही!
स्वार्थी माणसेच पुढे जातात:  हे खरे कसे असू शकते? एखाद्या श्रीमंत शेतकऱ्याकडे जावून बघा. तो किती लोकांना नियमित रोजगार देतो? शेतात किती यंत्रणा उभी केली आहे? हि यंत्रणा उभी करण्यासाठी त्याने बँकेला व्याजाच्या स्वरुपात नफा दिला, यंत्र निर्मिती करण्याऱ्या उद्योगास फायदा पोहोचवला. योग्य वेळी खत मिळावे म्हणून त्याने किती खटाटोप केला?  इतरांना फायदा दिल्याशिवाय तुम्ही पुढे जावूच शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. पुढे जायचे असेल तर दळभद्री स्वार्थ बाजूला ठेवावाच लागेल!
आम्ही जे पिक घेतो, नेमका त्यालाच भाव मिळत नाही: असे कोणते पिक आहे ज्याला सातत्याने चांगला भाव मिळतो? बाजारात उतार चढाव होणे अपरिहार्य आहे. कोणताही एक हंगाम किंवा कोणतेही एक पिक तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. सातत्याने जोखीम कमी करून, विविध पिके घेवून, उच्च उत्पादकतेवर भर दिल्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. 
भांडवल असल्या खेरीज शेतीत नफा नाही: अंडा पहिले या मुर्गी? या प्रश्नात खूप काही दडलय. जो पर्यंत तुमचे  ज्ञान, हातोटी, लकब, मेहनत या बद्दल कुणाला खात्री वाटत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला भांडवल का देयील? भांडवल महत्वाचे आहेच पण ते फक्त होतकरू लोकांनाच मिळते.  तुमच्या जवळ जे आहे त्याचा योग्य वापर करा, ज्ञान मिळवा, कसब विकसित करा, चांगले सबंध वाढवा - भांडवलदार तुम्हाला शोधत येतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल