बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

आयुष्य म्हटलं कि संघर्ष आलाच. मिल्खा सिंग हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी झाली, अन अक्षरशः हजारो लोकांची कत्तल झाली. लाखो निर्वासितांचे संसार उध्वस्त झाले. बारा वर्षाच्या त्या पोराने आपल्या डोळ्यादेखत आपल्या आई वडिलांची, आपल्या भावाची, बहिणींची आणि आप्तांची कत्तल होताना पाहिली. आभाळच फाटल्यावर ढिगळ तरी कुठे कुठे म्हणून लावणार ? दुःखाचा डोंगर खांद्यावर घेऊन मोठ्या हिमतीने, मोठ्या जिद्दीने तॊ उभा राहिला, तेव्हा ह्या अफाट जगात मिल्खा सिंघच्या सभोवताली गडद अंधार होता. त्याच्या जीवनाला न कुठली दिशा होती, न कुठलं भविष्य. पण ईश्वरावर त्याची प्रचंड श्रद्धा होती. त्या श्रद्धेच्या बळावरच त्याने एक स्वप्नं पाहिलं- केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एक उत्कृष्ट धावपटू होण्याचं. त्याने आपलं स्वप्नं तर साकार केलंच, पण देशातील लाखो निर्वासितांना त्याने जगण्याची एक नवीन उमेद दिली. मिल्खा सिंघच्या त्या अफाट जिद्दीला, त्याच्या त्या भव्य स्वप्नाला माझा त्रिवार सलाम ! बारा वर्षाचा मिल्खा निर्वासितांच्या छावणीत दाखल झाला, अन तिथे त्याला वाईट मुलांची सागत लाभली. त्या संगतीने तो चोरऱ्यामाऱ्या करू लागला. आयुष्य भरकटत चाललं होतं. दहा बारा वर्षाच्या त्या कालखंडाने त्याला अट्टल गुन्हेगारीकडे वळवलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच घडवायचं होतं. गावातल्याच एका तरुणीच्या प्रेमात तो पडला, अन त्याने गुन्हेगारीकडे कायमची पाठ फ़िरवली. मिलिटरी मद्धे प्रवेश घेण्यासाठी त्याला अक्षरशहा कसरतच करावी लागली. सतत तीन वेळा तो अपयशी ठरला. चौथ्या प्रयत्नात मात्र तो यशस्वी ठरला. मिलिटरीत दाखल होणं त्याच्या आयुष्याचा टर्निंग पोईंट ठरला. तिथेच त्याचा परिचय काही नामांकित धावपटूशी झाला. आणि आपणही एक उत्कृष्ट धावपटू व्हायचं स्वप्नं त्याने उराशी बाळगलं. तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या होत्या. तो त्या सर्वाना पुरून उरला. बघता बघता त्याने २०० मीटर्स आणि ४०० मीटर्समद्धे राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित केले. कधी आशियाई स्पर्धा, तर कधी राष्ट्रकुल स्पर्धा, तर कधी ऑलिम्पिक स्पर्धा मद्धे भाग घेऊन त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकत ठेवला. संपूर्ण जगातल्या प्रत्येक स्पर्धेमद्धे भाग घेऊन मिल्खा एक ते तीन क्रमांक मिळवत राहिला. कुठल्या सोयी, सुविधा नसतानाही मिल्खा जीव तोडून मेहनत करत राहिला. ४०० मीटर मधील विश्व विक्रमही त्याने मोडला. कधी कधी तर तोंडातून रक्त सांडेपर्यंत तो प्रचंड मेहनत घ्यायचा. पैसा कमावणं त्याचं ध्येय नव्हतं. तर देशाचं नाव साऱ्या जगात गाजावं हि त्याची मनीषा होती. रोम ऑलिम्पिकमद्धे जबरदस्त स्पर्धा झाली. तिसर्या क्रमांकासाठी मिल्खाने ४५.६ अशी वेळ दिली तर प्रतिस्पर्ध्याने ४५.५ सेकन्द. त्या एका क्षणाला मिल्खाने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं नसतं तर त्याच्या पदरी कांस्य पदक पडलं असतं. मिल्खाला ती हळहळ मग कायम टोचत राहिली. तरीही त्याने केलेल्या भीम पराक्रमाने प्रेरित होऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला भेटायला बोलावलं. त्याचा पद्मश्री किताबाने सन्मान केला. अन त्याला भारत पाकिस्तान संबंधामधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानमद्धे जाउन पाकिस्तानच्या गाजलेल्या खेळाडूशी स्पर्धा करण्याची विनंती केली. ज्या पाकिस्तान ने त्याच उभं आयुष्य उध्वस्त केलं होतं, त्या पाकिस्तानात जायला मिल्खा तयार नव्हता. पण पान्दिताजीना नकार देणं त्याला जड गेलं. त्याने स्पर्धेत भाग घेतला तेव्हा पुरा देश रेडियोवर त्या स्पर्धेचे समालोचन कान देऊन ऐकत होता. मिल्खाने ती स्पर्धा मोठ्या रुबाबात जिंकली , तेव्हा पंडितजींनी पुर्या देशाला त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून आपला आनंद व्यक्त केला. आजही 84 वर्षाचे मिल्खा सिंग फाळणीच्या आठवणींनी व्यथित होतात. त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ खेळाडू आहे. मित्रानो, आयुष्य म्हटलं कि संघर्ष आलाच. कधी दुःखाचा डोंगर कोसळून होत्याचं नव्हतं होईल याचा नेम नाहि. अशावेळी मिल्खा सिंग यांची कहाणी तुम्हाला नक्कीच एक नवीन सामर्थ्य देणारी ठरेल यात तिळमात्र शंका नाहि. त्यांच्या जीवनावर आधारित " भाग मिल्खा भाग " हा चित्रपट " रंग दे बसंती " हा नितांत सुंदर चित्रपट देणाऱ्या राकेश मेहराने सादर केला आहे. तो अवश्य पाहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल