बुधवार, २५ जानेवारी, २०१७

बाळासाहेब, मार्मिक आणि मी


एकीकडे ‘मार्मिक’ दुसरीकडे शिवसेना.. बाळासाहेब ठाकरे यांचा झांझावाती प्रवास सुरू झाला होता. त्या काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहिलेली ही शब्दांजली
‘मार्मिक’ हे बाळासाहेबांचे पहिले प्रेम होते. १३ ऑगस्ट १९६० साली बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केले तेव्हा ते व्यंगचित्रकार म्हणून खूप मोठे झाले होते. तरीही त्या काळात साप्ताहिक सुरू करणे हेच खूप धाडसाचे होते. कारण इतर साप्ताहिके बंद पडत होती. व्यंगचित्र साप्ताहिक ही संकल्पनाच खूप दुर्मिळ होती. देशात केवळ ‘शंकर्स विकली’ हे एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक होते. मराठीत व्यंगचित्राची परंपरा होती, पण ती कौटुंबिक स्वरूपाची. अशा वातावरणात बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून उदयाला आले होते. राजकीय व्यंगचित्र ही संकल्पना मराठीमध्ये रुजवली, विकसित केली ती बाळासाहेबांनी. नुसतेच व्यंगचित्र पाहून त्यातून दोन घटका करमणूक अशी त्यांची भूमिका अजिबात नव्हती. त्यातून लोकांना काहीतरी विचारप्रवर्तक, उद्बोधक मिळावे असे त्यांना वाटे. हे सारे ‘मार्मिक’मध्ये होते. ‘मार्मिक’ची बीजे बाळासाहेबांच्या मनात ‘फ्री प्रेस’मध्ये असतानाच रुजली होती. मराठी माणसाला डावलण्याची दाक्षिणात्यांची वृत्ती त्यांच्या मनाला चरे पाडत होती. किंबहुना फ्री प्रेसमध्येदेखील त्यांना असा अनुभव आला होता. या अशा छोटय़ा- मोठय़ा घटना बाळासाहेबांच्या मनावर परिणाम करत होत्या. मराठी माणसाबद्दल होत असणाऱ्या दुजाभावावर तत्कालीन वृत्तपत्रेदेखील बोलत नसत. आपली बाजू मांडणारे कोणीतरी हवे ही मराठी माणसाची भावना बाळासाहेबांना ‘मार्मिक’च्या दिशेने घेऊन गेली असे म्हणावे लागेल.
अशा वातावरणात ‘मार्मिक’ सुरू झाले. मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडणं ही त्यांची प्रेरणा होती. बाळासाहेबांची व्यंगचित्रे हे मार्मिकचे आकर्षण तर होतेच, पण त्याचबरोबर श्रीकांतजीचे सिने फिक्शन, अंधेरनगरी या सदरांमु़ळे ‘मार्मिक’चा इतर साप्ताहिकांपेक्षा वेगळा प्रभाव पडला. ‘मार्मिक’कडे पत्रांचा ओघ सुरू झाला. मार्मिक लोकप्रिय होत होते. कारण बाळासाहेब सामन्यांची भाषा मांडत होते. तेदेखील व्यंगचित्रांच्या माध्यमातून. मराठी मनाची सारी खदखद त्यातून व्यक्त होत होती. दाक्षिणात्य अधिकाऱ्यांच्या याद्या ‘वाचा आणि स्वस्थ बसा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे त्याचे रूपांतर ‘वाचा आणि उठा’ असे झाले. जनमानस तयार होत होते, आता या साऱ्याला संघटनेचे स्वरूप देणे गरजेचे होते. दादा म्हणजेच प्रबोधनकारांनी आम्हा सर्वाना एकत्र बसवले. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले, ‘आता याला योग्य ते वळण द्या. संघटना स्थापन करा.’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘करू या, पण नाव काय द्यायचं?’’ समोरच शिवरायांचा पुतळा होता. दादा म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शिवाजीचा, तुझी संघटना शिवाजीची हे सारे त्याचे सनिक, त्यांची ही सेना, तेव्हा नाव शिवसेना असू दे.’’ शिवसेनेची स्थापना ही अशी झाली.
लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘मार्मिक’ होताच. ‘मार्मिक’मध्ये आम्ही छोटी चौकट द्यायचो. अमुक अमुक ठिकाणी मीटिंग आहे. त्यातून लोकांना माहिती मिळायची. त्या माहितीतीतून त्यांचा प्रतिसाद वाढत गेला. सेना आणि ‘मार्मिक’ एकमेकांच्या हातात हात घालूनच वाढत होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मार्मिक’चे ४६०० एजंट होते, इतके मार्मिक लोकप्रिय झाले होते. ‘मार्मिक’ हे बाळासाहेबांचे पहिले प्रेम होते, त्यांची व्यंगचित्रे हे ‘मार्मिक’चे बलस्थान होते. पुढे आंदोलने होत गेली. ७० सालच्या आंदोलनात बाळासाहेब तुरुंगातून बाहेर आल्यावर दुसऱ्या दिवशी परळ, लालबाग विभागांत सर्वाची विचारपूस करत पायी फिरले. त्यानंतर ते परळमध्ये सर्वाबरोबर एकत्र बसले होते तेथेच त्यांनी कागद मागवून ‘रविवारची जत्रा’ तयार करून दिली. सार्वजनिक अलिप्तपणा हा बाळासाहेबांचा खूप मोठा गुण होता. मार्मिकच्या व्यंगचित्रांबाबत बाळासाहेब खूपच वक्तशीर आणि आग्रही असायचे. कधी कधी मला बस पकडून बंगल्यावर पोहचायला उशीर व्हायचा, पण बाळासाहेब दर सोमवारी संध्याकाळी ‘मार्मिक’च्या कव्हरचे व्यंगचित्र तयार करून त्याची रबर लावलेली गुंडाळी घेऊन खिडकीत उभे असायचे. मंगळवारी संध्याकाळी ‘रविवारची जत्रा’ तयार करून पुन्हा असेच तयार असायचे. त्यावेळी आम्ही ‘सांज मार्मिक,’ ‘शिवगर्जना,’ ‘मार्मिक’ असे तीन अंक काढायचो. बाळासाहेब या तिन्ही अंकांमध्ये सक्रिय होते. त्यांचे त्या काळात खूप दौरे होत. पण दौऱ्यावर असताना ते निश्चिंत असत. त्यांना माहीत असायचे की ‘मार्मिक’ची चिंता करायची गरज नाही. आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल इतका नििश्चत असलेला असा हा एकमेव संपादक होता असे म्हणावे लागेल.मी मुंबईत ५५-५६ च्या दरम्यान आलो, रेडिओ लॅम्पमध्ये वर्कर म्हणून काम करायचो. तेथील दाक्षिण्यात्य व गुजर मारवाडी आम्हाला जेवताना जाणूनबुजून डिवचायचे ‘अरे, हम आया करके तुमको रोटी मिलता है..’ म्हणायचे. आम्ही सगळेच खूप अगतिक होतो. याच काळात मी बाळासाहेबांच्या संपर्कात आलो. प्रबोधनकारांनी माझे अक्षर चांगले म्हणून मला लेखनिकाचे काम दिले होते. त्यांच्या तालमीत मी तयार होत होतो. सुरुवातीला माझी लिखाणाची भाषा खूप प्रौढ होती. दादांनी मला सोप्या भाषेत कसे लिहायचे ते शिकवले. त्यासाठी आपला वाचक कोण हे जाणून सोपे, लहान वाक्ये लिहा, असे ते सांगत. दादा असे पत्रकारितेचे धडे देत असत.
‘मार्मिक’मध्ये माझी कारकीर्द सुरू झाली. मुळात हे दुहेरी नाते होते. मी मुळातच शिवसनिक असल्यामुळे माझ्या कामातल्या निष्ठेबाबत बाळासाहेबांना खात्री होती. पुढे मी प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून ‘मार्मिक’ सोडून गेलो. पुन्हा ९१ मध्ये ‘मार्मिक’मध्ये परत आलो. मी मध्यंतरी ‘मार्मिक’मध्ये नव्हतो याचा कसलाही किंतु, दुजाभाव बाळासाहेबांनी कधीच बाळगला नाही. किंबहुना ते प्रेमाने हक्काने सर्वाना सांगत, ‘‘पंढरी पत्रकार -लेखक म्हणून आमच्या घरचे प्रॉडक्ट आहे.’’ हा जो बाळासाहेबांचा आपलेपणा होता तो अन्य कोणत्याच नेत्यात आढळत नाही.
‘मार्मिक’मध्ये मी नवशिक्या पत्रकार होतो. कधी कधी चुका व्हायच्या. कधी कधी एखादा लेख जमायचा नाही. पण बाळासाहेब कधी टोचून बोलायचे नाहीत. त्यांची सांगण्याची पद्धतच वेगळी होती. ते सांगायचे, ‘‘हे बघ. मागे एकदा तू कसा ट्विस्ट दिला 
होतास, तसा आता काही आला नाही.’’ मला ते बोलवायचे आणि माझा लेख वाचायचे. म्हणजे तो आधी त्यांनी वाचलेला असायचा, पण माझ्यासमोर पुन्हा वाचायचे. ते वाचता वाचता त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू फुलत जायचे, कोणाची फजिती कशी झाली आहे, कोणाला कसा चिमटा बसला आहे हे त्यांच्या बदलत्या चेहऱ्यावर दिसत असे. असे झाले की ओळखायचे साहेबांना आवडले.
चुकांचा विषय आलाच आहे तर एक किस्सा आवर्जून सांगावा लागेल. ‘मार्मिक’मध्ये एकदा जितेंद्र अभिषेकींनी लता मंगेशकरांवर एक लेख लिहिला होता. प्रोसेसिंगच्या दरम्यान त्यातला एक शब्द त्रास देत होता. त्याकाळी छपाईचे जे तंत्र होते त्यामध्ये पहिली वेलांटी जुळवणे अवघड होते. मी तो शब्द बदलला. अंक प्रकाशित झाल्यावर अभिषेकींना खूप राग आला. त्यांनी श्रीकांतजीकडे तक्रार केली. मला ‘मार्मिक’ सोडून जाण्यास सांगण्यात आले. निरोपासाठी मी दादांकडे गेलो. दादांनी मग सर्वाना एकत्र बसवले, मूळ लेख, छापून आलेले सर्व समोर ठेवले. शब्द बदलला नसता तर त्यातून कसा वेगळाच अर्थ प्रतीत झाला असता ते सांगितले. आता बाळासाहेबांना निर्णय घ्यायचा होता. बाळासाहेबांनी मग अभिषेकींनांच समजावून सांगितले, ‘‘अरे, आमच्या पण काही तांत्रिक अडचणी असतात. असे काही बदल करावे लागतात,’’ असे सांगत शब्द बदलणे कसे गरजेचे होते ते पटवून दिले. अभिषेकींना ते पटले आणि मी मार्मिकमध्येच राहिलो. असे होते बाळासाहेब..
मी ‘मार्मिक’ मध्ये लिखाण करायचो तेव्हा प्रबोधनकार मला समजावून सांगायचे, ‘‘हा अग्रलेख कोणाचा आहे, तर बाळचा. मग तो कसा पाहतो एखाद्या घटनेकडे, तर तो व्यंगचित्रातून पाहतो. मग तुलादेखील तसेच पाहावे लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वात शिरावे लागेल.’’
‘मार्मिक’ची भूमिका सांगताना बाळासाहेब म्हणायचे, ‘‘अरे ताíकक युक्तिवाद लोकांच्या डोक्यावरून जातात. रविवारच्या दुपारी मासिक वाचताना लोकांचे डोके आपल्याला दुखवायचे नाही. हे लक्षात ठेव.’’ त्यातून मार्मिकची एक जडणघडण तयार झाली असे 
वाटते. ठाकरी भाषा हादेखील असाच विषय. त्याबद्दल बोलायचे तर आपणास ‘मार्मिक-सेना-मार्मिक’ असे पाहावे लागेल. ‘मार्मिक’मधून सेना उभी राहिली, पुढे ते सेनेचे पत्र बनले. एकदा का एखादे पत्र चळवळीचे-संघटनेचे झाले की मग त्याची भाषादेखील संघटनेचीच असणे गरजेचे असते. बाळासाहेबांची भाषा ‘मार्मिक’मध्ये आली आणि पुढे ती संघटनेची झाली आणि मग संघटनेची भाषा पत्रात आली अशी ती सांगड आहे.
एकदा मी अत्रे व डांगे यांचे व्यंगचित्र काढले. बाळासाहेबांनी ते स्वत: दुरुस्त करून ‘मार्मिक’मध्ये वापरण्यास सांगितले. १९८५ नंतर बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे बंद केले. बाळासाहेबांचा हात थरथरत असे. बाळासाहेब म्हणायचे देखील, ‘‘अरे ज्या हातावर मुंबई थरथरायची तेच हात आता थरथरत आहेत.’’ मी पुन्हा ‘मार्मिक’मध्ये आल्यावर बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रे पुन्हा छापायची का असा विचार करत होतो. बाळासाहेब म्हणाले, ‘‘संदर्भ जुने असले तरी परिस्थिती तशीच आहे.’’
बाळासाहेबांनी शिवसनिकांना भरभरून दिले. मला लोक विचारतात, ‘‘तुम्हाला काय मिळाले?’’ खरं म्हणजे काय काय सांगू.. वयोमानानुसार माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मी केईएममध्ये दाखल झालो होतो. बाळासाहेबांना हे कळले, त्यांनी मला तेथून बाहेर काढले. थेट नीतू मांडकेना बोलवून घेतले आणि माझ्यावर शस्त्रक्रिया करायला लावली. दुसरा प्रसंग मला पेसमेकर बसवायचा होता. तेव्हा तर माझी व्यवस्था थेट लीलावतीमध्ये केली होती. पुढे तोच पेसमेकर बदलायचा होता. आयुष्यभर टिकणारा पेसमेकर मला बसवायला त्यांनी लीलावतीमध्ये सांगितले. हे जे घरगुती अगत्य, जिव्हाळा होता तो माझा ठेवा आहे. इतकेच नाही तर माझी धर्मपत्नी निवर्तण्यापूर्वी तिला बाळासाहेबांना भेटायचे होते. बाळासाहेब बाहेर होते, पण ते १५ मिनिटे सलग फोनवरून तिच्याशी बोलले. हे दुसरे कोण करू शकेल का? बाळासाहेब हे असे तुमच्या-आमच्या सर्वच शिवसनिकांच्या सुख-दु:खाशी एकरूप झालेले होते
















पंढरीनाथ सावंत

response.lokprabha@expressindia.com.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल