शुक्रवार, १८ मार्च, २०१६

भविष्यासाठी पाणी वाचवा

भविष्यासाठी पाणी वाचवा

विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल ते आपण पाहूया.
CONSERVE-WATER-GLOBE-HANDSअसं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो. पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का.. घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू. पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.
  • भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.
  • डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.
  • अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.
  • किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.
आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल. झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा. एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा आणि एका चांगल्या भविष्याची सुरुवात करा.






सौजन्य : दै- प्रहार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल