मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

चांदोरी





ऐतिहासिक महत्त्व असलेले चांदोरी गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर २५ किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार आपले स्वागत करतो. मात्र, ही गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. गावाने आपले गावपण अजूनही जपले आहे. नव्या इमारतीही दिसताहेत पण जुन्या घरांसमोर त्या खुज्याच वाटतात. गावाला लाभलेल्या जुन्या घरांचे कोंदण येथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करते. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन्‌पुढे चांदोरी असे म्हटले जाऊ लागल्याचे सांगितले जाते. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांनी महादेव भट हिंगणे यांना १७१८ मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा दिल्लीच्या वकिलातीवर त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणेंची वकील म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वक‌िलातीचे महादेव भटांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारीही म्हटले जाते. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक घराणी भरभराटीला आली. महादेव भटांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन पेशव्यांनी १७३० मध्ये त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम दिली होती. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्टपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते. १७६२ मध्ये गणेश हिंगणे यांनी ५६ खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. १९५३ पर्यंत हिंगणेंकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी होती. ब्रिटिशांनी नाशिक जिल्ह्यात सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुलाची मालकी ही हिंगणेकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची
साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा आजही हा इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत. चांदोरीतील हिंगण्याचा वाडा, मठकरी वाडा, टर्ले-जगताप वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखा आहे. यातील टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की, जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (ता. इगतपुरी) येथे बकऱ्याच्या बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या आजही तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातील बुद्धविहार लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.
मठकरी वाड्यातील रामजन्मोत्सव व दक्षिणाभिमुख राममंदिर महाराष्ट्रात आगळेवेगळे आहे. राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्‍चिम पिंडी हे या मंदिराचे विशेष आहे. या मंदिरातूनच रामाने मृगवेध घेतला. तसेच रामाचे पाऊल उमटल्याचा दाखला दिला जातो. रामनवमीला येथे मोठी मिरवणूक असते. या मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची चित्रे आजही पहायला मिळतात. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मिळ आहेत. चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी जसे ओळखले जाते. तसेच ते महाराष्ट्रात फक्त त्र्यंबकेश्‍वर व चांदोरी येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मं‌दिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळच १८५२ मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. तर वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूक समजले जाते. सरदार हिंगणेच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. तर गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ही हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत असून शंकराची ही १२ मंदिरे असल्याने त्याला बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मिळ मंदिर, हे विशेष होय. ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदीपात्रात अनेक मूर्ती बेवारसरित्या पडलेल्या पहायला मिळतात. या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास हा ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर येथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जात असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवनी समाधी नदीकिनारीच आहे. चांदोरीत अनेक संत महात्मे येऊन गेल्याचेही ग्रामस्थ सांगतात. गावातील एका वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे विठ्ठल रूक्मिणी व राईबाईची मूर्ती पहायला मिळते. येथील भिंतीवर चित्र असून या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजविणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. तमाशा क्षेत्रात माधवराव गायकवाडांचे नाव अजूनही आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत माधवरावांनी फाळकेंना नकार दिला होता. लोककलावंत म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा १९८७ मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा तमाशा कलावंत म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार व्हायचा त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे. याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडते हे मात्र नक्की!



















http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post_7.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल