मंगळवार, २८ जून, २०२२

...तर नाशिक बनले असते भारताची राजधानी; पण नाशिकला विरोध कोणी अन् का केला?

 Authored by म. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Jun 8, 2022, 12:37 PM

दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, दिल्ली भारताची राजधानी नसती, तर कोणते शहर राजधानीसाठी योग्य असते? या प्रश्नाचे उत्तर आहे नाशिक! होय, अगदी खरे आहे.
- १८६५ मध्ये सर जॉर्ज कॅम्पबेल यांच्या प्रस्तावावर दीर्घकाळ चर्चा


- पुणे आणि मुंबईच्या तुलनेत नाशिक ठरले होते उजवे

- प्रस्ताव पाठविण्यापूर्वी दीर्घकालीन चर्चा अन् संशोधनही


नाशिक : दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, दिल्ली भारताची राजधानी नसती, तर कोणते शहर राजधानीसाठी योग्य असते? या प्रश्नाचे उत्तर आहे नाशिक! होय, अगदी खरे आहे.

अभेद्य घाटमाथे, सह्याद्रीच्या डोंगररांगा, आल्हाददायक वातावरण, अनेक नद्या, पुरेसे पाणी, पूर्व-उत्तर-दक्षिणेला जोडणारा रेल्वेमार्ग, उत्कृष्ट द्राक्षे, इटालियन चवीची वाइन, बुद्धिवंत मंडळी अशा वैविध्यांनी नटलेले नाशिक शहर भारताची राजधानी व्हावे, यासाठी सन १८६५ मध्ये सर जॉर्ज कॅम्पबेल यांनी दिलेल्या प्रस्तावावर ब्रिटिश प्रशासनात दीर्घकाळ चर्चा झाल्याची नोंद समोर आली आहे. हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता, तर वाइन कॅपिटल म्हणून मिरवत असलेले नाशिक भारताची राजधानी म्हणूनही मान्यता पावले असते.


तत्कालीन भारतातील ब्रिटिश साम्राज्याची पहिली राजधानी कलकत्ता (आताचे कोलकाता). मात्र, कलकत्ता सोयीचे नसल्याने १८६२ च्या दरम्यान नव्या राजधानीयोग्य शहराचा शोध ब्रिटिशांनी सुरू केला होता. कोणते शहर राजधानीसाठी योग्य आहे, यावर ब्रिटिशांचा खल सुरू होता. त्यासाठी दीर्घ चर्चा आणि संशोधनही केले जात होते. नाशिक शहर भारताची राजधानी होण्यासाठी योग्य असल्याचा प्रस्ताव लिबरल पक्षाचे प्रतिनिधी आणि ब्रिटिशांचा भारतीय प्रशासक असलेले सर जॉर्ज कॅम्पबेल यांनी सन १८६५ मध्ये सादर केला होता. कॅम्पबेल यांनी नाशिकमध्ये राहून, संशोधन करून केवळ प्रस्ताव दिला असे नाही. तर नाशिक राजधानी व्हावी, यासाठी अगदी लंडनपर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या 'कॅपिटल ऑफ इंडिया' आणि 'मेमरीज् ऑफ माय इंडियन करिअर' या पुस्तकात यासंबंधीच्या नोंदी मिळतात. डब्लू. यूरिव्हीक यांच्या 'इंडिया इलिस्ट्रेटेड', तसेच 'द जॉग्रफी अँड क्लायमेट ऑफ इंडिया' या पुस्तकात सुद्धा नाशिकला राजधानी करण्याबाबत गांभीर्याने खल झाल्याचे उल्लेख मिळतात.

नाशिकसह पुणे, मुंबर्इच्या नावांचाही राजधानी म्हणून विचार झाला होता. परंतु, 'पुण्याच्या तुलनेत नाशिक उत्तम,' असा शेरा मिळाल्याने पुणे मागे पडले. मुंबर्इदेखील क्षेत्राने आणि बंदरदृष्ट्या लहान असल्याने भविष्यात राजधानीयोग्य ठरणार नसल्याने हे प्रस्ताव पुढील घडामोडींमुळे बारगळले. सर जॉर्ज कॅम्पबेल यांच्या प्रस्तावावर दीर्घकाळ चर्चा सुरू राहिली आणि अनेकांनी (कधीही नाशिकला भेट न दिलेल्यांनी) याला विरोधही केला.


अन् दिल्ली झाली राजधानी!

भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग यांनी आपल्या साम्राज्याची राजधानी कलकत्ताऐवजी दिल्लीच हवी, याबाबतचे पत्र २५ ऑगस्ट १९११ रोजी शिमल्याहून ग्रेट ब्रिटन अर्थात, लंडनला पाठविले. हार्डिंग यांनी त्या पत्रात म्हटले होते, की दिल्ली भारताच्या केंद्रभागी असल्याने राजधानीचे शहर म्हणून ते फायदेशीरच ठरेल. अखेर दिल्लीला राजधानी करण्याची घोषणा जॉर्ज पंचमने १९११ मध्ये केली होती. पण, त्याला अधिकृत दर्जा १३ फेब्रुवारी १९३१ रोजी मिळाला.


नाशिकला विरोध कोणी अन् का केला?

सर जॉर्ज कॅम्पबेल यांनी ब्रिटिशांची भारतातील राजधानी नाशिकच होऊ शकते, यावर प्रस्ताव मांडल्यानंतर भारतातील अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. 'द जॉग्रफी अॅण्ड क्लायमेट ऑफ इंडिया' या २८ जानेवारी १८६७ रोजी प्रसिद्ध झालेल्या सविस्तर अहवालात सर कॅम्पबेल यांचा राजधानीबाबतचा प्रस्ताव आणि त्याविरोधात केलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मते मांडण्यात आली. यातील काही मते खालीलप्रमाणे...

कॅम्पबेल चांगले मित्र असले, तरी कलकत्ताहून राजधानी दुसरीकडे न्यावी याबाबत मी त्यांच्याशी सहमत नाही. राजधानी ही मध्यभागीच असावी का? युरोपमधील बऱ्याच राजधान्या देशाच्या मध्यभागी नाहीत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनदेखील मध्यभागी नाही. याउलट म्यानमार व मलेशियाचा कारभार कलकत्त्यातून सांभाळणे सोयीचे असल्याने हे अधिक मध्यभागी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात सर्वाधिक युरोपियन कलकत्ता येथे आहेत.


- सर रॉबर्ट माँटेगोमेरी (ब्रिटिश प्रशासक आणि नागरी सेवक)

सर चार्ल्स एडवर्ड ट्रेव्हेलियन यांच्या मतानुसार, स्थानिकांची राजधानी आणि ब्रिटिशांची राजधानी ही एकाच ठिकाणी नसावी अथवा जवळ नसावी. यामुळे अडचणीत भर पडू शकते. कॅम्पबेल म्हणतात तसं राजधानी दुसरीकडे नेण्याची गरज आहेच. परंतु, ते म्हणता ती जागा मध्यभागी नाही.

- सर चार्ल्स एडवर्ड ट्रेव्हेलियन (ब्रिटिश वसाहतीचे प्रशासक)

सर जॉर्ज कॅम्पबेलच्या म्हणण्यानुसार, नाशिकमध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे इंजिनासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी तक्रार येत आहे. दुसरी गोष्ट अशी, की येथे भरपूर नद्या, उपनद्या, कॅनॉल आहेत, असे कॅम्पबेल म्हणतात आणि येथे चांगले वातावरण आहे, असेही ते म्हणतात हे कसे शक्य आहे?


- विल्यम हॅमिल्टन (भूवैज्ञानिक)



काय म्हणाले होते कॅम्पबेल?

- पुण्यापेक्षा मला नाशिक हिरवेगार वाटले. दोघांचे वातावरण एकसारखे आहे. मात्र, नाशिक वरचढ


- इटालियन चवीची विनियार्ड असलेले, वाइन मिळणारे भारतातील एक ठिकाण म्हणजे नाशिक

- वाइनच्या टेस्टवरून त्या शहराच्या वातावरणाचा अंदाज येतो. यात नाशिक उत्तम ठरते


- उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला जोडणारा रेल्वेमार्ग नाशिकमधून जातो. पुणे, मुंबईला जवळचे

- नियोजन केले, तर नाशिकमध्ये मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो


- औरंगजेबाने आपली राजधानी निवडताना नाशिकजवळच्या प्रदेशाला महत्त्व दिल्याचे दिसते

- भारतातील सर्वांत आरोग्यदायी शहर म्हणून नाशिक महत्त्वाचे


- आंब्याची उत्तम गोडी येथे अनुभवायला मिळते. भारतात अशी गोडी कोठेच अनुभवली नाही

- एकीकडे समुद्र आणि घाट, तर दुसरीकडे डोंगररांगामुळे राजधानी अभेद्य होऊ शकते


- गोदावरीमुळे शेतीसमृद्ध भूभाग नाशिकला लाभला आहे. सुपीक आणि अन्नधान्यासाठी महत्त्वाचे

- नाशिकमधील मंडळी विद्वान आणि बुद्धिवंत आहेत. हे राजधानीसाठी उत्तम ठरेल


- इथे थंड वातावरण अधिक चांगले आहे. दक्षिणेकडील धूळ-वारा इथे नाही

- पावसाळा पुण्यापेक्षा अधिक जास्त थंड व इतर सर्व बाबतींतसुद्धा अधिक आनंददायक आहे


- इथून राज्याचे काम आठ ते नऊ महिने कुठल्याही खंडाविना सुरळीत चालवता येईल

- हिवाळ्यात गव्हर्नर जनरल आणि इतर सरकारी सदस्य भारतचा दौरा करू शकतील

साठे खत आणि खरेदी खत : फरक लक्षात ठेवण्यासारखे...

 


साठे खत आणि खरेदी खत : फरक लक्षात ठेवण्यासारखे

आपल्याकडे एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. हे दस्त कायद्याने नोंदविणे गरजेचे आहे आणि त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरणे गरजेचे असते. त्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड ह्या सारख्या रेव्हेन्यू रेकॉर्डने जागेमध्ये कोणाला मालकी हक्क मिळत नाही किंवा कोणाचाही मालकी हक्क हिरावून घेत नाहीत, तर हे उतारे केवळ महसूल नोंदणी करणारे दस्तऐवज आहेत.

 ह्यामधील खरेदीखताबरोबरच ( सेल- डीड ) अजून एका दस्ताबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल आणि तो दस्त म्हणजे "साठे खत ". साठे खताला 'साठे खत' का म्हणतात ह्या बद्दल काही माहिती आढळून आली नाही. साठे खताला इंग्रजी मध्ये "ऍग्रिमेंट फॉर सेल" असे म्हणले जाते, परंतु दोन्ही करार सारखे वाटले तरी त्यामध्ये खूप फरक आहे. कोर्टामध्ये मालमत्ते संबंधांमधील बहुतांशी वाद हे ह्याच दस्तांभोवती फिरत असतात आणि हा विषय तसा मोठा असल्यामुळे ह्या दस्तांबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. 

ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या कलम ५४ अन्वये 'सेल' म्हणजे स्थावर मिळकतीमधील मालकी हक्क ठरलेल्या मोबदल्याबदल्यात तबदील करणे होय. 

असे खरेदी खत झाल्यावर खरेदी घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळतो आणि असे खरेदीखत हे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे . 

मात्र एखाद्या मिळकतीचे खरेदी खत करण्याआधी "साठे-खत" करण्याची पद्धत दिसून येते. मिळकतीचे साठेखत/करारनाम्यामुळे मिळकतीमधील मालकी हक्काचे हस्तांतरण होत नाही. कलम ५४ मध्ये पुढे असेही नमूद केले आहे की “केवळ असा करार ( साठे खत ) झाला म्हणजे संबंधित मिळकतीवर (खरेदीदाराचा) कसलाही हक्क , बोजा किंवा हितसंबंध निर्माण होत नाही.” 

साठेखतात मालमत्तेचे वर्णन, मिळकतीच्या मालकी हक्काचा इतिहास, मोबदला किती आणि कसा आणि किती कालावधीमध्ये देणार, जागेचा प्रत्यक्ष आणि खुला ताबा कधी देणार, कागदपत्रांची पूर्तता, विविध प्रकारच्या परवानग्या लागणार असल्यास त्याची पूर्तता कोण आणि कधी करणार, आणि खरेदी खत किती मुदतीमध्ये करणार आणि ह्या अटी शर्तींचा भंग झाल्यास सेलर -पर्चेसर ह्यांचे अधिकार अश्या महत्वाच्या अटी, शर्ती यांचा स्पष्ट लेखी उल्लेख असतो. थोडक्यात 'साठे खत' म्हणजे हा एखादी स्थावर मिळकत भविष्यात, काही अटी शर्तींना अधीन राहून, हस्तांतरित करण्याचे म्हणजेच खरेदीखत करून देण्याचे वचन देणारा करार असतो. 

जागेचा ताबा :
साठे खताच्या वेळी जागेचा ताबा द्यायचा कि नाही हे प्रत्येक व्यवहारावर अवलंबून असते आणि असा ताबा मिळाला तरी मालकी हक्क साठे खताने मिळत नाही. *परंतु कायद्याचे एक महत्वाचे तत्व आहे की "ताबा असणे म्हणजे १० पैकी ९ मार्क मिळण्यासारखे आहे"*. शेवटी हक्का इतकाच जागेचा ताबाही तितकाच महत्वाचा आहे, ताबाच नसेल तर कागदोपत्री मालकी हक्काचा काय उपयोग ? असो. मात्र या बाबतीत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मधील कलम ५३-अ ज्याला 'पार्ट परफॉर्मन्स' म्हणून ओळखले जाते, ते बघणे गरजेचे ठरेल. या कलमाप्रमाणे जर मिळकत खरेदी घेणाऱ्याने साठे खतात नमूद केल्याप्रमाणे त्याच्यावर जबाबदारी असणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता केली असेल आणि त्याचबरोबर अश्या मिळकतीचा ताबाही घेतला असेल, तर मिळकत विकणाऱ्याला सदर मिळकतीचा खरेदीदाराला दिलेला ताबा परत मागता येणार नाही, परंतु करारनाम्यामधील अटी -शर्तींप्रमाणे पुढील कारवाई करता येईल. अर्थात ह्या परिस्थितीमध्ये मालकी हक्क मूळ मालकाकडेच राहतो. 

स्टॅम्प ड्युटी :

महाराष्ट्र स्टँम्प ऍक्ट प्रमाणे साठे खताच्या वेळीच आता पूर्ण स्टँम्प ड्युटी भरावी लागते, नंतर खरेदीखताच्या वेळी परत स्टँम्प ड्युटी भरावी लागत नाही. परंतु पूर्ण स्टम्प ड्युटी भरली म्हणून साठे खताने मालकी हक्क मिळत नाही. साठे खत केलेच पाहिजे , असा काही नियम नाही हेही तितकेच खरे आहे. 

मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने 'सूरज लॅम्प इंडस्ट्री विरुद्ध हरियाणा राज्य' ह्या याचिकेवर २००९ आणि २०११ मध्ये निकाल देऊन हे स्पष्ट केले की केवळ पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारावर किंवा साठे खताच्या आधारावर जागा विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही, केवळ योग्य स्टँम्प ड्युटी भरलेल्या नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेमध्ये मालकी हक्क प्राप्त होतो.

हे दोन्ही दस्त खूप महत्वाचे आहेत. व्यवहारामध्ये असेही दिसून येते की लोक अनोंदणीकृत साठे खत किंवा लोकांचा आवडीचा म्हणता येईल असा "एम. ओ. यू" म्हणजेच 'समजुतीचा करारनामा' करतात. दस्ताला काय नाव दिले आहे ह्याने नव्हे तर त्यातील अटी -शर्तींप्रमाणेच दस्त कोणता आहे हे ठरते. कोर्टामध्ये देखील दस्ताच्या अटी -शर्ती ह्यांचे एकत्रितरित्या वाचन करून दस्त कोणता आहे हे ठरविले जाते. अश्या अनोंदणीकृत, एम. ओ. यू. सारख्या दस्तांमुळे जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही. सध्याच्या जागांच्या प्रचंड किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आपला कष्टाचा पैसा गुंतवण्याआधी योग्य तो कायदेशीर सल्ला तज्ज्ञ व्यक्तींकडून घेणे इष्ट.





by- internet

आर. डी. बर्मन यांनी शोलेमधल्या 'या' गाण्यात पाण्यानं भरलेल्या बीअर बाटल्या वापरून दिलेलं संगीत..

 आर. डी. बर्मन

आरडी बर्मन अर्थात आपले पंचमदा.. पंचमदांची गाणी म्हणजे वैविध्य, एखाद्या लाटेप्रमाणे उचंबळणारे त्यांचे सूर कधी एखाद्या व्यक्तीला उदास करतील, तर कधी त्या लाटेवर स्वार व्हायला लावतील. त्यांच्या संगीताची व्याप्तीच इतकी अफाट होती की त्या सुरांनी तुमचं मन कधी काबीज केलं हे सांगता येणार नाही.

पंचमदा यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाण्यांची रेंज...'चिंगारी कोई भडके' किंवा 'ओ मांझी रे अपना किनारा' ही गाणी काळजात खोलवर रुततील, तर दुसरीकडे 'मेहबूबा ओ मेहबूबा' किंवा 'तुम क्या जानो मोहब्बत क्या है' ही गाणी ऐकून तुमचे पाय आपोआपच थिरकतील.

आणि हेच 'आजकल पाँव जमीन पर नहीं पडते मेरे' आणि 'हमसे तुमसे प्यार कितना' यांसारखी असंख्य गाणी तुम्हाला रोमँटिसिझमचा अनुभव देतील.

पंचमदांच्या याच सुरांना अनुभवायचं असेल तर गुलजार यांचा 1977 साली आलेला 'किताब' चित्रपट पाहावाच लागेल. या चित्रपटात एक गाणं आहे.. 'धन्नो की आँखों में है रात का सूरमा और चांद का चुम्मा.'

गुलजारांनी चित्रपटात दोन ओळी गाण्याची संधी दिली आणि केकेंचे आयुष्यच बदलले
डोंबिवलीचा मराठी माणूस जो चक्क इंग्रजीत गातो हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
जस्टिन बीबरला नेमका कोणता आजार झालाय?
रात्रीच्या संधिप्रकाशात स्टेशनवर येणाऱ्या ट्रेनची वाट बघणारी, कंदील घेऊन ट्रेनला हिरवा सिग्नल देणारी नायिका आणि तिच्या खळाळत्या हास्याने उजळून निघणारा अंधार आणि त्याच्या सोबतीला गिटारवर सुरू होणारा फ्लॅंजर इफेक्ट. हे सर्व बघताना आणि ऐकताना एक वेगळीच मदहोशी जाणवते.

रमेश अय्यर यांची गिटार आणि मारुतीराव कीर यांचा तबला, एम संपत यांचा कॅमेरा आणि गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली केलेला हा अकल्पनीय प्रयोग. या सर्वच गोष्टी चित्रपट पाहणाऱ्यांना थक्क करून सोडतात.

बर्मन कुटुंबाचा इतिहास
पंचमदा यांचं मूळ सापडत ते त्रिपुराच्या राजघराण्यात. 1862 मध्ये त्रिपुराचे राजे इशानचंद्र देव बर्मन यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा ब्रजेंद्रचंद्र गादीवर आला. पण काहीच दिवसांत कॉलराच्या साथीत ब्रजेंद्रचंद्र यांचा मृत्यू झाला. आता परंपरेनुसार इशानचंद्र यांचा धाकटा मुलगा नवद्वीपचंद्र गादीवर बसायला हवा होता. पण न्यायालयाच्या आदेशानुसार इशानचंद्रचा भाऊ बिरचंद्रला गादी मिळाली.

वडील एस. डी. बर्मन यांच्यासोबत आर. डी. बर्मन


या सगळ्या घटनाक्रमात नवद्वीपचंद्र यांनी त्रिपुरा सोडलं आणि आपल्या कुटुंबासह कोमिल्ला गाठलं. (कोमिल्ला आजच्या बांगलादेशचा भाग आहे.) नवद्वीपचंद्र देव बर्मन यांना एकूण नऊ मुलं. त्यांच्या या नऊ मुलांपैकी सर्वात लहान होते, सचिन देव बर्मन. एसडी बर्मन.. आरडी बर्मन यांचे वडील.

नवद्वीपचंद्र यांना जर वंशपरंपरेने राजगादी मिळाली असती तर भारतीय सिनेसृष्टी एसडी बर्मन आणि आरडी बर्मन या जोडगळीच्या संगीतापासून वंचित राहिली असती. या पिता-पुत्राच्या भन्नाट जोडीने भारतीय संगीतविश्वाला जे योगदान दिलंय, त्याला शब्दबद्ध करणं फार अवघड आहे.

एसडी बर्मन म्हणजेच सचिनदा यांना लहानपणापासूनचं संगीताची आवड. त्यांनी बंगालच्या समृद्ध लोक-संगीत परंपरेपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. साहेब अलींसारख्या फकीरांकडून कधी सूफी गाण्याचं तर नजरुल इस्लामसारख्या महान कवींच्या तालमीत कवितांच प्रशिक्षण घेतलं.

एसडी बर्मन यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रेडिओवर गायचे. पुढे त्यांनी संगीताचे धडे द्यायला ही सुरुवात केली. दरम्यान 1937 साली त्यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केलं. राजघराण्याने मात्र त्यांच्या नव्या सुनेला योग्य तो सन्मान दिला नाही. यामुळे संतापलेल्या एसडी बर्मन यांनी त्रिपुरातील आपल्या रियासतीपासून दूर राहायला सुरुवात केली. ते त्रिपुराला पुन्हा कधी गेलेच नाहीत.

तुबलू पंचम आणि नंतर आरडी बर्मन
दुसरं महायुद्ध नुकतंच सुरू होणार होत. त्या धामधुमीत 27 जून 1939 रोजी एसडी बर्मन यांच्या घरात मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं राहुल. टोपण नाव धारा तुबलू. तुबलू नंतर पंचम कसा बनला याचे ही बरेच किस्से आहेत.

यातला एक किस्सा असा होता की, आरडी बर्मन पाच सुरांमध्ये रडायचे. यातला दुसरा किस्सा असा की, जेव्हा जेव्हा एसडी बर्मन रियाझ करताना 'सा' म्हणायचे, तेव्हा तेव्हा आरडी बर्मन सप्तसुरातला पाचवा सुर म्हणजे 'पा' म्हणायचे. आरडी बर्मन यांनी आपल्या नावाबद्दल एक खुलासा केला होता त्याप्रमाणे, त्यांना हे नाव अभिनेते अशोक कुमार यांनी दिलं होतं.


एक जिद्दी आणि हुशार व्यक्तीचा मुलगा असणं पंचमदांसाठी तितकसं सोपं नव्हतं. आरडी बर्मन ऐन तारुण्यात होते, अगदी तेव्हाच त्यांचे वडील मुंबईत बसून भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णकाळाचा पाया घालत होते. हिंदी चित्रपटांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन मधुर अशी गाणी रचली जात होती. ज्यात राग आणि स्वर यांव्यतिरिक्त भाषेची शुद्धता देखील महत्वाची होती.

वयाच्या अकरा, बाराव्या वर्षापासून पंचमने वडिलांसोबत स्टुडिओत जायला सुरुवात केली. वडिलांबरोबर चित्रपट म्युजिक रेकॉर्डिंगचे बारकावे जवळून पाहिले आणि शिकूनही घेतले. मुलाला लाभलेली नैसर्गिक संगीत प्रतिभा ओळखून एसडी बर्मन यांनी त्याला पटकन आपला सहाय्यक बनवलं.

पंचम तोपर्यंत कोणतही प्रशिक्षण न घेता विविध वाद्य वाजवायला शिकला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीच्या म्हणण्यानुसार आरडी बर्मन यांच्यासारखा माउथ ऑर्गन वाजवणारा संबंध देशात कोणीच नव्हता. फार कमी लोकांना माहित असेल की 'है अपना दिल तो आवारा' मध्ये पंचमदा यांनी स्वतः माऊथ ऑर्गन वाजवलाय.

राजश्री प्रॉडक्शनच्या सुपरहिट 'दोस्ती' मधील गाण्यातला माऊथ ऑर्गन सुद्धा त्यांनीच वाजवलाय. नंतरच्या काळात पंचमदा यांनी उस्ताद अली अकबर खान, पंडित समता प्रसाद आणि सलील चौधरी यांच्याकडून माऊथ ऑर्गनच प्रशिक्षण घेतलं.

वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करत असताना, पंचम कोणत्या तरी गोष्टींवर अडून राहायचे आणि मग एसडी रागावून स्टुडिओतून निघून जायचे. बऱ्याचदा असं घडायचं. एसडी यांचं म्हणणं असायचं की, एका व्हायोलिनवर ही आपलं काम भागू शकतं. तर पंचम म्हणायचे आपल्याला तीन व्हायोलिन आणि एक सॅक्सोफोन गरजेचा आहे. पण वडिलांच्या आग्रहापुढे मुलाला बऱ्याचदा पडती बाजू घ्यावी लागायची.

1961 साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब' या चित्रपटातून आरडी बर्मन यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील "मतवाली आँखोंवाले, ओ अलबले दिलवाले" हे गाणं फारच गाजलं.

मेहमूद आणि हेलनच्या या सहा मिनिटांच्या गाण्यात, आरडी बर्मन यांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. या प्रयोगामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं संगीत पुढच्या वीस तीस वर्षांसाठी कायमचं बदलून जाणार होत.


गाण्याची सुरुवात हाय-स्पीड कॅस्टनेट्सने होते. त्यानंतर लॅटिन अमेरिकन फ्लेमेन्को-शैलीतील अकॉस्टिक गिटार वाजत. यानंतर महमूद आणि हेलन डान्स फ्लोअरवर उतरतात. गिटार संपायला येत असतानाच मोहम्मद रफी चाळीस सेकंदांसाठी अरबी शैलीत हमिंग करतात आणि पुढच्या दीड मिनिटांत मूळ गाणं सुरू होत. या गाण्यात कॅस्टनेट, गिटार आणि व्हायोलिन तर होतंच, पण पारंपारिक जिप्सी संगीताची सुद्धा साथ जोडण्यात आली होती.

त्याकाळी चित्रपटाची गाणी साधारणपणे तीन ते चार मिनिटांची असायची. एक राग, एक मुखडा आणि दोन-तीन अंतरे. फालतू समजल्या जाणाऱ्या वाद्यांपासून अंतर राखलं जायचं. या एका गाण्यात आरडी बर्मन यांनी सर्व नियम तोडले. ज्यासाठी लोक कदाचित तयार नसते झाले त्याचवेळी नवा प्रयोग करण्याचं धाडस बर्मन साहेबांनी केलं होत.

'तिसरी मंझिल'ने नवी ओळख मिळाली
आरडी बर्मन यांना लोकांपर्यंत पोहोचायला तशी तर पाच वर्षे लागली. पण 1966 मध्ये आलेल्या 'तिसरी मंझिल'ने संगीत रसिकांना आरडी बर्मन यांची दखल घ्यायला लावली. 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' आणि 'ओ हसीना जुल्फों वाली' सारखी भन्नाट गाणी यापूर्वी कधी तयारच झाली नव्हती. नासिर हुसेन यांच्या या चित्रपटात पंचमदांनी जो प्रयोग केला होता, तो प्रयोग प्रत्येक संगीतकाराला करावासा वाटत होता. पण सुरुवात पंचमदांनीच केली.

यात त्यांनी इतकी इतकी वाद्य वापरली की संगीत तज्ज्ञही चकित झाले होते. व्हायब्राफोन, व्हायोलिन, चालो, चाइम, ट्रम्पेट, ड्रम्स, सॅक्सोफोन, काँगो, त्रिकोण, कॅस्टनेट्स आणि काय काय वापरलं नाही? चित्रपट संगीतातील हा एक अभिनव प्रयोग होता जो अनेक दशकांपासून व्हायोलिन, सितार, गिटार आणि तबल्यावरच अवलंबून होता. या प्रयोगाला मनोहरी सिंग आणि कर्सी लॉर्ड सारख्या दिग्गज अरेंजर्सच्या मदतीने परफेक्शन मिळालं.


1960 च्या दशकात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये हिप्पी कल्चरची सुरुवात झाली होती. हा काळ लेड झेपेलिन, जॉन लेनन, लेनार्ड कोहेन आणि बीटल्सचा होता. कवितांसंबंधी वर्षानुवर्षे जे परसेप्शन तयार झालं होतं ते मोडून काढण्यासाठी बीटनिक कवींनी पुढाकार घेतला होता.

हिप्पी कल्चर शिगेला पोहोचल होतं आणि हे कल्चर भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं होत. नवं साहित्य असो, नवे सिनेमे असो, भारतातल्या तरुणाईचा प्रवास हिप्पी कल्चरच्या दिशेने सुरू झाला होता.

हा बदल नेमका हेरला तो आरडी बर्मन यांनी. त्यांनी या लाटेवर स्वार होऊन भारतीय सिनेसृष्टीला लॅटिन अमेरिकन साल्सा, फ्लेमेन्को आणि सांबा तसेच आफ्रिकन लोकसंगीताची ओळख करून दिली.

पंचमदांच्या संगीतात पाश्चात्य शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत तर होतंच पण त्याचबरोबर अरबी संगीतही होतं. प्रसिद्ध जॅझ गायक लुई आर्मस्ट्राँगला आपला आदर्श मानणाऱ्या आरडी बर्मन यांनी जॅझ व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक रॉक, फंक, ब्राझीलचे प्रसिद्ध बोसा नोव्हा संगीत आपल्या गाण्यात आणलं. 1987 मध्ये, प्रसिद्ध लॅटिन अमेरिकन संगीतकार जोस फ्लोरेस यांच्यासोबत त्यांनी 'पँटेरा' नावाचा एक अल्बम देखील रिलीज केला.

बर्मन यांनी बंगाली लोकसंगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सर्व आयामांबरोबरच आपल्या देशातील सांस्कृतिक विविधतेचा पूर्ण आदर केला. नवनवे प्रयोग केले. 1981 मध्ये आलेल्या 'कुदरत' या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांना 'हमे तुमसे प्यार कितना' हे पारंपारिक ठुमरी शैलीतील गाणं गायला लावलं.


पंचमदा यांनी जे काही नवं ऐकलं, ते ते संगीतबद्ध केलं. सँडपेपर, बांबू, कप, ताट, शंख, कंगवा, काचेच्या बाटल्या आणि पुठ्ठा-लाकडी पेटी या गोष्टींचाही त्यांनी वाद्य म्हणून वापर केला.

'शोले'मध्ये तर पंचम दा यांनी गायलेल 'मेहबूबा, मेहबूबा' हे गाणं एका ग्रीक गाण्यापासून प्रेरित होतं. या गाण्यात पाण्याने भरलेल्या बिअरच्या बाटल्यांमधून निघणाऱ्या आवाजाचा वापर करण्यात आला होता.

1960 आणि 1970 च्या दशकातल्या शम्मी कपूरपासून राजेश खन्नापर्यंतच्या कल्टला पंचम दांच्या संगीताशिवाय पर्याय नव्हता.1980 चं दशक मात्र पंचमदांसाठी चढ-उतारांच राहिलं. हिंदी चित्रपटांतला रोमान्स उतरणीकडे झुकला होता. भारतीय सिनेसृष्टीत अँग्री यंग मॅनसारख्या, डिस्कोसारख्या थीमची चलती होती.

एककाळ असा होता की, नसीर हुसेन आणि देव आनंद सारखे निर्माते त्यांच्या चित्रपटातल्या गाण्यांसाठी आरडी बर्मन यांना पहिली पसंती द्यायचे. पण नंतर हेच निर्माते इतर संगीत दिग्दर्शकांसोबत काम करण्याच्या प्रयत्नात लागले. आरडी बर्मन यांच्यासाठी तो काळ खडतर होता. पण त्यांच्यासारख्या तेजस्वी संगीताकराचा करिष्मा लोकांनी वेळोवेळी अनुभवला.

पंचमदा यांचं वयाच्या 54 व्या वर्षी, 4 जानेवारी 1994 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी ते विधू विनोद चोप्रा यांच्या '1942 अ लव्ह स्टोरी'ला संगीत देत होते.


आर. डी. बर्मन यांची गुलजार यांच्याशी चांगली मैत्री होती.

दहा-बारा वर्षांपूर्वी ज्या पंचमदांना डावललं जात होतं, त्यांना त्याच संगीतासाठी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.

आरडी बर्मन यांच्यात एकीकडे परंपरेबद्दल नितांत आदर दिसतो तर दुसरीकडे ती परंपरा ओलांडण्याचे धैर्यही दिसतं. हा टोकाचा विरोधाभास त्यांच्या कामात पण अनेकदा दिसायचा. उदाहरणार्थ, 1972 मध्ये आलेल्या 'परिचय' चित्रपटातलं 'बीती ना बिताई रैना' सारखं शास्त्रीय संगीत एका बाजूला, तर 'सा रे के सा रे गा मा को लेके गाते चले' सारखी अतिशय आधुनिक आणि जिवंत रचना एका बाजूला.

हिंदी चित्रपट संगीतात जेव्हा त्यांनी नवे प्रयोग करण्याचा घाट घातला तेव्हा लोकांनी त्यांना बंडखोर ठरवलं. मात्र आज चाळीस वर्षांनंतरही त्यांच्या संगीतामध्ये कमालीची ताकद आहे. त्यांचे सुरांनी नव्या पिढीचे सुद्धा पाय थिरकतील. गायकाचे स्वर, वाद्यांचा वापर आणि ध्वनिमुद्रणाचे तंत्र यासह नावीन्यपूर्णतेला वाव असलेल कोणतही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही.

पाश्चात्य संगीताचा खोलवर प्रभाव असूनही आरडी बर्मन यांच्या गाण्यात हिंदुस्थानी आत्मा होता. आजच्या पिढीतले ए आर रहमान असो वा विशाल भारद्वाज किंवा मग त्यांच्यासारखे इतर तरुण संगीतकार. या संगीतकरांच्या प्रयोगासाठी जी कसलेली जमीन करायची होती ती पंचमदा यांनी आधीच करून ठेवली होती.

भारतीय सिनेसृष्टीत पंचमदा यांनी दिलेलं योगदान नेहमीच एव्हरग्रीन राहील.





by - Internet

माझ्याबद्दल