शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

गुणवत्तापूर्ण बिस्किटे हीच ठरली ओळख...





हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुरवातीला छोट्या प्रमाण घरगुती स्तरावर बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात या व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांनी स्वतःचे बिस्कीट विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

राजेंद्र घोरपडे 

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर उर्वरित वेळेत घरगुती स्तरावर लहानसा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे महिलांना वाटते. हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री तेरदाळे यांचीही अशीच इच्छा होती. पद्मश्री यांच्या काकांचा एरंडोली(जि. सांगली) या गावी घरगुती बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय पाहिल्यानंतर पद्मश्री यांनाही बिस्किटेनिर्मिती करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी एक किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी करून गावामध्येच बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला गावातील लोकांकडून बिस्किटे तयार करण्याबाबतची मागणी असायची. एका किलोसाठी पन्नास रुपये या मजुरी दराने त्या बिस्किटे करून देतात. बिस्किटासाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांकडून घेऊन त्यांना लागेल, त्या पद्धतीची बिस्किटे त्या तयार करून देतात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी डिझेल, वीज आणि बेकिंगचे साहित्य असा सरासरी २० रुपये इतका खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना गावातील नागरिकांच्याकडून दररोज चार ते पाच किलो बिस्किटांची मागणी मिळू लागली. यातून खर्च वजा जाता त्यांना रोजचे १०० ते १५० रुपये मिळायचे. गावातील मागणीच्या व्यतिरिक्त पद्मश्री यांनी स्वतःही बिस्किटे तयार करून छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. गहू, नाचणी बिस्किटे, नारळ, गव्हाची नानकटाई, नमकिन बिस्किटे, कमी साखरेची बिस्किटे, नाचणी आणि गहू मिश्रीत बिस्किटे अशी विविध प्रकारची उत्पादने त्यांनी विकण्यास सुरवात केली.

‘स्वयंसिद्धा’ने दिली दिशा 


कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतून पद्मश्री तेरदाळे यांना बिस्किटे निर्मिती व्यवसायाबाबत पूरक मार्गदर्शन मिळाले. या संस्थेतर्फे दर बुधवारी कोल्हापुरात महिला व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी दुपारी बारा ते तीन या वेळेत बाजार भरविण्यात येतो. तेथे पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री सुरू केली. या बाजारानंतर महिलांना संस्थेतर्फे विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते. वाणीमुक्ती कार्यशाळेतून कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, विक्रीसाठी कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती महिलांना देण्यात येते. यातून पद्मश्री यांना प्रेरणा मिळाली. स्वयंसिद्धा संस्था अनेक ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविते. या माध्यमातूनही पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री वाढविली.

महिलांना रोजगाराची संधी ः 



पद्मश्री सध्या दररोज ३० किलो गव्हापासून सुमारे ६० किलो बिस्किटांची निर्मिती करतात. त्या स्वतः दररोज बिस्किटे निर्मिती करतात, त्याच बरोबरीने त्यांनी गावातील सात महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. कधी बिस्किटांच्या निर्मितीचे काम जास्त असते, कधी कमी असते. सहकारी महिलांना त्या तासाला १२ रुपये इतकी हजेरी देतात. दिवसाला पाच ते आठ तासांचे काम या महिलांना मिळते.

कार्यशाळेत मार्गदर्शन ः 
स्वयंसिद्धा संस्थेमार्फत सांगोला (जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यशाळेत पद्मश्री तेरदाळे यांनी बिस्किटेनिर्मिती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी बिस्किटांची विक्रीही केली. त्यांच्या उच्च प्रतिच्या बिस्किटांचे कौतुक तर झालेच या व्यतिरिक्त त्यांना येथून दरमहा सहा किलो बिस्किटांची कायमची मागणी मिळाली.

कुटुंबाचे मिळाले सहकार्य ः 
पद्मश्री यांचे पती सचिन हे बिस्किटांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करतात. बिस्किटे निर्मितीसाठी महिन्याला २०० किलो गहू, २५ किलो घरगुती साजूक तूप, ४० किलो लोणी आणि ७० लिटर डिझेल लागते. लोणी हे नृसिंहवाडी, कवठेपिरण आदी गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पद्मश्री यांच्या सासू चंपाबाई या दळण, कांडपापासून ते मालाच्या खरेदी-विक्रीसह कामगारांच्यावर देखरेख ठेवतात. छोट्या गावात हिमतीने घरगुती बिस्किटे निर्मितीचा उद्योग सुरू केल्याबद्दल स्वयंसिद्धा संस्थेने पद्मश्री यांना सौ. मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणवत्तेमुळे व्यवसायवृद्धी ः 
तेरदाळे यांनी बिस्किटाचे उत्पादन करताना अधिक नफ्यापेक्षा गुणवत्ता हाच निकष ठेवला. बिस्किटे निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे घटक त्या वापरतात. विशेषतः लोणी, तूप, दूध हे घरगुतीच वापरले जाते. चांगल्या गुणवत्तेमुळे दरमहा बिस्किटांची मागणी वाढत आहे.

मोठ्या क्षमतेच्या यंत्रांची खरेदी ः 
तेरदाळे यांना वाढत्या बिस्किटांच्या मागणीमुळे एक किलो क्षमतेचा ओव्हन वापरावर मर्यादा आल्या. पीठ मळण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज वाटू लागले. लहान यंत्रामुळे काम वेळेत होण्यास अडचणी येत होत्या. हे टाळण्यासाठी पद्मश्री यांनी पीठ मळण्यासाठी एक लाख रुपये किमतीचे मिक्‍सिंग मशिन आणि तीन लाख रुपये किमतीचे चार किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी केला.

बिस्किट विक्रीसाठी शॉपी ः 
तेरदाळे यांनी बिस्कीट विक्रीसाठी कोल्हापुरातील राजारामपूरीमध्ये शॉपी सुरू केली. येथे दररोज बिस्किटांच्या विक्रीतून सरासरी तीन हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त बाहुबली, कुंथगिरी, सोलापूर, पुणे येथेही विक्रीसाठी बिस्किटे त्या पाठवितात.

परदेशातूनही मागणी 
ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जाणाऱ्या कोल्हापुरातील व्यक्तींकडून वर्षातून तीन ते चार वेळा बिस्किटांची मागणी होते. साजूक तुपातील एक किलो बिस्किटे विक्रीचा दर २५० रुपये आहे, तर परदेशात बिस्किटे पाठविण्याचा कुरिअरचा खर्च ८१० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशातूनही मागणी असल्याचे पद्मश्री सांगतात.

संपर्क ः पद्मश्री तेरदाळे ः ८४२१४८२८४४













by - राजेंद्र जी घोरपडे 

स्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार





कोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला. 



एखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली. 

स्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः 
घरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा "वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले. 

ओळखीतून वाढला व्यवसाय 
स्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. 

तीन यंत्रांची खरेदी ः 
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे. 

महिलांना मिळवून दिला रोजगार ः 
स्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. 
स्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते. 

लोकरीची विविध उत्पादने ः 
लहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो. 

प्रदर्शनातून विक्री ः 
सुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.










by - राजेंद्र घोरपडे 

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ



सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ
कृषी रसायने, रासायनिक खते यांच्या अति वापरामुळे शेती, पर्यावरण, मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प तेरणी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील अरुण देसाई यांनी घेतला. आज सेंद्रिय उत्पादकांचा गट तयार करून ते विविध सेंद्रिय माल पिकवतात. मालावर प्रक्रिया करून त्याला आश्‍वासक बाजारपेठही मिळविण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तेरणी येथील अरुण देसाई यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची कास धरली. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर ते पूर्वी करायचे. द्राक्षाचेही काही काळ उत्पादन घेतले. द्राक्षात अनेक फवारण्या कराव्या लागायच्या. दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे येथील निसर्गशेती विज्ञान शिबिरात भाग घेतला. शेती, पर्यावरण आणि मानव या सर्वांच्या आरोग्याचे हित याबाबत ते गंभीर झाले. त्यानुसार त्यांनी 1991 च्या सुमारास सेंद्रिय शेतीची कास धरली. प्रयोग परिवारचे संस्थापक श्री. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग सुरू केले. गांडूळ शेती सुरू केली. आजऱ्याचे मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले. एका चौरस फुटामध्ये पडणारा सर्व सूर्यप्रकाश पकडण्याचे दाभोळकरांचा सिद्धांतही त्यांनी उपयोगात आणायला सुरवात केली. सेंद्रिय पदार्थांचे जमिनीत पुनर्भरण करीत राहणे आणि जैविक घटकांचा वापर यावर त्यांचा भर आहे. शेतातीलच उपयोगी जैविक घटक वाढविण्यावरच त्यांचा अधिक भर आहे. या पद्धतीने हळद, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, आंबा, तूर आदी विविध पिके ते घेतात. हळदीबाबत प्रातिनिधिक बोलायचे तर लागवडीपूर्वी शेतात एकरी 10 गाड्या शेणखत मिसळतात. हळदीच्या शेतात हिरवळीच्या खताचे, म्हणजे तागाचे बियाणेही पेरले जाते. पुढे ताग कापून तिथेच गाडला जातो. तेरणी परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशावेळी तागाचा अन्नद्रव्ये मिळविण्याबरोबर मल्चिंग म्हणूनही उपयोग होतो. मल्चिंगमुळे जमिनीत उबदारपणा राहातो. यंदा हळदीच्या सेलम जातीची लागवड आहे. काढणी फेब्रुवारीमध्ये होईल. देसाई यांनी आपल्या सेंद्रिय शेती प्रयोगात तेरणीतीलच आपल्या सुमारे दहा नातेवाईक सदस्यांनाही सामावून घेतले आहे. या सर्वांच्या मिळून एकूण 55 एकर शेतीवर विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. प्रत्येकाचे किमान एक ते कमाल तीन हेक्‍टर क्षेत्र आहे.

हळदीचे एकरी 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उसाचे एकरी 40 टन, सोयाबीनचे 10 क्विंटलपर्यंत, भाताचे सुमारे 22 क्विंटल असे उत्पादन सरासरी होते.

सेंद्रिय शेती प्रशिक्षणात सहभाग
एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेतर्फे (एनकॉन) 2001 मध्ये औरंगाबाद येथे सेंद्रिय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण झाले. यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेने 18 हजार रुपयांची मदत त्यांना केली. सेंद्रिय शेतीची उत्पादने, प्रक्रिया आणि विपणन यावर त्या वेळी झालेल्या मार्गदर्शनाचा देसाई यांनी फायदा करून घेतला.

शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री
उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा यावर आधारित दराने विक्री केल्यास फायदा निश्‍चितच मिळतो. हे लक्षात घेऊन शेतीमालाची मूल्यवृद्धी करण्यावर देसाई यांनी भर दिला आहे. त्यांचे सुधारित पद्धतीचे गुऱ्हाळघर आहे. सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गूळ तयार करताना दाणेदार गूळ, त्याच्या ग्रेड्‌स, पावडर, पॅकबंद काकवी आदी उत्पादने देसाई तयार करतात. सेंद्रिय आजरा घनसाळ, काळी गझेली या सुवासिक भाताच्या जातींचे योग्य पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.

कृषी विभागाचे सहकार्य
देसाई यांनी आपल्या एकूण शेतीचे सामूहिक पद्धतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 27 हजार रुपये खर्च येतो. मात्र कृषी विभागाचे यासाठी अनुदान आहे. प्रमाणीकरणासाठी तत्कालीन कृषी उपसंचालक मधुकर घाग, तालुका कृषी अधिकारी बेंदगुडे यांनी सहकार्य केले. तालुका कृषी अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांचे सहकार्य देसाई यांना लाभले आहे.

सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ-
सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी गडहिंग्लज येथील तत्कालीन सहायक निबंधक विजयराव देसाई यांनी अरुण देसाई यांना सहकारी संस्था काढण्याची कल्पना सुचविली. त्याप्रमाणे संस्था स्थापन करून आपल्या गटातील सर्व शेतकरी सदस्यांचा शेतीमाल वा प्रक्रियायुक्त उत्पादनांची विक्री या संस्थेद्वारे होते. सेंद्रिय प्रमाणित उत्पादनांना बाजारपेठ शोधणे, त्यात सातत्य ठेवणे, दर चांगला मिळणे हे आव्हानात्मक काम आहे. देसाई आपल्यापरीने त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पुणे, मुंबई, बंगळूर, गोवा, वर्धा आदी ठिकाणाहून त्यांनी खरेदीदार शोधले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड, मंडई, कोथरूड, कॅम्प येथेही त्यांचे व्यावसायिक ग्राहक आहेत. मुंबईतील जसलोक रुग्णालयाशेजारील हेल्थ शॉप, एका महिला व्यावसायिकेचे संडे मार्केट, पॉंडिचेरी येथेही त्यांचा सेंद्रिय माल विकला जातो. आजरा घनसाळ भात किलोला 50 ते 60 रुपये दराने त्यांनी विकला आहे.
हळदीची औषधी कॅप्सुल्स हळद पावडरही तयार केली जाते. ती किलोला 200 ते 300 रुपये दराने विकली जाते. बाजारात औषधी कंपन्यांनी हळदीची कॅप्सुल्स उपलब्ध केली आहेत. या धर्तीवर औषध कंपन्यांच्या सहकार्याने अशी कॅप्सुल्स तयार करण्याचे देसाई यांचे प्रयत्न आहेत.

अवजारांत सुधारणा
देसाई अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्याने अवजारात सुधारणा करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. सुधारित पद्धतीचे कोळपे त्यांनी तयार केले आहे. एका बैलाच्या मदतीने सहज नांगर ओढता यावा यासाठी त्यात सुधारणा केली आहे. उसामध्ये भरणीवेळी निंबोळी पेंड, एरंड, करंजी पेंड देताना ते हा नांगर वापरतात. देसाई यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषी विभाग, ग्रामपरिवर्तन, पुणे यांचे सन्मानपत्र, शाहू किसानशक्ती, आदर्श कृषी भूषण असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

संपर्क - अरुण देसाई, 9423987202

सेंद्रिय मालाला परदेशात मागणी आहे. काही खरेदीदार परदेशातही तो पाठवतात. सरकारने तशी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. परदेशात प्रदर्शन, महोत्सवांचे आयोजन करून बाजारपेठा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्यातून सेंद्रिय मालाला निश्‍चितच चांगला दर उपलब्ध होईल -अरुण देसाई








by - राजेंद्रजी  घोरपडे

नाशिकच्या माणिक कासार यांची सेंद्रिय तपश्चर्या, १८ वर्षांपासून करीत आहे १०० टक्के सेंद्रिय शेती




कीटकनाशके, खते, तणनाशके यांचा शेतीमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वापरामुळे तयार होणाऱ्या शेतीमालातही त्यांचे अंश उतरतात. कीटकनाशकाचे अंश असलेला भाजीपाला व धान्य खाणे मानवी शरीराला धोकादायक असते. हा धोका कर्करोगासारख्या भयंकर विकारात परिवर्तीत होऊ शकतो. याबाबत थोड्या प्रमाणात का होईना जनजागृती होते आहे. केन रिसर्चच्या अहवालानुसार भारतातील कीटकनाशकांची उलाढाल २०२० पर्यंत ४८४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज अलीकडच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. यावरून देशभरात कीटकनाशकाचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो याचा यांचा अंदाज निश्चितच आपल्याला येईल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज ओळखून नाशिक जिल्ह्यातील शेवगे दारणा येथील माणिक महादू कासार सुमारे १८ वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. त्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांनी निर्माण केला आहे. सेंद्रिय शेती करताना सुरवातीला त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. आज ते जो काही शेतमाल तयार करीत आहे तो माणसाचेच नाही तर जमिनीचेही आरोग्य राखत आहे. त्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी विकसित केलेली आदर्श शेतीपद्धत जाणून घेण्याचा युवर स्टोरीने केलेला एक प्रयत्न.






माणिक कासार यांची शेवगे दारणा या गावात ८ एकर जमीन आहे. कॉलेज सोडल्यानंतर १९८५ पासून त्यांनी शेतीकामाला सुरुवात केली. शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांचे वडील रासायनिक शेती करायचे, मात्र १९९८ पासून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. १२वी पर्यंत त्यांनी काॅमर्संचा अभ्यास केला होता. अर्थकारण आणि आकडेवारीनुसार त्यांनी अभ्यासले की, रासायनिक शेती खूप महाग असून परवडण्यासारखी नाही. “१९९० पासून खूप अडचणी यायला लागल्या. त्यावेळी आमच्याकडे द्राक्षाची बाग आणि सर्व प्रकारची पिकं होती. एकत्रित कुटुंब पद्धती आणि पस्तीस ते चाळीस एकर शेती आमच्याकडे होती. सर्व अन्नधान्य पिकत असताना अपेक्षित बाजारभाव मात्र मिळत नव्हता. दुसरीकडे खते, औषधे यावर जास्त खर्च व्हायचा. त्या दरम्यान दरवर्षी काही ना काही मोठी अडचण समोर येऊन ठाकायची. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी मुंबई बॉम्बस्फोट, यांसारख्या घटनांमुळे बाहेर विक्रीसाठी माल पाठवायला खूप अडचणी यायच्या. तीन ते चार वर्ष सारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले. एक वेळ तर अशी आली की तीन रुपये प्रमाणे द्राक्षं विकावी लागली. खूप नुकसान सोसावे लागले. अशा प्रकारे ९६-९७ पर्यंत सातत्याने आम्ही अडचणींचा सामना केला”. कासार सांगत होते.








उसाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटलं होतं. खर्च खूप वाढला होता. खताचा वापर किती केला जात होता याचा काही हिशोब नव्हता, मातीचं परीक्षण केलं नव्हतं. नियोजनाचा अभाव होता. सारं काही अज्ञान होतं. संपूर्ण जमीन खराब झाली होती. जमिनीकडे फारच दुर्लक्ष झालं होतं. काहीतरी पर्याय शोधला पाहिजे म्हणून कासार आणि कुटुंबीय प्रयत्नशील होते. यावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सुरू केला. नाशिकमध्ये अनेकांना हीच समस्या भेडसावत होती. काही सेंद्रिय जाणकार व्यक्तींच्या संपर्कात ते आले. कश्यप ग्रुपच्या पाळे सरांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन करणाऱ्या तीन दिवसाच्या शिबिराला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती करायचा निर्णय घेतला. कुटुंबातून खूप विरोध झाला, पण त्यांनी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी सेंद्रिय शेतीच करायची. त्यावेळी सेंद्रिय शेती ही संकल्पना नवीनच होती. त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. या पद्धतीने उत्पादन कसे मिळणार अशी लोकांत चर्चा होती. कासार यांनी मात्र निष्ठेने कामाला सुरवात केली.





“जमिनीच्या सेंद्रिय कर्वाच प्रमाण वाढवणं खूप गरजेचं होतं. बुरशीनाशकासाठी काय करायचं, खतासाठी काय पर्याय वापरायचा. जीवामृताचा वापर कसा करायचा. या साऱ्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं. मग मी योगेश्वर ग्रुपच्या माझ्या मित्रांना विचारायचो आणि त्याप्रमाणे कृती करायचो. मजुरांचा वापर न करता कामं केली. त्यानंतर पिकामध्ये फेरफार करणे गरजेचे होते. द्राक्ष या पिकामध्ये फेरफार करणे शक्य नव्हते. आम्ही सर्वप्रथम जमीनच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण वाढवण्यास भर दिला. त्यावेळी सेंद्रिय कर्वाचं प्रमाण ०.३५ इतकं कमी झालं होतं. म्हणजे जमीन जवळजवळ नापीकच झाली होती. त्यानंतर एकदल द्विदल धान्य पेरून, ते कापून पुन्हा जमीन टाकायचो. अशा पद्धतीने चार वर्षात आमच्या जमिनीच्या सेंद्रिय कर्वाचे प्रमाण २.५ इतके झाले. त्यावेळी आर्थिक गणित फारच विस्कळीत झालं होतं पूर्णतः तोटा सहन करावा लागला होता. मात्र जमिनीचा पोत सुधारला यातच आम्हाला आनंद होता, समाधान वाटत होते. सुरवातीला एक- दोन वर्षे उत्पादन जेमतेम होते. परंतु सततच्या प्रयत्नाने त्यात यश येत गेले. जमिनीची सुपीकता वाढत गेली. उत्पादनात वाढ होऊ लागली.

त्यावेळी सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा केवळ १२ किवा १३ मि.मी. असायचा, तर रासायनिक शेतीतून येणाऱ्या द्राक्षाचा आकार हा १८ ते २१ मि.मी. असतो, ज्याची लोकांना सवय झाली आहे. त्यामुळे आम्ही उत्पादित केलेली द्राक्षं कोणी विकत घेईना, म्हणून मग आम्ही ती फुकट वाटली. काहीना भेट म्हणून दिली, जेणेकरून लोक चव चाखून पुढील वर्षी द्राक्षं आमच्याकडून घेतील. आर्थिक तोटा सहन केला मात्र आम्ही जिद्द सोडली नाही. नैसर्गिक खतांचा आणि बुरशीनाशकाचा वापर केला. गोमुत्र, शेणखत आणि गाईच्या दुधाचा देखील बुरशीनाशक म्हणून वापर केला. सेंद्रिय शेती करत असताना त्यांचा रासायनिक कीटकनाशकांवर करावयाचा खर्च पूर्णपणे वाचला होता.





दुसऱ्या वर्षी कासार यांच्या द्राक्षाला चांगली मागणी आली. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने सूर्यप्रकाशात मनुकादेखील तयार केला. तयार झालेले द्राक्ष निर्यात करण्याचे ठरवले. २००९मध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या पानांचे आणि देठांचे नमुने तपासणीसाठी केंब्रिजच्या लॅबमध्ये पाठवले होते. त्यावेळी सगळ्यांचे नमुने रिजेक्ट झाले फक्त कासार यांच्याच नमुन्यांना मान्यता मिळाली, ज्यामध्ये ४५७ प्रकारचे विश्लेषण करण्यात आले होते. भारतामध्ये फक्त ९७ प्रकारची विश्लेषण पद्धती आहे. ज्यानुसार सेंद्रिय शेतीचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. कासार यांनी हॉलंडच्या एका ग्राहकाशी करार केला होता. तिथल्या एका सुपरमार्केटमध्ये त्यांची द्राक्षं विक्रीसाठी ठेवण्यात येणार होती. मात्र तिथे सर्वात मोठी अडचण आली ती म्हणजे मागणी तेवढा पुरवठा करणे त्यांना शक्य नव्हते. कारण इतर शेतकऱ्यांची द्राक्षं नाकरली गेली होती. त्यामुळे मग त्यांचीही निर्यात थांबली, त्यांना तोटा सहन करावा लागणार होता. मात्र समोरील ग्राहकाने वास्तव समजून घेऊन कासार यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. आणि सांगितले की, “तुम्ही सेंद्रिय पद्धतीनेच शेती करा”.

“सेंद्रिय शेती करताना उत्पादन खर्च फारच कमी होता. मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षाला अपेक्षित किमत मिळायची नाही, निसर्ग आणि वातावरण पाहून फारच काळजी घ्यावी लागायची. डोक्यावर सारखी टांगती तलवार असायची त्यामुळे मग द्राक्ष घेणे बंद केले” कासार सांगतात. एवढे नुकसान सोसूनसुद्धा रासायनिक शेती करायची नाही यावर मात्र ते ठाम होते. कारण कीटकनाशकांचा वापर करताना आरोग्यावर काय परिणाम होतात याची त्यांना जाणीव होती. ते सांगतात, “खरं तर चांगलं खाण्याची लोकांची मानसिकताच राहिली नाही. कमीत कमी किमतीत लोकांना चांगले चकचकीत दिसणारे उत्पादन हवे असते. ते विकत घेत असलेला माल कुठे आणि कसा तयार झाला हे जाणून घ्यायची तसदी सुद्धा ते घेत नाही”.





सेंद्रिय शेतीमध्ये फायदा होतो का ? असे विचारले असता कासार सांगतात की,

“ फायदा होतोच ना ! उत्पादन घेताना फारसा खर्च करावा लागत नाही, महागड्या रासायनिक खतांवर आणि कीटकनाशकांवर खर्च करावा लागत नाही. रासायनिक शेतीच्या तुलनेत भरघोस उत्पन्न जरी नाही मिळाले तरी जे उत्पन्न येते ते खऱ्या अर्थाने आरोग्यास लाभदायक असते. ज्याची तुलना भरघोस होणाऱ्या नफ्यामध्ये केली जाऊ शकत नाही. आपण लोकांना विषारी नाही तर सकस धान्य पुरवठा करत आहोत याचे आत्मिक समाधान वाटते. प्रत्येक शेतकऱ्याने याविषयीचे सामाजिक भान कुठेतरी जपले पाहिजे अशी माझी सर्व शेतकरी बंधूना कळकळीची विनंती आहे.”

कासार यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये -


-सन १९९८ पासून संपूर्ण सेंद्रिय शेती. तेव्हापासून रासायनिक घटकांचा अंशदेखील शेतात वापरलेला नाही.
-देशी गाईंचे शेण, दुध, तूप, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जिवामृत, जिवाणूखते आदींचा वापर
-देशी गाईंचे संगोपन, त्यांच्या शेणखताचा वापर.
-सेंद्रिय कर्ब २.५ टक्का.
-पिकांचा पालापाचोळा जागेवरच कुजवला जातो.



सध्या कासार यांच्या शेतात डाळिंबे. पेरू, टमाटे तसेच भाजीपाला लावला आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. लोकांना अलीकडे सेंद्रिय शेतीचे महत्व समजू लागले आहे. सेंद्रिय मालाला दरही थोडा जास्त मिळत असल्याने तेथे फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीत जमिनीची सुपीकता मात्र कायम वाढतच जाते. 




















by- //marathi.yourstory.com/

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !




सेंद्रीय शेती हा विषय आज जी-२० देशांच्या जागतिक परिषदेत देखील अधोरेखित करण्यात आला आहे. सेंद्रीय शेतीचे महत्व त्यामुळे आता सा-यांनाच पटले असावे. त्यादिशेने कृती करताना मात्र अनेकदा विलंब होताना दिसतो. मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी काय हवे असते तर शुद्ध हवा, पाणी, सकस अन्नधान्य. परंतु आज यातली एकही गोष्ट सहजपणे उपलब्ध होताना दिसत नाही. पण असा सात्विक भाजीपाला देण्याचा प्रयत्न ठाण्यातील दोघा अभियंता मित्रांनी केला. सतीश सूर्यवंशी, गिरीश अावटे या दोघा मित्रांना आणि त्यांच्या साथीदारांना गावाकडच्या त्यांच्या शेतात तसेच अन्य शेतकऱ्यांच्या सहाय्याने सेंद्रिय शेती करून, उत्पादीत भाजीपाला आणि फळे ग्राहकांच्या थेट दारात पोहचवण्याची संकल्पना सुचली.




सात्विकचे संस्थापक सतीश सूर्यवंशी, गिरीश अावटे



लोकसंख्यावाढीमुळे पाण्याची, प्रदूषणाची, बेरोजगारीची, अन्नधान्याची समस्या निर्माण झाली आणि एकूणच जीवनावश्यक घटकांचे संतुलन बिघडले. १९६० च्या दशकात जी हरितक्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याकडे लक्ष देण्यात आले, यात उत्पादन वाढले, मात्र उत्पादित मालाला गुणवत्ता राहिली नाही. लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा भागू लागल्या, मात्र शेतकरी आणि ग्राहक यांच्यात असलेल्या दलालांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे कष्टकरी शेतकरी हवालदिल झाला. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे पाणी, हवा, मिळणारी उत्पादने स्वच्छ राहिलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. रासायनिक खतांच्या वापराने शेतजमिनी नापीक झालेल्या दिसून येत आहेत. तेव्हा मूळ समस्या निवारण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. नेमकी हीच गरज ओळखून ठाण्यातील या मित्रांनी घरपोच सात्विक भाज्या देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पिकवलेला भाजीपाला पूर्णतः सेंद्रिय असला पाहिजे हे तत्व त्यांनी ठरवून घेतले. त्यानंतर या मित्रांनी सातारा आणि बारामती येथील काही शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. रासायनिक खतांचा आणि फवारणीचा वापर त्यांच्या जमिनीसाठी आणि ग्राहकांसाठी कसा घातक आहे हे सांगत देशी गायीच्या शेणखताचा वापर करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे सुचविले. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न कमी होईल असे तिथल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे होते, मात्र उत्पादन जरी कमी असले तरी या सेंद्रिय उत्पादनाला चांगला बाजारभाव तसेच बाजारपेठ मिळेल अशी हमी दिल्यावर शेतकऱ्यांनी त्यांची कल्पना मान्य केली. प्रथम तिथल्या प्रामाणिक शेतकऱ्यांची चाचपणी केली जे पूर्णतः सेंद्रिय शेतीउत्पादन घेतील. अश्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दलाली व्यवस्था मोडीत काढत, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या मदतीने डिसेंबर २०१४ मध्ये ‘सात्विक’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला शेतातून थेट स्वयपाकघरात पोहचवण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली.




ठाणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे





“सुरवातीला एका शेतकऱ्याकडून फळे, भाजीपाला घेण्यास प्रारंभ केला. त्याला योग्य तो हमी भाव मिळाल्यावर इतरही शेतकरी आमच्या या उपक्रमात सहभागी झाले आणि आज तब्बल ७५ ते ८० शेतकरी आम्हाला जोडले गेले आहे. विशेषतः मालेगाव-सातारा येथील विक्रम कदम व प्रमोद कदम, बारामती तालुक्यातील चोपडजचे महादेव निंबाळकर आणि संघवीचे शिर्के गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्या सहकार्यशिवाय हे काम करणे शक्यच नव्हते. प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच ‘सात्विक’ची पाळंमुळं घट्ट रोवली गेली असल्याचे गिरीश युअर स्टोरीशी बोलताना सांगतात.








सतीश सूर्यवंशी आणि गिरीश आवटे हे दोघेही व्यवसायाने अभियंता असून सतीश इलेक्ट्रॉनिक्स तर गिरीश हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. सतीश रिलायन्स, टाटा सारख्या नामवंत कंपन्याबरोबर उच्च पदावर कार्यरत होते. “ या ठिकाणी काम करत असताना आमचे वरिष्ठ पदाधिकारी नेहमी आॅरगॅनिक फूड प्राॅडक्ट बद्दल चर्चा करत असत. घरी शेती व्यवसाय असल्याकारणाने मला शेती व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान होते. माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना मी सहलीकरिता शेतावर घेऊन जात असे, त्यावेळी एकूणच शेती आणि सद्य परिस्थितीवर चर्चा होत असे आणि मग त्यातूनच सात्विकची कल्पना डोक्यात घर करू लागली” सतीश यांनी सांगितले. त्यांचे सहकारी गिरीश यांची स्वतःची इनफोकेअर टेकनॉलाॅजी ही कंपनी आहे. सध्या ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सात्विकचे मार्केटिंग नेटवर्क विस्तृत करण्यास प्रयत्नशील आहेत. या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील कारकिर्दीला रामराम ठोकत पूर्णतः या कामात झोकून दिले आहे. अन्नधान्य, फळभाज्यांसंबंधी कॉर्पोरेट क्षेत्रातील गरज आणि सद्यस्थितील बाजारपेठ याची पुरेपूर जाण असल्याने तसेच या दोघांच्याही घरी शेती व्यवसाय असल्याकारणाने शेती करताना घेतले जाणारे कष्ट, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा, यासारख्या नानाविध समस्या आणि त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न. या आजघडीला भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्याचे काम या दुकडीने हाती घेतले आहे.




टीम सात्विक फूड



मुंबईसारख्या शहरात रेल्वेरूळानजीक सांडपाण्याचा वापर करत भाज्या पिकवल्या जातात आणि बाजारात उपलब्ध केल्या जातात. आपण जी फळे किवा भाज्या खातो त्या कुठून आल्या, कुठे आणि कश्या उगवल्या याची आपणा कोणालाही कल्पना नसते. सारं काही ‘दृष्टी आड सृष्टी’ असं चाललेलं आहे. दृष्टी आड सुद्धा एक सृष्टी असते आणि ती पण एवढी भयानक.... कालांतराने आरोग्यास या घातक भाज्यांचे दुष्परिणाम हे होणारच असे सतीश आणि गिरीश ठामपणे सांगतात. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा पालकपनीर मागवतो, तेव्हा शिजवलेला पालक रेल्वेरूळाजवळ पिकवलेला तर नाही ना ? याचा विचार करणेही गरजेचे असल्याचे हे दोघेजण सांगतात.

आज ग्राहकाला काय हवंय तर खात्रीशीर, नैसर्गिक, आरोग्यदायी अन्नधान्य, तेही वाजवी दरात आणि शेतकऱ्याला काय हवंय तर योग्य तो हमीभाव आणि खात्रीशीर बाजारपेठ. शेतातील फळभाज्यांचा थेट ग्राहकाच्या दारात पुरवठा केल्यास परस्परपूरक अशा दोघांच्याही गरजा पूर्ण होतात. दोन्हीकडे ‘विनविन सीच्युएशन’ निर्माण झाल्यास ग्राहकाला आपले आरोग्य जपता येईल तर शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाल्यास शेतकरी आत्महत्येसारख्या समस्या भेडसावणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी थोडाफार का होईना हातभार लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सतीश सांगतात.

‘सात्विक’ तर्फे फळे व भाजीपाल्याचे घरपोच वितरण :

सात्विक फूड या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कुटुंबाच्या आकारानुसार वेगवेगळ्या प्रकारची बास्केट तयार केलेली आहेत, या विषयीची विस्तृत माहिती www.satvikfood.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. चार ते पाच जणांच्या कुटुंबाला साधारणत: आठवडयाला पाच किलो भाजी लागते. त्यानुसार आठवड्याच्या भाजीचे एक बास्केट तयार केलेले आहे. आपल्याला हव्या त्या भाज्यांची ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर हे बास्केट घरपोच मिळते. थेट शेतातून येणारी ही भाजी ताजी असल्यामुळे आठवड्यापेक्षा जास्त दिवस ती सहज टिकू शकते. २० ते २५ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, गाजर, काकडी, यासारखे सात ते आठ प्रकारचे सॅलेड तसेच मिरची, कोथींबीर, आलं यासारख्या ओल्या मसाल्याचे पॅकेज या बास्केटमध्ये असते. दलाल मंडळीना चुकवून ही सेवा थेट शेतातून घरपोच असल्याकारणाने या फळ, भाज्यांचे दरही किफायतशीर आहे.

http://www.satvikfood.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल एसएमएसद्वारे ग्राहक आठवड्याला लागणाऱ्या भाजीपाल्याची नोंदणी नोंदवतात. त्यानुसार हा भाजीपाला मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पाठविला जातो. १०० ग्रॅम लसून, १०० ग्रॅम आले, ४ लिंबू, मिरची कढीपत्ता हा मिर्च-मसाला वेष्टन करून पाठविण्यात येतो, त्याचबरोबर केळी,कारली, मुळा, शेवगा, चिकू बिट, वांगी, बटाटे, वाटणा, वाल, मेथी, गाजर आणि घेवडा यांच्या जोडीला सेंद्रिय गुळ, काकवी देखील ग्राहकांच्या स्वयपाक घरापर्यंत पोहचवली जाते.

आजघडीला सात्विकचे बाराशेहून अधिक ग्राहक असून, दिवसेदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता शेतकऱ्यांचे नेटवर्कही वाढत आहे. सध्या ठाणे, मुलुंड, ऐरोली, गोरेगाव, पवई या मुंबईतील उपनगरांमधील ग्राहकांना सेंद्रिय भाजीपाला मागणीनुसार पुरविला जातो.

सेंद्रिय शेती पद्धती :

आपल्याला उपलब्ध झालेल्या फळभाज्या या सेंद्रिय आहेत हे कशावरून ओळखायचे ? असे विचारले असता त्यावर ते म्हणाले की, “ तुम्ही चव चाखून पहा तुम्हाला रासायनिक आणि सेंद्रिय यातला फरक निश्चितच जाणवेल”. सेंद्रिय शेतीसाठी पूर्णतः देशी बी-बियाणांचा वापर केला जातो ”. थोडक्यात सेंद्रिय किंवा ऑरगॅनिक शेती म्हणजे काय तर निसर्गाचे संतुलन राखून नैसर्गिक पध्दतीने शेती उत्पादन घेताना जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे ही मूळ संकल्पना. जमिनीची सुपीकता कायम राखली जावी. सेंद्रिय शेतीमध्ये गाईचे महत्व अनन्यसाधारण आहे. देशी गाईच्या शेणामध्ये अनेक घटक असतात. गाईपासून आपल्याला शेणखत, कंपोस्ट खत मिळते तसेच गोमुत्र हे कीटक नियंत्रणासाठी पिकांवर फवारले जाते. गोमुत्र आणि शेणखत आंबवले जाते ज्यामध्ये लिंबाची पाने, रुईची पाने, लसून तसेच १० ते १२ प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. या मिश्रणाचा वापर कीटक नियंत्रणासाठी केला जातो. कोणतेही कृत्रिम खते वापरली जात नाही. अशा पद्धतीने उत्पादीत केलेले धान्य कसदार असते. त्यात जास्त प्रथिने असतात. सात्विक कडे स्वतःची गोशाळा आहे. ज्यामध्ये पंचवीस खिलारी गाई आहेत. भाकड गाईंचा वापर विशेषतः शेणखतासाठी केला जातो.

शेतकरी गटाला प्रशिक्षण

सात्विक फुडसाठी कार्यरत असलेल्या शेतकरी गटाला वेळोवेळी शेतीतज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन तसंच प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेण्याबाबत सांगितलं जातं. खतं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. काढणीपश्चात तंत्रज्ञान, भाजीपाल्याची योग्य हाताळणी, विक्री व्यवस्था इत्यादी बाबत मार्गदर्शन केलं जातं.

सात्विक मुळे गावाकडे रोजगार निर्मितीत हातभार


शेतकऱ्याकडून आलेला सेंद्रिय भाजीपाला स्वच्छ धुवून निवडून ठेवला जातो. संपूर्ण मालाचे पॅकेजिंग शेतातच केले जाते त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य वजनात पॅकिंग केला जातो. यासाठी तिथल्या स्थानिकांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. तयार माल वातानुकूलित व्हॅनद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो

भविष्यातील योजना

६० ते ७० प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पन्न घेणे, त्यांचे पॅकेजिंग करणे आणि ग्राहकांपर्यंत सुस्थितीत पोहोचवणे फारच जिकरीचे काम आहे, पण आम्ही ते नेटाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यात कडधान्ये तसेच इतरही पीक उत्पन्न घेण्याचा सत्विक फुडचा प्रयत्नशील आहे. शहरातील मुलांना किवा तरुणांना प्रत्यक्षात शेती कशी करावी किंवा आपण जे अन्न खातो ते कश्या पद्धतीने पिकवले जाते याचा अभ्यास व्हावा यासाठी प्रयोगशील अग्रो-टूरिझम राबवण्याचाही त्यांचा मानस आहे.

























By- marathi.yourstory.com

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

श्री गणपती अथर्वशीर्ष - Shri Ganapati Atharvshirsh



हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥
त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥
त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥
ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि॥ २॥
अव त्वं माम्॥ अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥ अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥ अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥ अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥ त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥
त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥ त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥ त्वं शक्तित्रयात्मकः॥ त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥ अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥ अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥ बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥
संहिता संधिः॥ सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥ निचृद्गागायत्रीच्छंदः॥
गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥ तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥
नमोत्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये। नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्नानाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥
एतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते । स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥
सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ ।
अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति। इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति॥
यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥ यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥
यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥ य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥
ॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शांति॒: । शांति॒:॥ शांति॑:॥
॥ इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥

श्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्व !!! - Shri ganapati atharvshirsh meaning and importance





भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.
ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणार्‍या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥
ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥
ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥
ॐ त्रिवार शांति असो.
श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ:
ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥
मी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥
तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥
तूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥
तूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥
'गण' शब्दाचा आदिवर्ण 'ग्' याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण 'अ' याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. 'ॐ गं गणपतये नम:।' (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥
आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥
एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥
व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥
या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥
आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

|| संकटनाशन गणेश स्तोत्र || - || Sankatnashan ganesh stotra ||


श्री गणेश: अवतार व कार्य - Shri Ganesh Avatar and info..

श्री गणेशाचे अवतार दोन प्रकारचे आहेत. 
एक आविर्भाव म्हणजे स्वेच्छेने प्रकट होऊन विघ्ननाशनादी आवश्य कार्य साधून लगेच अंतर्धान पावणारा, अर्थात अगदी थोडा वेळ असणारा, वक्रतुंडासारखा अवतार आणि दुसरा अवतार म्हणजे अधिक काळ राहणारा अर्थात विशिष्ट कार्यासाठीच प्रकट व्हावयाचे, पण त्या अवताराबरोबर अनेक प्रकारच्या भक्तानुग्रही लीलाही करायच्या असा मयूरेश, विनायक इत्यादी अवतार होत. अर्थात दोन्ही प्रकारच्या अवतारांमध्ये भक्तजनांचे तपश्चर्यण व कामना, संकल्प सिध्यर्थ व अभक्तजन व असुरांना शासन वगैरे कारणाकरताच श्री गणेशांनी अवतार घेतले. येथे विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री गणेशाने कोठल्याही असुराचा वध केला नाही, तर त्याच्या मदाचा नाश करून त्याला आपल्या अंकित ठेवले. त्या त्या असुरामुळे समाजात बळावत चाललेल्या मदप्रवृत्तीचा नाश केला, हे खालील अवतारकार्यावरून दिसून येईल. त्या त्या असुराच्या नावावरून आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या आपल्यातील त्या त्या मदप्रवृत्तीचा नाश करावा, अशी अप्रत्यक्ष रीतीने श्री गणेशांनी आपणास शिकवण दिली, हे आपण लक्षात ठेवावयास हवे.
अवतार :
१. वक्रतुंड, 
२. एकदंत, 
३. गजानन,
४. लंबोदर, 
५. विकट, 
६. विघ्नराज,
७. महोदर, 
८. धूम्रवर्ण

कार्य :
 
 मत्सरासुराचा नाश ’ 
 मदासुराचा नाश
 लोभासुराचा नाश 
 क्रोधासुराचा नाश
 कामासुराचा नाश 
 दंभासुराचा नाश
 मोहासुराचा नाश 
 अहं असुराचा नाश.

शिकवण :
 
 आपल्यातील मत्सराचा नाश करणे.
 आपल्यातील मदाचा नाश करणे.
 आपल्यातील लोभाचा नाश करणे.
 आपल्यातील क्रोधाचा नाश करणे.
 आपल्यातील कामवृत्तीचा नाश करणे.
 आपल्यातील दंभाचा नाश करणे.
 आपल्यातील मोहाचा नाश करणे.
 आपल्यातील अहंपणाचा नाश करणे.

वरील अवताराखेरीज श्री गणेशांनी अनेक अवतार घेतले. ज्ञानारी आणि शुभ्रसेन राजा यांचे अनुक्रमे सुबोध आणि नरकेसरी हे दोन गणेशभक्त पुत्र होते, पण ज्ञानारी आणि शुभ्रसेन हे दोघे गणेशद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही गणेशभक्त मुलांचा अत्यंत छळ केला. श्री गणेशांनी अवतार घेऊन आपल्या बालभक्ताचे तसेच दुसरा एक बालभक्त बल्लाळ या सर्व बालभक्तांचे संरक्षण करून त्यांच्या पित्यांना शासन केल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता व असुरांचा नाश करण्यासाठी कारणपरत्वे श्री गणेशांनी इतरही अनेक अवतार धारण केल्याचे पुराण दाखले आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या अवतारामध्ये श्री गणेशांनी -
 
१. विनायकनामक अवतार घेऊन नरान्तक व देवान्तक यांचा नाश केला.
२. मयूरेशनामक अवतार घेऊन सिंधुसुराचा नाश केला.
३. श्री गणेशनामक अवतार घेऊन सिंदुरासुराचा नाश केला.
४. कपिलनामक अवतार घेऊन कमलासुराचा नाश केला.
५. वरदमूर्तीनामक अवतार घेऊन तामिस्रासुराचा नाश केला.
६. धूम्रकेतूनामक अवतार घेऊन धुमासुराचा नाश केला.

अशा प्रकारे अनेक अवतार घेऊन असुरांपासून लोकांचे रक्षण केले. सूर आणि असुर हे पौराणिक अलंकारिक शब्द असून सूर याचा अर्थ संवादी म्हणजे आत्मतत्त्वाशी निगडित असलेले व स्वानंदानुभव भोगणारे. असुर म्हणजे, अ म्हणजे नाही, सूर म्हणजे योग्य जे आत्मानुभवाच्या आनंदाच्या आड येणारे ते, म्हणजे कामासुर, मोहासुर इत्यादी. आपले षड्विकार हे आपल्या आनंदाच्या आड का येतात याचा विचार करता ज्या वेळेला या गुणांमध्ये मद उत्पन्न होतो तोच मद आत्मानंद नाश करणारा आहे. म्हणजे मदरहित हे गुण मानवजातीला अनुकूल आहेत. म्हणून त्यांचा नाश न करता त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या मदाचा नाश करणे हाच असुर विनाश होय. त्याच्याकरिता जी स्थिर बुद्धी ती बुद्धिदाता गणेश अथवा गणपती होय.




साभार : लोकप्रभा 

दोन गुरु - नाना पाटेकर - Story of Nana Patekar


वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. 
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. 'अपमान' त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
'अपमान आणि भूक' विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.







- साप्ताहिक विवेकच्या गुरुपौर्णिमा अंकात प्रकाशित, नाना पाटेकर यांचा लेख 'दोन गुरू'...

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

खाऊखुशाल : वेड लावणारी ‘येडय़ाची मिसळ'

ठाणे परिसरात चमचमीत मिसळ मिळण्याचे अनेक लोकप्रिय कॉर्नर आहेत.

श्रावण महिन्यात अनेकांना मांसाहार व्यज्र्य असतो. काही जण गणपती तर काही पुढे नवरात्रीपर्यंत मटण-मासे खात नाहीत. मात्र चमचमीत खाण्याची जिभेची सवय खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी अनेक जण र्तीदार मिसळ खाऊन दुधाची तहान ताकावर भागवितात. लालभडक गरमागरम रस्सा, त्यात आवडीनुसार फरसाण आणि त्यावर कांदा-कोथिंबीर पेरलेले मिसळीचे वाडगे समोर आले की खवय्यांची जणू ब्रह्मानंदी टाळीच लागते. त्यावर लिंबाची फोड पिळून पावासोबत हे स्वर्गीय चवीचे मिसळनामक मिश्रण म्हणजे शाकाहारातला मोठा बेतच.
ठाणे परिसरात चमचमीत मिसळ मिळण्याचे अनेक लोकप्रिय कॉर्नर आहेत. डोंबिवलीतील ‘येडय़ाची मिसळ’ त्यापैकी एक. सात सुरांच्या व्याकरणात बांधलेले संगीत इथून-तिथून सारखे असले तरी घराण्यांनुसार जसा सादरीकरणात फरक पडतो, असेच मिसळीचेही असते. ‘र्ती’ हा मिसळीची स्थायीभाव. बाकी इतर जिनसांमध्ये प्रदेशानुसार फरक पडतो. कोल्हापुरी, पुणेरी अशी मिसळीची घराणी प्रसिद्ध आहेत. आता काहींनी फ्यूजन करून वेगळी चव साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘येडय़ाची मिसळ’ मात्र अस्सल पुणेरी. पारंपरिक पद्धतीच्या घरगुती मसाल्यांचा वापर करून ही मिसळ बनवली जाते. लवंग, दालचिनी, दगडफुल, बडीशेप, मिरे आदी मसाल्यांचे पदार्थ दररोज सकाळी येथे दळले जातात. दीड ते दोन किलो सुके खोबरे इथे दररोज भाजले जाते. त्यानंतर मिसळीसाठी लागणारा तळका मसाला येथे बनविला जातो. दररोज जवळपास दहा किलो वाटाणे इथल्या मिसळीसाठी लागतात. र्तीचा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटते. पोटात कावळे ओरडायला लागतात. या मसाल्याचा गंध या परिसरात दरवळत असल्याने खवय्यांचा इथे गराडा पडतो. मिसळीची चविष्ट र्ती त्यावर टाकलेले शेव -फरसाण ,बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि पाव.. पाहूनच मन तृप्त होते. विशेष म्हणजे मिसळीची किंमतही तुलनेने कमी आहे. त्यामुळे पोट भरण्याचा हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
घरगुती दर्जेदार मसाल्यांचा वापर करून बनविलेली ही मिसळ तू इतक्या कमी किमतीला कशी देतोस, वेडाबिडा झाला नाहीस ना, असा आपुलकीचा प्रश्न माझ्या मित्रमंडळींनी विचारायला सुरुवात केली. त्यांनी प्रेमाने काढलेल्या त्या खरडपट्टीकडे मी दुर्लक्ष केले. उलट मिसळीचे बारसेच येडय़ाची मिसळ असे केले,’ मालक रवींद्र जोशी आणि हेमंत भालेकर यांनी कॉर्नरच्या काहीशा विचित्र नावामागची कहाणी सांगितली. दररोज इथे सरासरी शंभरेक प्लेट मिसळ संपत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय इथे दररोज सकाळी तीन किलो पोहे, तीन किलो उपमा आणि तीन किलो शिरा केला जातो. शिरा करताना त्यामध्ये केशर आणि केळ्याचा हमखास वापर करतात. तीन किलो शिऱ्यात किमान दोन किलो केळी टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त कधी अळूची वडी, कधी कोंथिबीर वडी तर कधी चक्क तांदूळ, मुगडाळ, रताळ्याची खीर असे पदार्थही इथे मिळतात. तांदळाची खीर करताना ते तांदूळ स्वच्छ धुतले जातात. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटले जातात. त्यात साखर, ओले खोबरे आणि दुधाचा समावेश केला जातो. येथील तांदळाच्या खिरीची चव लाजवाबच. त्यामुळे आणखी एक वाटी घेण्याचा मोह खवय्यांना आवरत नाही. मात्र श्रावणी सोमवारी किंवा उपवासाच्या दिवशीच या खिरीची चव चाखता येते. गरमागरम वाफाळलेले पोहे खाण्यासाठी येथे सकाळी खवय्ये गर्दी करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ हे कॉर्नर असल्याने सकाळी पोहे, उपमा किंवा शिरा खाऊनच नोकरदार गाडी पकडतात. तीन वर्षांपूर्वी हे कॉर्नर सुरू झाले. ते आता शहरभर प्रसिद्ध आहे. ‘येडय़ाची मिसळ’ कुठे मिळते, असा प्रश्न विचारत विचारत खवय्ये येथे येतात, अशी माहिती ऋचा जोशी यांनी दिली. मिसळपाव अवघ्या तीस रुपयांना तर पोहे, उपमा आणि शिऱ्याची डिश प्रत्येकी वीस रुपयांना मिळते. रविवारची संध्याकाळ सोडून आठवडाभर हे कॉर्नर सुरू असते.
Ads by ZINC
येडय़ाची मिसळ
  • कुठे?- १, गारवा सोसायटी, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, एव्हरेस्ट हॉलसमोर, डोंबिवली (प.)
  • कधी ?- सकाळी ८ ते रात्री १० आणि रविवार सकाळी ८ ते दुपारी २









भाग्यश्री प्रधान |
by - Loksatta

माझ्याबद्दल