बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींच्या लागवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या औषधी वनस्पतींकडे काहीसे दुर्लक्ष झाले आणि त्यांचा वापर आयुर्वेदिक  औषधांपुरता मर्यादित राहिला. तेव्हा आज माहिती करुन घेऊया, अशाच काही घरगुती औषधी वनस्पतींची.

  गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची जशी आपण परंपरा पाळतो, तशीच कडुलिंबाची पाने खाण्याचीही. वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून ही पाने खाल्ली जाण्याची प्रथा आहे. आपल्या प्रत्येक सणवारात फळाफुलांबरोबर पानांनाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोजची देवपूजा असोत की गणपतीची किंवा श्रावणातल्या मंगळागौरीची, पत्री या वाहिल्या जातातच. वर वर बघता ही सर्व अगदी साधारण, सर्वत्र आढळणार्‍या झाडांची पानं असतात. पण, जरा खोलात शिरलात की लक्षात येतं की, प्रत्येकाचे काही ना काही औषधी महत्त्व आहे. तुळस उपयोगी तर उष्णतेवर दुर्वा तर कृमी-विषमज्वरावर बेलाची पानं, म्हणूनच मंगळागौरीत वापरलेल्या पत्रीचा वापर दुसर्‍या दिवशी काढा करुन पिण्याची पद्धत होती.

  पूर्वी घरांना अंगण असायचं, लहानशी परसबाग असायची. स्त्रिया परसातून पत्री गोळा करत म्हणूनच अडीअडचणीला किरकोळ आजारांवर लागणारी औषधी पानं, गरज भासली की लगेच सापडायची. प्रत्यक्ष सेवन न करता काही वनस्पतींच्या सान्निध्यात राहिले तरी बरं वाटतं असे म्हणतात. तुळस दिवस-रात्र प्राणवायू देत असल्याने हवा शुद्ध राहते. ज्या गावात अडूळसा असेल, त्या गावात क्षयरोग होत नाही, असे म्हटले जायचे. आता मात्र आपण झाडांपासून लांब जात आहोत. लहान-सहान तक्रारींसाठी देखील घरगुती उपाय न करता सरळ आपण गोळ्या घेतो. कारण वरच्या मजल्यावर वास्तव्यास असल्यामुळे परसदार नाही, बाग नाही की झाडंही नाही. सुदैवाने आपण काही औषधी वनस्पती खिडकीतल्या बागेतही लावू शकतो. त्यांची सविस्तर माहिती करुन घेऊया…

 तुळस
घरोघरी तुळस असली तरी ती नीट वाढत नसल्याची बर्‍याच लोकांची तक्रार असते. टवटवीत पानांच्या, डेरेदार कृष्णतुळशीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. बेताचं पाणी आणि सतत मंजिर्‍या काढतं राहणंही तेवढच आवश्यक आहे. एक तुळस घरी असली की अनेक व्याधी घरा बाहेत जातात. सर्दी, पडसे, ताप यावर पानांचा रस गुणकारी ठरतो. तसेच  तुळशीच्या पानांबरोबरच इतर औषधी घालून चहा किंवा काढा केल्यास तो ही उपयोगी ठरतो. सारखी उचकी लागत असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधात कालवून देतात. त्वचारोगांवर तुळशीची पाने चोळली तरी त्याचा फायदा होतो.


 गवती चहा
  गवती चहाच्या पातीमुळे चहाची लज्जत तर वाढतेच, शिवाय तरतरीही येते. घरच्या घरी केलेल्या सुप्सला गवती चहामुळे हॉटेलसारखी चवही प्राप्त होते. गवती चहा हा एक रामबाण उपाय आहे. तापावरही या काढ्याने भरपूर घाम येऊन उपाय होतो. गवती चहाचे रोप कुंडीत असले तर त्याच्या शेजारी तुळसही असावी. कधी दमून भागून आलात की त्यांचे मिश्रण करुन गरमा-गरम उत्साहवर्धक पेय तयार होते. गवती चहाचे रोप लावल्यानंतर ते पहिली दोन वर्ष चांगले वाढते. त्यानंतर मात्र त्याची मूळं घट्ट होतात आणि नवीन पाती येत नाहीत. अशावेळी संपूर्ण झाड उपटून त्याचे लहान-लहान भाग करुन दुसर्‍या कुंडीत नव्याने लावावेत.


  ब्राम्ही
अत्यंत देखणी, नाजूक गोल पानांची शोभेची वनस्पती. या वनस्पतीला ‘मंडूकपर्णी’ही म्हणतात. हँगिंग बास्केट्समध्ये ब्राम्हीची छान वाढ होते. पाणी साचलं तरीही ब्राम्हीच्या वाढीवर परिणाम होत नाही. पूरळ, फोड येत असल्यास ब्राम्हीचा रस गायीच्या तूपात मध घालून घेतात. केसांच्या वाढीसाठी, स्मरणशक्ती वाढवायला देखील ब्राम्हीचे सेवन करतात. ब्राम्हीचे तेल सगळ्यांच्या परिचयाचे असेलच.


 पुदिना
 अपचन, अजीर्णावर पुदिन्याची ताजी पान गुणकारी सिद्ध होतात. चांगल्या दर्जाच्या पुदिन्याच्या बाजारातून आणलेल्या जुडीतल्या पाच-सहा काड्या कुंडीत खोचल्या तरी त्यांना मूळं फुटतात. मात्र, भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा जागेवर पुदिन्याची कुंडी ठेवावी. झाडाला भरपूर पाणी द्यावे. जेवढ्या फांद्या खुडाल, तेवढ्या त्याला शाखा फुटतात. अधून-मधून कुंडीत माती, खत घालत राहावे.


 कोरफड
बागकामाची आवड तर आहे, पण वेळ नाही, अशा हौशी लोकांसाठी हे सर्वगुण संपन्न झाड. एकदा कुंडीत लावलं, अधून-मधून पाणी घातलं की वर्षानुवर्ष काहीही काळजी न घेता कोरफड वाढते. कीड नाही की रोग नाही. कोरफडीचेही वेगवेगळे प्रकार असतात. तेव्हा जाणकार व्यक्तीला विचारुन कोरफडीची लागवड करावी. वापरायला सर्वात खालचं मांसलं पान घ्यावे. कोरफडीचे काटे धारदार चाकूने काढावेत. त्यानंतर सालं काढून गर वापरायला घ्यावा. जखम झाल्यास, हळदीत कोरफडीचा गर घालून त्याचा लेप लावावा. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठीही कोरफडीचा लेप फायदेकारक आहे. फेसपॅक म्हणूनही तो चेहर्‍यावर लावता येतो.केसांच्या अनेक समस्यांवरही कोरफडीचा लेप उपायकारक ठरतो. कोंडा, केसांचे गळणे, केसांची वाढ यासाठी कोरफडीचा गर मिक्सरमध्ये वाटून पातळ करुन लावल्यास उत्तम. खोकल्यावरही हा गर अत्यंत गुणकारी आहे. गर+सूंठ पूड आणि हळद मधात घालून चाटण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम मिळतो. पोट साफ न होण्याची तक्रार असेल तरी कोरफडीचा गर कामी येतो.



  रुई
 मारुतीला रुईची पानं माळेच्या स्वरुपात वाहतात. शेतात काम करताना रुईच्या औषधी गुणधर्मांचा फायदा मी अनेकवेळा घेतला आहे. काटा रुतून मध्येच तुटला की तो काढणे अवघड जाते. अशा वेळी चिकाचा एक थेंब लावला की तिथं फोड येऊन काटा काढणे सोपं होते. लहान मुलांचं पोट दुखलं की पान गरम करुन शेकतात.


 पानफुटी
 आपण बर्‍याचदा शोभेसाठी पानफुटी कुंडीत लावतो. अगदी कमी पाण्यावर लागणारे, मांसल पानांच देखणं झाड. पण आहे खूपच औषधी. मूतखडा झाल्यावर बरीच लोकं याच्या पानाचा वापर करतात. याच्या पानांचा रस जंतांवरही गुणकारी असतो. लहान सहान जखमांवर पानफुटीचा रस लावल्यास जखमेतून रक्त वाहात असल्यास थांबते.  खोकल्यावरही पानफुटी गुणकारी आहे. पानफुटीचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे जाणकार व्यक्तींना औषधी प्रकार कोणता हे विचारुनच वापरावे.


  दुवार्
 बर्‍याच वेळा  निर्माल्य कुंडीत टाकले की आपोआप दुर्वा रुजतात. उष्णतेमुळे येणार्‍या तापावर दुर्वा अत्यंत गुणकारी मानल्या जातात. म्हणूनच गणपतीला त्या वाहिल्या जातात. उन्हाळ्यात घोणा फुटतो आणि नाकातून रक्त येते, अशा वेळी दुर्वांच्या रसाचे दोन थेंब नाकात घालावेत.


 आघाडा
गणपतीच्या पत्रीतली ही वनस्पती अगदी जंगली वाढताना आढळते. कुणीही ती कुंडीत लावण्याचा प्रयत्न करत नाही. पण ही वनस्पती इतकी गुणकारी आहे की ती अवश्य लावावी. मला प्रत्यक्ष त्याची प्रचिती अनेक वेळा आली आहे. कावीळ झाली की भूक लागत नाही, अशाने अशक्तपणा वाढतो. माझ्या लेकीला असे झाले असता आदिवासी सहकार्याने मूळ उगाळून तो कालवून घ्याचा सल्ला दिला. काही तासातच तिला भूक लागली. काटा गेला की यांच्या पानांना ठेचून बांधले की काटा बाहेर निघतो. दाढ दुखत असली की आघाड्याची पानं चावून खावीत.


 निर्गुंडी
 निर्गुंडी कुंपणाला लावले जाते, हीच वनस्पती कुंडीतही लावता येते. दमून-थकून आल्यावर गरम पाण्यात निर्गुंडीचा पाला घालून आंघोळ केल्यास दुखर्‍या अंगाला आराम मिळतो. गावी तर शेतावर कष्ट करुन आलेल्या बैलांना देखील अशीच शेकत-शेकत आंघोळ घालतात. कुठे सूज आली की पाला वाटून गरम करुन शेकतात.


  झेंडू
 नवरात्रीत झेंडूचे महत्त्व खूप असते. खरं तर प्रत्येक सणालाच झेंडूची फुले आवर्जून वापरली जातात. झेंडूचे गुणधर्म एवढे असतात की, FIRST AID  म्हणून एक तरी रोपटं कुंडीत असावं काही वेळा सुखंटला स्पर्श  झाल्यावर प्रचंड खाज सुटते. अशावेळी पाल्याचा रस लावावा. जखम झाल्यावरही पानंाचा रस लावता येतो.


  नागवेल
 जेवणानंतर कुरकुरीत ताजं पान खायचे असेल तर ते आपल्या बागेतलंच असावं. ज्या  ठिकाणी सूर्यप्रकाश तीव्र नसेल तिथे हा वेल फोफावतो. चकचकीत हिरव्या रंगाच्या पानांचा वेल मनीप्लांट सारखा  चढवता येतो. पण कुंडीत पाणी कधीच साचू नये, वरच्यावर शेणखत/गांडूळखत घालत राहावे म्हणजे पानांचा आकार लहान होत नाही.


  अडुळसा
 खोकल्यावर अत्यंत गुणकारी औषध म्हणून अडुळसा सुपरिचित आहे. याची नुसती फांदी रोवली तरी त्याला मूळं फुटून चांगली रोपं तयार करता येतात. पक्व पानांचा रस करता येतो. पानं जराशी तव्यावर गरम करून वाटून पिळली की रस काढता येतो. हा रस मध घालून घेतात किंवा खडीसाखरही वापरता येते. अंगावर सूज आली असल्यास पानं तव्यावर गरम करुन सुजेवर बांधल्यास आराम मिळतो. पूर्वी याच्या वाळलेल्या पानांच्या पुड्या कपड्यांमध्ये ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे वस्त्रांना कसर लागत नाही. अडुळसाच्या पानांची बीडी करुन ओढताना मी लोकांना बघितले आहे. त्याने दमा कमी होतो असे म्हणतात.


 गुलाब
 सर्वांच्या परिचयाचे आवडते फूल गावठी गुलाब. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ‘‘गुलाब पंखूडी‘‘ मिठाईवर घालतात. रोज जरी एक-दोन फुलं लागली तरी त्याचे गुलकंद करता येते. खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे थर करुन बर्णी उन्हात ठेवली की छान गुलकंद तयार होतो. पित्त, उष्णता, शौचास साफ होणे, डोळ्यांची जळजळ अनेक व्याधींवर उपयुक्त ठरते.


 जास्वंद
 जास्वंद अर्थात गणपतीचे लाडके फुल. गावात लहान मुलं जास्वंदाच्या पाकळ्या खाताना दिसतात. जास्वंदाची फुलं खाल्ली की कृमींचा नाश होतो असे म्हणतात. मेंदूची तरतरी वाढवण्यासाठी देखील जास्वंदाची फुले खडीसाखरे बरोबर खाल्ली की  फायदा होतो. पानांचा-फुलांचा वापर करुन तेल बनवता येते. त्याने केस काळेभोर, लांब सडक राहतात.


  औषधी वनस्पती लावताना हे लक्षात घ्यावे  या वनस्पतींचा वापर वैद्यांना विचारूनच करावा.


  कुंडी व्यवस्थित भरावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली मोठं छिद्र असावं, माती आणि कुजलेलं शेणखत किंवा गांडूळखत २:१ प्रमाणात मिसळून भरावे औषधी वनस्पतींवर रोग किंवा कीड लागल्यास रासायनिक औषधांचा वापर करु नये.  उन्हात वाढलेल्या वनस्पतीमध्ये सावलीत वाढलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त गुणधर्म असतात




सौजन्य : दै. मुंबई तरुण- भारत  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल