शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

*साबणाचा पुनर्जन्म-*

 *साबणाचा पुनर्जन्म-*_


        हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. 
प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. 

पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जाऊन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. १-२ दिवस वापरून ग्राहक साबण तसाच ठेवतात (काही ग्राहक घरी नेतातही !) आणि त्या उरलेल्या साबणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल्स कडे येऊन पडते. 

तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या साबणाला इतकं काय महत्व द्यायचं ? पण मित्रांनो तसं नाहीये ! 

 हा खरंतर जगभरात एक मोठा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ भारतातच बघा. भारतात साधारण ५०,००० हॉटेल्स असतील असं गृहीत धरूया (प्रत्यक्षात जास्तच असतील) , प्रत्येक हॉटेल मध्ये सरासरी १० रूम्स धरल्या तर एकूण ५ लाख रूम्स आहेत. 
७०% occupancy rate ने साधारण ३.५ लाख रूम्स दररोज वापरल्या जातात. म्हणजेच दररोज ३.५ लाख साबण थोडेसे वापरून फेकून दिले जात आहेत. 

 'या साबणांचं काय करायचं ?' असा प्रश्न खचितच हॉटेल मधील कुणा गेस्टला पडला असेल ! 
पण १४ वर्षांपूर्वी अमेरिकेत एका माणसाला हा प्रश्न पडला.

 नुसत्या प्रश्नावर तो थांबला नाही तर त्याचं उत्तरही त्याने शोधलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या उत्तराने जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचवले !

 त्याने साबणाला पुनर्जन्म दिला आणि अनेकांना मृत्यूपासून वाचवलं ...त्याची ही गोष्ट. 

अमेरिकेतील शॉन सिपलर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत होता. शॉन ला कामानिमित्त जगभर फिरावं लागत असे. 
इतकं की वर्षातील १५०-२०० दिवस तो हॉटेल्स मध्येच राहत असे. 

 २००८ साली अशाच एका हॉटेल मध्ये शॉन थांबला होता तेव्हा त्याला अर्धवट वापरलेल्या साबणाचं पुढे काय होतं हा प्रश्न पडला.
 त्याने लागलीच रूम सर्विसला फोन केला आणि "वापरलेल्या साबणांचं तुम्ही काय करता ?" हा प्रश्न विचारला. उत्तर आलं, "आम्ही वापरलेले साबण फेकून देतो."

 शॉन ने थोडी आकडेमोड केली आणि त्याला लक्षात आलं की लाखो साबण दररोज फेकले जात आहेत. 
यावर आपण काहीतरी करायला हवं. तो विचार त्याच्या डोक्यात घर करून बसला. 

काही आठवड्यानंतर तो जेव्हा घरी परतला तेव्हा जवळच असलेल्या Holiday Inn हॉटेल मध्ये जाऊन त्याने हाच प्रश्न विचारला.
 उत्तर ही तेच मिळालं.

 त्याने मॅनेजरला विचारलं "टाकून देण्याऐवजी तुम्ही हे साबण मला द्याल का ?"
 मॅनेजर ने होकार दिला. 
त्याच दिवशी त्याने सहा आणखी हॉटेल्सना भेट दिली आणि सगळ्या हॉटेल्सने होकारच दिला.
 
 एका महिन्यातच शॉन असे हजारो साबण घेऊन आला आणि मित्रांच्या साहाय्याने आपल्या गॅरेज मध्येच एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. 
त्याने बटाटे सोलावेत तसे साबणाचा बाहेरचा भाग सोलून काढला. त्यानंतर ग्राइंडर मध्ये टाकून या साबणांचा चुरा केला. हा चुरा वितळवून नंतर साबणांच्या मोल्ड मध्ये टाकला. एक रात्र सुकविल्यानंतर दुसऱ्या दिवशी साबणाच्या वड्या कापल्या. आणि नवीन साबण तयार ! 
या सगळ्यासाठी त्याने किचन मध्ये वापरली जाणारे टूल्सच वापरले.
 या त्याच्या गॅरेजमधून लवकरच तो दररोज ५०० साबण तयार करू लागला. 

साबण तयार तर होऊ लागले पण त्यांचं करायचं काय ? 

 शॉनच्या वाचनात हे आले होते की जगभरात दररोज सुमारे ९,००० बालके अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण पावतात.
 यापैकी निम्याहून जास्त मृत्यू केवळ नियमित हात धुतल्याने टाळता येऊ शकतात. 

आपण तयार केलेले साबण अनेक गरीब देशांतील या बालकांपर्यंत पोहोचविण्याचा शॉनचा प्रयत्न होता. 
यासाठीच त्याने 'Clean The World' नावाची संस्था सुरु केली. 
        
कल्पना उद्दात्त असली तरी प्रत्यक्षात उतरवणे कठीण होते. हजारो हॉटेल्स मधून साबण गोळा करून, प्रोसेस करून, दूरवरच्या अनेक देशांत पोहोचविणे logistics च्या दृष्टीने कठीण होते आणि यासाठी पैसा उभारावा लागणार होता. 

देणगी देणाऱ्या अनेक संस्थांकडे त्याने प्रयत्न केले पण पैसे उभे करणे जमत नव्हते. 
इकडे साबणाचा साठा पण वाढत होता. लवकरच काही केले नसते तर शॉनला हा पूर्ण प्रकल्पच बंद करावा लागणार अशी चिन्हे दिसत होती. 

 तेव्हाच शॉन सिपलर ने एक नवीन बिझनेस मॉडेल वापरायचे ठरवले. त्याने स्वतःच्या संस्थेला एक प्लॅटफॉर्म बिझनेस बनविले.

 जसा उबर हा ग्राहक आणि टॅक्सीचालक यांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे तसा 'clean the world' हा हॉटेल्स आणि गरजू बालके याना जोडणारा प्लॅटफॉर्म आहे. 

यात दोन्ही बाजूना फायदा व्हावा अशी योजना असते.   

 शॉनने 'clean the world' मध्ये सहभागी होणाऱ्या हॉटेल्सना प्रत्येक रूममागे १ डॉलर प्रति महिना अशी नाममात्र फी आकारायला सुरुवात केली. 

या फी मध्ये हॉटेल्सना तीन फायदे झाले. पहिला म्हणजे साबणाची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीतून मुक्ती, दुसरा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने Sustainability Goals पूर्ण करण्यासाठी मदत आणि तिसरा म्हणजे हॉटेलचा सोशल इम्पॅक्ट दाखविण्याची सोय !

 त्याचसोबत United Nations, Unicef, children International या संस्थांसोबत काम करून साबणाची आवश्यकता जिथे आहे, तिथे ते पाठविण्याची सोय केली. 

लोकल क्लिनिक्स आणि शाळांसोबत या संस्था काम करतात. लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवतात, साबण वाटप आणि वापराची देखरेखही करतात.

सध्या 'Clean the world' ८००० हॉटेल्स (१.५ मिलियन रूम्स) सोबत काम करत आहेत, जगभरात ८ पेक्षा जास्त देशांत साबण प्रोसेस करण्याचे कारखाने त्यांनी सुरु केले आहेत.
१२७ देशांत सात करोड साबण आतापर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत, आणि हे करत असताना समुद्रात/जमिनीत जाणारा २३ मिलियन पाउंड कचरा कमी केला आहे. 

याचे सीरिया मधील रेफ्युजी, सोमालिया, बांगलादेश, पाकिस्तान, झाम्बिया, होन्डुरास हे आफ्रिकन देश सगळ्यात मोठे लाभार्थी ठरले आहेत. 

अजूनही जगातील ३ बिलियन लोकांकडे साबणासारखी साधी पण जीवनावश्यक सुविधा पोहोचलेली नाही आणि अजूनही हजारो हॉटेल्स साबण फेकून देत आहेत. 

'clean the world' पासून प्रेरणा घेऊन इतर देशांमध्येही असं काम करणाऱ्या संस्था उभ्या राहू लागल्या आहेत.

 शॉनने एकापेक्षा अधिक समस्या आपल्या युनिक आयडीयाने सोडवले आहेतच, तेही कुणाच्या देणगीवर अवलंबून न राहता एक प्रोफीटेबल बिझनेस उभारून !

आजही शॉन सगळ्यांना हेच सांगतो '...तुमच्या वाॅशबेसिनवर पडून असलेला तो साबणाचा तुकडा कुणाचातरी जीव वाचवू शकतो... तो वाया घालवू नका !'
 
मंडळी नेटभेटच्या वाचकांसाठी आम्ही असेच अनेक उपयुक्त लेख, विडिओ मराठीतून आणत असतो. तेही विनामूल्य ! 

तुम्ही देखील हे ज्ञान आपल्याकडे न ठेवता पुढे पाठवा... न जाणो कुणी "शॉन" हे वाचेल आणि जगाला वाचवेल ! 























By- Internet

गृहपाठ

 


इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. 

या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. 
ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती. 
जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 

संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. 
प्रश्न हा नाही कि त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटर बरोबर बोलता कसे आले तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले? 
ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?
या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात.....!!!  
  
ब्रिटनमध्ये मुलं तीन वर्षाचे झाले कि त्याला शाळेत प्रवेश मिळतो, आई वडील दोन्ही नोकरीलाअसतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना ABCD शिकवतात ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. 
आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते. 

फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर आपलय रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, इलेकट्रीशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 
असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते, त्या बालमनांना त्या दिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 
आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 
पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिक अधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. 

यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेक्यानिकपासून ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टर पर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 
आम्ही कुठेय....? 
हा प्रश्न आम्हाला पडतो का? 

मुलांवर ओझे अपेक्षांचे 
गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा चर्चा करत राहिलोय 
पण या बालमानच्या मनावरील ओझ्याचे काय? 
फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाटाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? 
याला पालकपण जबाबदार नाहीत का? 

माझ्या मुलाला शाळेत गेले कि आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत, मुलाना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, 
याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का? 

ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहरीत पोहले पाहिजे रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या वयात इतरांचे मुलं मुलांसारखे स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंग मध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताचा इंग्लिशच्या कलासला पण जबरदस्तीने बसवतोय. 
आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळया जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत. 
त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही. 
सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 
मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाटाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय. 
आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? 
हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याचा मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 

स्पर्धांची गरज आहे का? 
मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?

गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? 
तो आई वडिलांबरोबर आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 
वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? 
ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 

माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात मुलं इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 
याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 
शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 
एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोंकाना विचारून खात्री करून घेतायत की खरेच आज गृहपाठ नाही ना. 
आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? 

खरेच या बालमानांना एव्हढ्याश्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 

माझे मुलं सर्वच विषयात सर्वच खेळता सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमानांना जीवघेणी स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ..     












By- Internet

 

माझ्याबद्दल