बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

आकाशकंदिलाची लाखांची गोष्ट



आकाशकंदिलाची लाखांची गोष्ट
आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो.





X




बार्शी येथून लग्न होऊन पुण्यात आलेल्या गोदावरी सातपुते यांनी आकाशकंदील बनवण्यास सुरुवात केली आणि अखंड कुटुंब यात रंगलं. कल्पकता आणि मेहनतीमुळे वाढलेल्या या व्यवसायामुळे दर दिवाळीत त्यांचे आकाशकंदील अनेकांची घरे उजळवतात..

आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो. आपल्या व्यवसायासाठी एखादी झकास आणि नवीन कल्पना आपल्याला हवी असते. अशी एखादी कल्पना सुचली की लग्गेच व्यवसाय सुरू करायचा असाही आपला बेत असतो. पण अजुनपर्यंत कुणालाच न सुचलेली अशी नवीन कल्पना आपल्याला सापडतच नाही आणि मग बहुतेक वेळा व्यवसाय सुरू करायच्या नुसत्या वायफळ गप्पाच राहातात. पण खरं सांगायचं तर एखादी साधी सोपी संकल्पनासुद्धा नीट लक्ष देऊन जोपासली तर किती छान व्यवसाय होऊ शकतो हे गोदावरी सातपुते यांच्याकडे पाहिल्यावर कळते!

मुळच्या बार्शी, सोलापूर इथल्या गोदावरीताई दहावी झाल्या, पण पुढच्या शिक्षणासाठी २५ कि.मी. लांब जावे लागत असल्याने शिक्षण बंदच झाले. मग घरच्या घरी लोकरीची तोरणं आणि इतर वस्तू करून विकायला त्यांनी सुरुवात केली. वडील शेतकरी, त्यामुळे पैशाची अडचण असायचीच. अशा वस्तू विकून घराला थोडाफार हातभार लागायचा इतकंच. मग दोन-एक वर्षांत लग्न होऊन त्या पुण्याला आल्या.

खेडेगावातून शहरात आल्याने पहिली वर्ष-दोन र्वष तर अशीच गेली. आपण नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करायला हवं असं त्यांना नेहमी वाटायचं पण नक्की काय करायचं हे मात्र ठरत नव्हतं. होता होता दिवाळी आली आणि गोदावरीताई त्यांचे यजमान शंकर सातपुते यांच्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला बाजारात गेल्या. त्या वेळी त्यांनी बघितलं की दिवाळीचे आकाशकंदील खरेदी करायला खूप गर्दी आहे आणि जवळपास सगळेच जण हे आकाशकंदील खरेदी करतात. त्याच वेळी त्यांना आकाशकंदील करून विकायची कल्पना सुचली. घरी येऊन त्यांनी घरात सगळ्यांनाच याबद्दल विचारलं. घरातही कोणी आक्षेप घेतला नाही, त्यामुळे थोडेफार सामान आणून त्यांनी पतंगी कागदाचे आकाशकंदील बनवायला घेतले. त्या दिवाळीच्या आधी तब्बल तीनशे आकाशकंदील तयार झाले होते. कंदील तयार तर झाले, पण कोणी विकत घेतले नाहीत तर? अशी धास्ती गोदावरीताईंना वाटायला लागली होती. घरातले आणि आजूबाजूचेही म्हणायला लागले की एवढे कंदील केलेत ते आता गळ्यात घालून फिरायला लागतील की काय! पण जवळच्याच एका दुकानदाराला आकाशकंदिलाबद्दल कळलं आणि त्याने सगळे आकाशकंदील एकदमच विकत घेऊन टाकले. हा पहिला व्यवहार झाला आणि मग मात्र गोदावरीताईंचा हुरूप वाढला.
पुढच्या वर्षी गोदावरीताई आणि त्यांच्या घरातले सगळेजण एकत्र कंदील करायला बसले आणि दिवाळीआधीच भरपूर आकाशकंदिलांची मागणी पुरवता आली. मग २००५ पासून त्यांना अगदी छोटय़ा कंदिलांचीही खूप मागणी आली आणि ती पुरी करायला त्यांनी सहा जणींना कंदील करायच्या कामावर घेतलं. व्यवसाय मोठा करायचा तर भांडवल पाहिजे होतं, त्यामुळे भारतीय युवा शक्तीकडून ५० हजारांचं कर्ज घेतलं आणि कंदील विक्री झाल्यावर ते फेडूनही टाकलं. गोदावारीताईंच्या यजमानांच्या ओळखी असल्याने नवनवीन ठिकाणी विक्री व्हायला लागली, मागणीही वाढली, शिवाय बाजारात पत वाढली आणि व्यवसायातला आत्मविश्वासही वाढला. पुढच्या वेळी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज घेऊन कंदील केले.


आता तर जानेवारी महिन्यातच या आकाशकंदिलांचं काम सुरू केलं जातं. जिलेटीनचे छोटे कंदील, कागदाचे, फोमचे मोठे कंदील असे सुमारे २२-२३ डिझाइनचे कंदील त्यांच्याकडे तयार केले जातात. घरातले सासू-सासरे, दीर, जाऊ, मुलं, नवरा हे सगळेच कंदिलाच्या कामाला हातभार लावतात. कच्चा माल सगळा दिल्लीहून मागवला जातो. आलेले कागद गोदावरीताई डिझाइनप्रमाणे कापतात आणि मग तो त्यांच्याकडे काम करणाऱ्याना महिलांना दिला जातो. आता सुमारे ७५ महिलांना यातून रोजगार मिळतो. काही महिला कापलेले कागद घरी घेऊन जातात, तर काही तिथे कारखान्यात येऊन कंदील तयार करतात. छोटे कंदील असतील तर एक बाई दिवसाला दीडशे रुपये कमवू शकते. या कंदिलांचा डझनावर हिशेब असल्याने एक डझनावर पाच रुपये मिळतात. महिलांनी तयार केलेले कंदील बरोबर आहेत की नाही हे तपासून त्याचे नीट पॅकेजिंग करावे लागते. हे सगळे काम नीट होण्यासाठी गोदावरीताईंनी साखळी पद्धत ठरवली आहे. चारचार जणींचे ग्रुप करून प्रत्येकीचं काम ठरवून दिलं आहे. त्यामुळे कंदील बनण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो तपासला जातो. शिवाय पाचवी स्त्री हे तयार कंदील नीट पॅक करते. त्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होऊन कामाची प्रतही चांगली राहते.

गेल्या वर्षी सुमारे ३० हजार छोटे कंदील तर सुमारे ५००० मोठे कंदील त्यांनी तयार करून विकले होते. या वर्षी आत्तापर्यंत सुमारे ६००० डझन माल तयार आहे. इतक्या प्रचंड संख्येने कंदील करायचे तर कागद कापायला वेळही खूप लागायचा. त्यामुळे त्यांनी आता कटिंग मशीन तयार करून घेतलं आहे. त्यामुळे कागद कापायचं काम सुकर झालंय. हे हजारो कंदील ठेवायला जागाही लागतेच, त्यामुळे तीन गुंठे जागा भाडय़ाने घेऊन त्यावर शेड करून गोदाम तयार केलं आहे. शिवाय सातपुते यांची एक तीन मजली इमारतही साठवणुकीसाठी वापरली जाते. तीन वर्षांपूर्वी एम.बी.ए. केलेल्या त्यांच्या दिराने, रत्नाकर सातपुते यांनी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली असून ते अकाउंटिंग बघतात, मात्र महिलांकडून काम करून घेणे, त्यांच्या कंदिलांची मोजणी करून तो हिशेब ठेवणे, कागद कापून देणे, माल आणणे, पोचवणे ही कामं गोदावरीताई करतात. मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, बीड, सोलापूर, लातूर, बार्शी ते अगदी हैदराबादलाही त्यांचे कंदील जातात. ओळखीतून, कर्णोपकर्णी मिळणाऱ्या प्रसिद्धीतून त्यांना दूरध्वनीवरून ऑर्डर मिळतात. मोबाइलवरूनच फोटो पाठवून मागणी नक्की केली जाते आणि मग ट्रान्स्पोर्टकरवी कंदील पोचते केले जातात.

व्यवसायात सतत कल्पकता दाखवली नाही तर बाजारात टिकाव लागत नाही हे ओळखून गोदावरीताई दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. नवे डिझाइन, प्रकार तयार करतात. गेल्या वर्षी खास ऑर्डर आल्यामुळे केवळ दहा दिवसांत त्यांनी कामटय़ाचे दीडशे कंदील बनवून दिले होते. तसेच फिरत्या कंदिलांचीही मोठी मागणी त्यांनी पूर्ण केली होती. मशीनमुळे कागद कापायचा वेळ वाचतो त्यामुळे त्यांना इतर प्रयोग करायला वेळ मिळायला लागला आहे. या वर्षी छोटय़ा कंदिलात त्या नेहमीपेक्षा वेगळे आकार देणार आहेत, तर बाजारातली मागणी बघून मोठय़ा आकाराच्या कंदिलातही कपडा, जाळी, जूट, कामटय़ा अशा विविध प्रकारांतले इकोफ्रेंडली कंदील आणणार आहेत.
त्यांची ही छोटय़ा कल्पनेतून साकार झालेली उद्योजकता बघून २०१४ मध्ये ‘वाय.बी.आय.’ने (युथ बिझनेस इंटरनॅशनल) लंडनला बोलावून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. लंडनवारीत त्या सुमारे ४० देशांतल्या इतर उद्योजकांना भेटल्या आणि तिथे त्यांना नवीन कल्पना सुचली. वाढदिवस किंवा काही खास प्रसंगांच्या वेळेस पार्टी बॉक्स उडवले जातात. त्यातून जिलेटीनची चकमक जोरात उडते. जिलेटीन कंदिलाच्या कागद कटाईतून उरलेला कागद त्यात वापरायचा असे ठरवून गोदावरीताईंनी आता ते पार्टी बॉक्स बनवण्याचे मशीनही घेतले आहे. उरलेला जिलेटिन कागद वाया न घालवता तो नळकांडय़ात भरून हवाबंद करून त्याचे पार्टी बॉक्स बनवले जातात.
या वर्षी आकाशकंदील विकत घेताना एका इवल्याशा आकाशकंदिलाची ही लाखांची कहाणी नक्की आठवणार आणि नुसत्या कल्पनेपेक्षाही तिची अंमलबजावणी आणि व्यावसायिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगणार आहे.

गोदावरी सातपुते
गोदावरी आकाशकंदील,
आंबेगाव पठार
धनकवडी, स्वामीनगर, पुणे – ४३
संपर्क : (९१)८३८०९९३६३४

– स्वप्नाली मठकर
by - loksatta 

प्रतिकूल परिस्थितीवर मात


प्रतिकूल परिस्थितीवर मात
स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी 
क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला

= स्वप्नाली मठकर | 










अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: रस्त्यावर राहायला लागलेल्या माधुरी यांनी स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला.. प्रचंड कष्ट केले आणि आज त्यांच्याकडे दीडशे स्त्रिया कामाला असण्याइतपत तो वाढवला. शून्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या माधुरींचा हा प्रवास..

घरात बसून साडय़ांना पिकोफॉल लावून देणं, परकर शिवून देणं अशी कामं करताना माधुरी खांडवे यांना एकदा बचतगटांच्या स्टॉलमध्ये तीन दिवसांसाठी एक स्टॉल मिळाला. आलेली संधी वाया जाऊ द्यायची नव्हती. दोन वर्षांची मुलगी आणि अकरा महिन्यांचा मुलगा यांना आईकडे ठेवून त्यांनी ज्यांच्यासाठी त्या परकर शिवून देत तिथून परवानगी घेऊन कापड मिळवले, परकर शिवले आणि स्टॉल सुरू केला. तीन दिवसांत तब्बल तीस ते पस्तीस हजारांची विक्री झाली; कपडय़ाचे पैसे परत द्यावेच लागले; पण शिलाईचे एका परकरामागे तीन रुपये या दराने बाराशे रुपये माधुरींच्या हातात आले. व्यवसायातून मिळालेला हा पैसा घरात खर्च न करता त्यांनी त्यातून मशीनला मोटर बसवून घेतली ज्यामुळे जास्त वेगाने शिलाई करता येणार होती. तीन-चार दिवसांनी आईकडून मुलांना आणायचे तर जायचा-यायचा शंभर रुपये खर्च होता. माधुरींनी परकर दुकानाच्या मालकीणबाईंकडे शंभर रुपये मागितले, पण त्यांनी चक्क नकार दिला. याचा माधुरींना फारच धक्का बसला. लहान मुलं इतके दिवस दूर ठेवून त्यांना राहावेना. शेवटी शेजारून उधारी घेऊन रात्री त्या आईकडे पोहोचल्या. एरवी कधी माहेरपणाला जास्त दिवस न थांबणाऱ्या त्या या वेळी मात्र दोन-तीन दिवस तिथेच होत्या. त्या वेळी आईला शंका आली आणि तिनं विचारणा केली. माधुरींनी घडलेला किस्सा सांगितला आणि पैसा असता तर स्वत:चा व्यवसाय सुरू केला असता, अशी खंतही बोलून दाखवली. आईने त्या क्षणी स्वत: साठवलेले दीड हजार रुपये हातावर ठेवले आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचं बळ दिलं. त्यानंतर मात्र गेल्या सोळा वर्षांत माधुरींनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

जेजुरीजवळच्या धोण्डज इथल्या माधुरींचे वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झाले. सासरी आल्यावर वडिलांनी सोनं न दिल्यामुळे कुरबुरी सुरू झाल्या. शिक्षणाच्या बाबतीतही नवऱ्याने खोटंच सांगितल्याचं लक्षात आलं. कंटाळून त्या माहेरी परतल्या. तीन-चार महिने माहेरी राहिल्यावर गावातल्या लोकांच्या बोलण्याचा त्रास होऊ लागल्याने त्या पुन्हा एकदा सासरी गेल्या. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना आणि त्यांच्या पतीला घरातून बाहेर काढलं गेलं. राहायची काही सोय नाही, कुठं जायचं, काय खायचं याचा काही पत्ता नाही असे ते दोघे निगडीला एका देवळासमोर चक्क रस्त्यावर राहायला लागले. चार-आठ दिवसांनी सोन्याचे कानातले मोडून एका झोपडपट्टीमध्ये एक खोली घेतली. आता निदान डोक्यावर छत होतं.

त्या काळात त्यांच्या पतीने दिराबरोबर भाजी मंडईतले काम सुरू ठेवले होते, पण दिवसाचे फक्त वीस-तीस रुपये मिळायचे, त्यात काय भागणार? म्हणून माधुरींनी तिथे मिळतील ती कामं करायला सुरुवात केली. रंगीत काचा निवडायच्या कामात एक किलो काचा निवडल्या की दहा पैसे इतक्या कमी दरानं पैसे मिळायचे; पण जे काही मिळतील ते घराला उपयोगी म्हणून त्यांनी काम सुरूच ठेवलं. नंतर त्यांना एका कंपनीत काम मिळालं, तिथून हजार-बाराशे रुपये मिळायचे, त्यामुळे घरची परिस्थिती जरा सुधारली. मग माधुरींनी शिवणकामाचा कोर्स केला, घरी मशीन घेतलं आणि घरच्या घरी पिकोफॉल, कपडे शिवून देणं अशी कामं त्या करायला लागल्या. हळूहळू काम वाढलं. परकर शिवायचंही काम मिळालं आणि त्यातूनच स्वत:च्या व्यवसायाचं विश्व उभं केलं.

आईने दिलेल्या दीड हजार रुपयांत त्यांनी तीस परकरांचं कापड आणलं आणि एका दिवसात परकर शिवून दारोदारी विकायला गेल्या. सगळे परकर विकले गेले आणि अडीचशे रुपये नफाही झाला. हा नफा पुन्हा भांडवल म्हणून घालून या वेळी जास्तीचं कापड आणलं आणि परकर विकले. असं करत भांडवल वाढत गेलं आणि थोडाफार नफाही व्हायला लागला. दारोदारी जाऊन परकर विकतानाच ओळखीतल्या एका व्यापाऱ्याकडून अंतर्वस्त्रेही आणून विकायला सुरुवात केली. त्या विक्रीचाही थोडा पैसा मिळायला लागला. सुमारे साडेतीन र्वष त्या दारोदारी जाऊन कपडे विकत होत्या. कर्ज काढून दोन खोल्यांचं घर घेतलं पहिल्या वेळी घराचं कर्ज असल्यानं बँकेने व्यवसायासाठी कर्ज नामंजूर केलं. त्या वेळी त्यांनी पतपेढीतून पैसे उचलून व्यवसाय वाढवला आणि घराचं कर्जही फेडलं. पुन्हा एकदा दीड-दोन वर्षांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्टकडून अर्ज केल्यावर बँकेने व्यवसाय कर्ज दिलं. या वेळी माधुरींनी दोन खोल्यांच्या घराच्या जागी तीनमजली बिल्डिंग उभी केली आणि खालचा मजला कारखान्यासाठी ठेवून ‘गायत्री परकर’ सुरू केलं.

२००७ मध्ये पुन्हा एकदा सासरी कुरबुरी होऊन त्यांच्या पतीचं भावाबरोबर भाजी मंडईत काम करणं बंद झालं. त्या वेळी लोक काय म्हणतील म्हणून ते माधुरींबरोबर काम करायला कचरत होते. बायकांच्या कपडय़ाचा व्यवसाय आपण करावा हे त्यांना पटत नव्हतं; पण मग माधुरींनी त्यांना समजावलं आणि सुनील खांडवे हेही त्यांच्याबरोबर या व्यवसायात उतरले. सायकलवरून कपडे विकण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आता अनेक गोष्टींत त्यांचा सहभाग असतो.

आज ‘गायत्री परकर’ या व्यवसायातून सुमारे दीडशे महिलांना रोजगार मिळतो. रोज सकाळी ठरावीक वेळेपर्यंत कापड कापून त्या महिलांना वाटतात. आदल्या दिवशीचे शिवलेले परकर घेऊन हिशेब करतात आणि मग कपडे पोहोचवायला, ऑर्डर घ्यायला माधुरी स्वत: जातात. काही जणी काम घरी घेऊन जातात आणि परकर शिवून दुसऱ्या दिवशी आणून कारखान्यात देतात. आता त्यांचे एक होलसेल दुकान आहे. आठवडय़ातले चार दिवस माधुरीताई फिरतीवर असतात तेव्हा त्यांची आता दहावीत असलेली मुलं हे दुकान सहज सांभाळतात.

पुणे आणि आसपासच्या साधारणत: शंभर किमीच्या परिसरात ‘गायत्री परकर’च्या उत्पादनाची विक्री होतेच, शिवाय महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांतही विक्री होते. विविध स्टाइलचे, डिझायनर, सॅटिन इत्यादींचे परकर शिवण्याबरोबरच लेगिग्ज, स्कार्फ, ब्लाऊजपीस, इतर कपडे यांची घाऊक विक्रीही त्या करतात. महिन्याला वीस हजारांहून अधिक परकर शिवून त्यांची विक्री होते.

१९९५ मध्ये रस्त्यावर आपलं आयुष्य काढलेल्या माधुरींना आता सिटी ग्रुपतर्फे, भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे, डी.एस. कुलकर्णी यांच्यातर्फे आणि अन्य मानसन्मान मिळाले आहेत. शिवाय ‘युथ बिझनेस इंटरनॅशनल’तर्फे लंडनमध्येही त्यांना एक पुरस्कार मिळाला आहे. पूर्वी दारोदार फिरून कपडे विकते म्हणून हेटाळणी करणारे नातेवाईक आज त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांना स्वत:चा सार्थ अभिमान वाटतो. अधिक न शिकता आपली मुलगी इतकी प्रगती करू शकते हे पाहून तिला अजून शिकवली असती तर, अशी चुटपुट मात्र माधुरींच्या आई-बाबांच्या मनाला लागून राहिली आहे आणि म्हणूनच आपल्या मुलगा आणि मुलीला भरपूर शिकवायचं, असं माधुरींनी ठरवून ठेवलं आहे. परकरसारख्या एखाद्या वरकरणी क्षुल्लक वस्तूची बाजारपेठ ओळखून तो व्यवसाय इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढवता येणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे.


उद्दिष्ट

स्वत:ची मोठी जागा घेऊन, स्त्रिया तिथे येऊन काम करू शकतील अशी कंपनी सुरू करायची आहे. सप्लाय चेन वाढवायची आहे आणि व्यवसाय अजून मोठा करायचा आहे.


सल्ला


कुठलंच काम हलकं समजू नका. व्यवसाय म्हटला की नफा-तोटा होतच असतो, पण त्यातही चिकाटीने काम करणं जरुरी आहे. आजकाल सगळ्यांना ‘इझी मनी’ हवा असतो, पण व्यवसायात असे काही शॉर्टकट नसतात. जिद्दीने काम करत राहिलं तरच यश मिळतं




माधुरी खांडवे, 
गायत्री परकर, गोंधळेनगर, हडपसर
८४२१०५०१८९

swapnalim@gmail.com










by- loksatta

माझ्याबद्दल